Tuesday, July 1, 2008

इतिहास संशोधक रा.चि.ढेरे यांचे मनोगत....

गेली आठ शतके मराठी लोकमानसांवर अखंड अधिराज्य गाजवणारे हे सावळे ब्रम्ह उन्मनीच्या अनेक प्रभूंना सकळ स्थिरचरात प्रतीत होत राहीले.हे खरे आहे. त्यांच्या प्रतीतीच्या प्रभेने माय मराठीचे अक्षरन् अक्षर नक्षत्रांची झळाली लेऊन राहीले आहे. त्यांच्या विश्वात्म भावाने मराठी संस्कृतीचे सत्वपोषण घडले आहे.पण या उन्मनीच्या प्रभूंशी जवळीक साधण्याचा, त्यांच्या चरणांना स्पर्श करण्याचा मला मुळीच अधिकार नाही, याची मला पुर्ण जाणीव आहे.मनाच्या संकल्प -विकल्पांनीच ज्याचे जीवन व्यापलेले आहे.त्याला उन्मनस्क साधुंच्या वाटांवर पाऊल ठेवण्याचा अधिकार नाही याचेही मला भान आहे. त्यामुळे माझे विठ्ठलप्रेम उत्तरोत्तर उत्कट होत गेले आणि यातूनचं ''विठ्ठल: एक महासमन्वय'' या ग्रथांद्वारे मी विठ्ठलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.खरे पहाता,अशा अनेक लेखकांनी त्यांच्या संशोधनपर लेखनातून विठ्ठलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुख्वत्वे यांत प्र.कृ.उपाख्य आबासाहेब भाटे(बरवे बरवे पंढरपूर),श्रीपादशास्त्री किंजवडेकर(स्मरण चातुर्मास),नागनाथ बा. जाधव (वारकरी स्वाध्याय), राजा मंगळवेढेकर (पंढरीस वाजे घंटा), डॉ.गोपाल बेन्द्रे (THE CITY OF Saints PANDHRPUR) अशा अनेक ज्ञानपिपासू संशोधकांनी विठ्ठलाचा शोध घेण्याचा मार्ग शोधलेले आहेत.विशेषत: काहींना वेगवेगळ्या संर्दभातून विठ्ठल दिसला. त्याचाही येथे मागोवा घेणे जरूरीचे आहे.बुद्धरूपातील विठ्ठलसंशोधक रा.चि.ढेरे यांच्या मते,संतानी एक रहस्यमय उदाहरण दिलेले आहे ते म्हणजे विठ्ठलाच्या बुद्धरूपाचे होय. या रहस्यात संतांनी मौनस्थ अन् बौद्ध याचा त्यांनी वांरवांर उल्लेख केलेला आहे.नाही बोलाचाली मौन धरियलेकैसे चाळविलें पुंडलिकेंऐसा परात्पर सोइरा पुंडलिकाचे पाठीमौन्य बाक्पुटी धरूनि गे मायहे एकनाथ महराजांनी विठ्ठलाच्या मौनाविषयी अनेकवार सांगितलेले आहे.मात्र हे वाचल्यानंतर आपणास आश्र्चर्य वाटते. कारण जो विठ्ठल भक्तांशी जिव्हाळ्याचे नाते जोडतो तो जनमेळ्यात रमणारा आहे. त्याच्यांशी भावसंवाद करताना स्वत:ला विसरणारा आहे, त्या विठ्ठलाने अठ्ठावीस युगे मौन धारण केलेले आहे.असे नाथांसारख्या अनुभवसंपन्न विठ्ठलभक्ताने वांरवांर म्हणावे,यातूनच असे प्रेरित होते की,संताचास हा मौनस्थ विठ्ठल जेव्हां संतमुखाने स्वत:ला बुद्धही म्हणवून घेतो.तेव्हा असे निश्चित असे वाटते की, तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एका महान युगांतराचा साक्षी आहे.त्यामुळेच विठ्ठलाचे हे क्रांतिकार्य आपण समजून घ्यायला हवे.विठ्ठल रंगात रंगलेली नामदेवांची शिष्या जनाबाई हीने दशावतारांचे वर्णन करताना कृष्णावतारानंतर बुद्धाचे नाम उच्चारले आहे.होऊनिया कृष्ण कैस वधियेलाआतां बुद्ध झाला सखा माझाहा जनाबाईने केलेला बुद्धावताराचा उल्लेख लक्षणीय आहे. 'आता' म्हणजे या वर्तमानयुगात माझा सखा म्हणजे विठ्ठल बुद्ध होऊन अवतरला आहे.ही जनाबाईची श्रद्धा बुद्ध आणि विठ्ठल यांत एकच अनुभवणारी आहे. नाथांनीही आपल्या एका अभंगात विष्णूचा नववा अवतार जो बुद्ध त्याचे वर्णन अगदी स्पष्टपणे विठ्ठ्लरूपात केले आहे. नाथ म्हणतात,नववा वैसे स्थिररूप तया नाम रूप बौद्धरूपसंत तया द्वारी तिष्ठताति निंरतरीपुंडलिकासाठी उभा धन्य धन्य विठ्ठलशोभाकिंवा एका 'गोधंळा' त एकनाथ महाराज म्हणतात,बौद्ध अवतार घेऊन विटे समचरण ठेवूनपुंडलिक दिवटा पाहून तयाचे द्वारी गोंधळ मांडिलाबया दार लाव बौद्धाई बया दार लावविटेवर समचरण ठेवून पुंडलिकाच्या दारी उभा राहीलेला विठ्ठल हा बौद्ध अवतार आहे.अशी स्पष्ट धारणा नाथांनी इथे व्यक्त केलेली आहे.इतकेच नव्हे तर मराठी संत बुद्धाला विष्णूचाच अवतार मानून, त्याचा दशवतारात समावेश करतात अन् त्यालाही विठ्ठलाप्रमाणेच मौनस्थ अन् दिंगबर ही विशेषणे लावतात.बुद्ध आणि विठ्ठल याच्यांतील समन्वयता म्हणजे कोणतेही गुढ नसून अप्रत्यक्षपणे भगवान बुद्धांना स्विकारून त्यांच्या विचारांना सोयीस्करपणे तिलांजली देण्याचा प्रयत्न आहे असेही संशोधक रा.चि.ढेरे ठामपणे सांगतात.मराठी संतांनी वैदिक परंपरेशी आत्मीयतेचे नाते राखलेले असुनही त्यांनी अवैदिक बुद्धाशी विठ्ठाचे नाते का जोडले? विठ्ठल आणि बुद्ध यांना एकरूप मानण्याइतके असे कोणते समर्धित्व त्यांच्या ठायी होते? बुद्धाचे पौराणिक अवतारविशेष माहीत असूनही संतानी आपले परमाराध्य बुध्दरूपात का अनुभवले? विठ्ठलाचे नाते जोडताना त्याच्या धर्माच्या -हासकालीन रूपाविषयी संतानी कोणती भूमिका स्वीकारली? आपल्याला या प्रश्नांची उत्तरे काहीं अंशी या भूमीच्या प्रकृतीतून मिळतात, तर काही अंशी संताच्या समन्वयशील द्दृष्टीतून मिळतात.आपल्या पंरपरेत सहसा काही नष्ट होत नाही. केवळ भिन्न नामरूपाने परिवर्तन पावते.हे आपण विसरता कामा नये.ज्ञानदेव-नामदेवांच्या काळाला निकटपुर्वी सतत हजार-दीड हजार वर्ष सारा महाराष्ट्र भगवान बुद्धाच्या अनुयांयानी व्यापलेला होता. महाराष्ट्रातील अशी एकही पर्वतराजी नाही,की जिथे बौद्धांनी आपल्या गुंफा खोदल्या नाहीत. सह्यगिरीच्या कुशीतील या शेकडो गुंफातून बौद्ध भिक्षू ' बुद्धं सरणं गच्छामि' हा घोष अखंड घुमवित होते.अहिंसेच्या अन् करूणेच्या महामंत्राचे पडसाद मराठी भूमीच्या अणुरेणूतून उमटत होते. राजपुरूषांपासून कृषक- कारागिरांपर्यत सारा या वीतराग-भिक्षूंच्या सेवेसाठी त्याग करायला सिद्ध असल्याचे पुरावे अभिलेखांत आजही उपलब्ध आहेत. भिक्षू हा आदराचा विषय बनलेला होता.त्या आदराची निदर्शक म्हणून भिकोबा अन् भिकूबाई ही स्त्री-पुरषांची नावे खेडोपाडी प्रचलीत होती.हा दहा-पंधरा शतकांचा जनमानसावरील प्रचंड प्रभाव एखाद्या वैदिक धर्माभिमानी प्रज्ञावंताच्या प्रभावाने पूर्णत:पुसला गेला, असे मानणे इतिहाक्रमाशी संवादी नाही.किंबहुना, अशा प्रज्ञावंताला 'प्रच्छन्न बौद्ध' ही शिवी खावी लागली. एवढा तो प्रभाव अमिट असला पाहीजे हे उघड आहे. आचार्यांच्या रचनेत बुद्धस्तुतीचा समावेश पाहताना पांरपारीककुरकुर केल्याचे आपल्याला ज्ञात नाही. सांगावयाचे तात्पर्य असे की, असा हा प्रभावशाली बौद्धधर्म केवळ भिक्षूंच्या स्खलनामुळे अथवा नव्या प्रभावी धर्मसंप्रदयाच्या उदयामुळे मराठी जनमानसातून पूर्णत:पुसला गेला, असे म्हणणे योग्य होणार नाही.या प्रभावाचे पाझर उत्तरकालीन प्रभावी संप्रदयात कुठेतरी वेगळ्या नामरूपांनी झरत असले पाहीजेत, यात संशय नाही. या परीवर्तित अवशेषांचा शोध घेणे हे एक इतिहासकारांना आव्हान आहे. ज्ञानोबा-तुकोबांनी ज्या इंद्रायणीच्या प्रवाहातून वैश्विक करूणेचा महापूर महाराष्ट्राभर पसरविला, त्या इंद्रायणीचा उगम तथागतांच्या करूणामय जीवीतातून स्फुर्ती घेणा-या असंख्य भिक्षूंच्या निवासभूमीत झालेला आहे, हे सत्य सहजा-सहजी डावलता येण्यासारखे नाही. अर्थातचं ज्ञानदेवपूर्व बौद्ध समाज 'बौद्ध' या नावाने जरी नाहीसा झाल्याचे दिसत असले तरी तो अन्य लोकप्रिय संप्रदयात लय पावला असला पाहीजे,असे मानावे लागते.आणि मग स्वाभाविकपणेच असे मनात येते की, ज्ञानदेव- नामदेवांचा भगवान बुद्धांच्या असीम करूणेचा कुठेतरी अतूट संबंध असला पाहीजे.'जीवातळी जीव अंथरणारे' अन् 'कारूण्यमाजी पाऊलें लपवीत चालणारे' ज्ञानदेव हे कोणत्या आचार्यांना वाट पुसत चालले होते, याचा शोध चालू असतो; पण त्यांच्या कारूण्यगंगेचा प्रवाह कोणत्या गंगोत्रीतून झरत आला आहे. याचा शोध मात्र आपण घेतला नाही.ज्ञानाच्या पातळीवरून भूंती भगवंत पाहणारे अद्वैत जरी या भुमीला नवे नसले, तरी त्या म्हणूनचं ढेरे निसंकोचपणे सांगतात की, महाराष्ट्रात हजार-दिड हजार वर्षापुर्वी बुद्धाने आपल्या ह्दयातील करूणेचा कमंडलू बाराव्या-तेराव्या शतकात इथे उपडा केला.अन् मग त्याची धारा द्दष्ट-पृष्ट होऊन वाहती रहाण्यासाठी संतानी आपल्या भावभक्तीचे अनेक प्रवाह तिच्यात मिळविले.त्यामुळे कालक्रमाने आलेले तांत्रिक विकृतीप्रमाणे आपल्यातले सारे हीन दूर दवडून बौद्ध धर्म भागवत धर्माच्यारूपाने पुन्हा अवतरला.

No comments: