Monday, May 28, 2007

पंढरपूर...

पंढरपूर : मराठी संस्कृती घडविणा-या थोर भागवतधर्मीय संतांनी नावारुपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र. येथील विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. सोलापूर जिल्हयातील याच नावाच्या तालुक्याचे ते मुख्य ठिकाण असून सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी.वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, स.स.पासून ४५० मी. उंचीवर बसलेले आहे. हे मिरज-कुर्डुवाडी अरुंदमापी लोहमार्गवरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय आहे. या 'भक्तिसंप्रदायाच्या आद्यपीठा' त आणि 'भीमातटीय महायोगपीठा' त महाराष्ट्राच्या सर्व भागांतून आणि कर्नाटकादी इतर राज्यांतूनही प्रतिवर्षी आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशांस हजारो वारकरी आणि यात्रेकरु लोटतात. चैत्रातील व माघातील यात्रा त्या मानाने लहान असतात.
विठ्ठलमंदिर हे गावातील सर्वप्रमुख मंदिर आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा (भीवरा) नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. तिच्या वाळवंटात पुंडलिकाचे देवालय (समाधी) आहे. येथून विठ्ठलमंदिर सु.200 मी. आहे. मध्यवस्तीतील हे मंदिर पूर्वाभिमूख असून त्याची पूर्व-पश्चिम लांबी सु. 107 मी. दक्षिणोत्तर रुंदी सु. 52 मी. आहे. देवळास तटबंदी असून त्याला पूर्वेस तीन, दक्षिणेस एक, पश्चिमेस एक व उत्तरेस तीन असे एकूण आठ दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरुन पोहोचण्यास बारा पाय-या आहेत. त्यांतील पहिली पायरी ही नामदेव पायरी होय. लोक या पाररीला पाया न लावता पुढे जातात. या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोप-यात संत चोखामेळा याची समाधी आहे. नामदेव दरवाजाने आत जाताच छोटा मुत्किमंडप आहे. तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे. नंतरच्या चौकात तीन दीपमाळा व प्रल्हादबुवा बडवे आणि कान्हया हरिदास यांच्या समाघ्या आहेत. तसेच येथे गरुडाचे व समर्थ रामदासांची स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे. यानंतरच्या अरुंद दगडी मंडपाच्या (सो-याच्या) भिंतीत तीन दरवाजे आहेत. मधल्या दरवाज्याच्या दोन बाजूंस जयविजय हे द्वारपाल व गणेश आणि सरस्वती आहेत. मधल्या दारातून आपण सोळखांबी मंडपात जातो. तेथे छतावर दशावतारांची व कृष्णलीलेची चित्रे आहेत. बाजूच्या खोलीवजा दालनांत काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, दत्तात्रेय, नरसोबा यांच्या मूर्ती आहेत. दुसरा खांब सोन्या-चांदीने मढविलेला असून त्यावर छोटी विष्णुमूर्ती आहे. येथे पूर्व गरुडस्तंभ होता असे सांगतात. या खांबाना मिठी घालून मग पुढे जाताना. यानंतर चौखांबी मंडप आहे. उत्तरेस देवाचे शेजघऱ आहे. नंतरची चौरस जागा ' कमान' नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे. तेथे सिंहासनावरील विटेवर पांडुरंगाची दगडी मूर्ती असून तिची उंची एक मी. पेक्षा किंचित जास्त आहे. १८७३ मध्ये काही शैव बैराग्यांनी धोंडा मारल्यामुळे मूर्तीचा पाय दुखावला होता: तेव्हापासून पायांस न कवटाळता त्यांवर फक्त डोके ठेवू देतात. सोळखांबी मंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर एका ओसरीत चार मूर्ती, एक तरटीचे झाड व त्याच्या पायाशी कान्होपात्रेची मूर्ती, नंतर व्यंकटेश-मंदिर, त्यासमोर नागोबा, बाजीराव पेशव्याने बांधलेली ओवरीत नारद व कोप-यात रामेश्वर यांच्या मूर्ती असून पश्चिमेच्या भिंतीत सूर्य, गणेश, खंडोबा व नागोबा यांच्या मूर्ती आहेत. विठ्ठलमंदिरामागे वायव्येस रुक्मिणीमंदिर आहे. जवळच सत्यभामा व राही खोल्या आहेत. सभामंडपाच्या पाय-या चढून आल्यावर समोर सुवर्णपिंपळ आहे. येथून पुन्हा सोळ्खांबी मंडपात आले. म्हणजे एका भिंतीत 'शिलालेख' असून त्यावर देवी आहे. जन्ममरणांच्या फे-यातून सुटण्यासाठी लाखो भाविकांनी या शिलालेखाला पाठ घासल्यामुळे तो गुळगुळीत झाला आहे. आता त्यावर लोखंडी जाळी बसविली आहे. देवळात रंगशिला, गारेच्या पादुका इ. विशिष्ट महत्त्वाच्या जागा आहेत.
विठोबाचे व रुक्मिणीचे अनेक मौल्यवान अलंकार असून ते विशिष्ट वेळी देवास घालतात. देवाच्या काकडआरतीपासून शेजारतीपर्यंत नित्य व नैमित्तिक असे अनेक पूजोपचार असतात. यात्रेच्या वेळी गर्दीमुळे पांडुरंगाचे दर्शन झाले नाही, तर देवालयाच्या शिखराच्या दर्शनाने भाविक लोक समाधान मानतात. देवालयाच्या उत्पन्नाबाबत व तेथील बडवे, सेवेकरी, उत्पात, डांगे बेणारे इत्यादींच्या हक्कांबाबत पूर्वापार तंटेबखेडे होत आले आहेत: अलीकडे शासनाने नाडकर्णी आयोग नेमून देवालय-व्यवस्थेबाबात निर्णय केला होता: तथापि त्यासंबंधी पुढील न्यायालयीन वाद चालू आहेत.
नदीकाठी अकरा घाट बांधलेले आहेत. मात्र ते सलग नाहीत. पुंडलिकाच्या देवळाच्या दक्षिणेस सु.1.2 कि.मीवर विष्णुपद-वेणुनाद हे स्थान आहे. गावाच्या दक्षिणेस सु.1.6 कि.मी.वर गोपाळपूर येथे गोपाळकृष्णाचे देऊळ आहे. यांशिवाय पंचमुखी मारूती, भुलेश्वर, पद्मावती (देऊळे आणि तळे) , व्यास, अंबाबाई, लखूबाई, यमाई, जोतिबा, नगरेश्वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्वर, ताकपिठ्या विठोबा, कोटेश्वर, गोंदवलेकर राम, खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल, रूक्मिणी व राधा यांच्या सोन्याच्या मूर्ती, नामदेव मंदिर, शांकभरी, (बनशंकरी), मल्लिकार्जुन, तांबडा मारूती, मुरलीधर, गारेचा महादेव, चंद्रभागा, दत्त, वटेश्वर महादेव, बेरीचा महादेव, काळा मारूती, चोफाळा (विष्णुपंचायतन), पारावरील दत्त , बाभळ्याचा महादेव, अमृतेश्वर ही व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहेत. अलीकडे काही नवीन मंदिरेही झाली असून येथील कैकाडी महाराजांचा मठ प्रेक्षणीय आहे. 1946 मध्ये साने गुरूजींनी हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला, तेव्हा हरिजनांना मंदिर खुले झाले. चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देहूकर यांची व वेळापूरकर यांच्या समाध्या आहेत. यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम ठोकतात.
पंढरपूर व तेथील विठोबा यांचा इतिहास व त्यांच्या नावांची व्युत्पत्ती यांबद्दल अनेक मते आणि वाद आहेत. पंढरपूरला पांडरंगपल्ली, पंडरंगे, पौंडरीकक्षेत्र, फागनिपूर, पंडरीपूर, पांडुरंगपूर, पंडरी अशी नावे निरनिराळ्या वेळी दिलेली आढळतात. पंढरपूरचा पांडरंगपल्ली या नावाने सर्वांत जुना उल्लेख राष्ट्रकूट राजा अविधेय याने नोव्हेंबर 516 मध्ये जयद्विठ्ठ नावाच्या ब्राह्मणास दिलेल्या ताम्रपटात आढळतो. सोळखांबी मंडपाच्या पूर्वद्वारासमोरील दगडी तुळईच्या तिन्ही बाजूंवर देवनागरी लिपीत आणि संस्कृत व कानडी भाषांतील शिलालेखांत पंढरपूरला पंडरंगे म्हटले असून होयसळ वीर सोमेश्वर याने विठ्ठल देवाचे अंगभोग आणि रंगभोग यांसाठी आसंदी नाडामधील हिरिय गरंज (कर्नाटकातील चिकमगळूर जिल्ह्यातील कट्टर तालुक्यातील हिरे गरंजी गाव) हे गाव दान केल्याचे म्हटले आहे. बेळगावजवळच्या बेंडेगिरी गावाच्या सुसंस्कृत ताम्रपटात पंढरपुरास पौंडरीकक्षेत्र आणि विठोबास विष्णू म्हटले आहे. रा.ज.पुरोहित व डॉ. रा.गो.भांडारकर अनुक्रमे पुंडरीकपूर व पांडुरंगपूर यांपासून पंढरपूर हा शब्द व्युत्पादितात. चौ-याऐंशीच्या शिलालेखात (1273) पंढरपूरास फागनिपूर व विठोबास विठठ्ल किंवा विठल म्हटले आहे. 1260 ते 1270 च्या दरम्यानच्या हेमाद्रीच्या चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथात पंढरपूरला पौंडरीक व विठोबाला पांडुरंग संबोधिले आहे. 1258 च्या सुमारास चौंडरस या कानडी कवीने आपल्या अभिनव दशकुमारचिरते ग्रंथात पंढरपूर, विठठ्ल मंदिर व तेथील गरूड, गणपती, क्षेत्रपाल, विठ्ठल, रूक्मिणी यांचे वर्णन केले आहे. चोखामेळ्याच्या समाधीजवळच्या 1311 च्या मराठी शिलालेखात पंडरीपूर व विठल आणि विठ्ठल असे उल्लेख आढळतात.
विठोबाच्या मूर्तीचे अनेकवेळा स्थानांतर झाल्याचे उल्लेख सापडतात. कधी आक्रमकांपासून बचावण्यासाठी ती बडव्यांनी लपवून ठेवली होती, तर कधी कोणी ती पळवून नेऊन मग पैसे घेऊन परत केली होती. सोळाव्या शतकात विजयानगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती; पण ती एकनाथांचे पणजोबा भानुदास यांनी परत आणली, अशी कथा आहे. विठोबाची मूर्ती भिलसाजवळील उदयगिरी लेण्यातील तिस-या शतकातील मूर्तीसारखी दिसते असे म्हणतात. तथापि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या लोकांनी केलेल्या विठ्ठलमूर्तीच्या वर्णनाशी सध्याच्या मूर्तीचे वर्णन जुळत नाही. विठोबाचे हल्लीचे देऊळ फार जुने नाही. महाद्वार व बाकीचे देऊळ यांच्या रचनेत विसंगती आहे. मराठेशाहीत विठ्ठल मंदिरासाठी अनेक दाने दिल्याचे उल्लेख आढळतात. तथापि हे मात्र खरे की, संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा इ.मराठी संतांनी पंढरपूरचा महिमा वाढविला व गाजविला. महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात.
त्यामुळे प्रादेशिक संस्कृतीचा समन्वय आणि मराठी-कानडी सामंजस्याचा दुवा साधला जातो.

( विश्वकोश खंड ९ पंढरपूर नोदींतून...)

1 comment:

.... said...

चांगल्या साईट आहे