Friday, July 27, 2007

पुंडलिकाचे व्दारी, उभा विटेवरी ...!

पुंडलिकाचे व्दारी, उभा विटेवरी ...!
'धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणिले पंढरीये॥'

संत तुकारामाच्या या अभंगामध्ये भक्त पुंडलिकाचे महात्म्य सांगितलेले आहे. 'निधान' म्हणजेच प्रत्यक्ष पांडुरंग पंढरीत आला तोच मुळी आपल्या लाडक्या भक्तास-पुंडलिकास भेटण्यासाठी. 'युगे अठ्ठावीस विटेवर उभा' असं जरी आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या बाबतीत म्हणत असलो तरी तो भाग श्रध्देचा आहे. कारण पांडुरंगाला अठ्ठावीस युगे विटेवर उभे केले . त्या पुंडलिकालाही तितकेच प्राचीन मानायचे का ? मुळीच नाही. पांडुरंगाला पंढरपूरात पुंडलिकाने आणले याबाबत दुमत नाही. त्यामुळे विठ्ठलाची मूर्ती तिच्या उपासनेचा काळ तोच पुंडलिकाचा काळ ठरतो. इसवीसन बाराव्या शतकाच्या सुरवातीस महाराष्ट्रातील पंढरपूरास तीर्थक्षेत्राचे महत्व प्राप्त होवून पांडुरंगाचे भक्त पंढरीची वारी करु लागले आणि याच दरम्यान पुंडलिकाचेही महात्म्य विशेष वाढले होते.
वारकरी पंथातील भक्तांची अशी श्रध्दा आहे की प्रल्हादा साठी जसा नरसिंहाचा अवतार झाला तसा भक्त पुंडलिकाकरिता पांडुरंगाचा अवतार झाला. याचाच अर्थ इ.स.बाराव्या शतकाच्या सुरुवातीचा महाराष्ट्रातील पांडुरंगाच्या उपासनेचा जो काळ तोच पुंडलिकाच्याही मानावा लागतो. अठ्ठावीस युगे ही फक्त 'श्रध्दा' आहे 'इतिहास' नव्हे !
पुंडलिकाचे पूर्वायुष्य -
लोहदंड नावाच्या एका खेडेगावात जानुदेव नावाचा एक विव्दान ब्राह्मण रहात होता. अत्यंत सज्जन व सदाचारी. ना कुणाच्या अध्यात ना कुणाच्या मध्यात जेवढा धार्मिक तेवढाच सात्विक.
'शुध्द बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।'
असं जरी संतवचन असलं तरी हा पुंडलिक त्याला अपवाद होता. अक्षरशः हि-याच्या खाणीत कोळसा निघावा तसा हा दिवटा कुलदीपक ! आईवडिलांना दुरुत्तरे करणे , थोरामोठयांना उपमर्द करणे , मन मानेल तसं वागणे, वाईट मुलांच्या संगतीत रमणे असे अनेक दुर्गुण पुंडलिकाच्या स्वभावात होते. अशा वायात मुलाला वठणीवर आणण्यासाठी आईवडिलांनी त्याचे लग्न करुन दिले. बायकोमुळे तो सुधारेल ,व्यवस्थित वागेल. अशी त्यांची रास्त अपेक्षा होती. पण झाले उलटेच.
'आधीच मर्कट,त्यातही मद्य प्याला'....
अशी त्याची अवस्था झाली. पुंडलिक चक्क स्त्रीलंपट बनला! हा करंटा काय आपल्या वार्धक्याची काठी बनणार? स्वतःचे जन्मदाते मातापिताच त्याला अडचीणचे वाटू लागले. पुंडलिकाला स्वतःच्या सुखापुढे कुणाचीच अन् कशाचीच पर्वा वाटत नव्हती. 'आगीतून उठले अन् फुफाटयात पडले' त्याचे आईवडिल पुंडलिकाला वाटत असे. मरत का नाहीत बरे हे लवकर एकदाचे ? आपल्या मागची ब्याद तरी टळेल !
पुंडलिकाचे ह्रदय परिवर्तन -
एकदा आपल्या अंधःकारमय जीवनाचा विचार करत असतानाच जानुदेवाला घराबाहेर काहीतरी गडबड -गोंधळ चाललेला ऐकू आला. उत्सुकतावश पतीपत्नी बाहेर जावून पहातात तो काशी तीर्थक्षेत्री निघालेल्या भक्तांचा मुक्काम लोहदंड गावी पडलेला. त्यात म्हातारे होते अन्तरुणही होते. तरुण पोरे आपापल्या वृध्द मातापित्याची सेवा करत होते. ते दृश्य पाहून पुंडलिकाच्या आईवडिलांना त्या वृध्दांचा केवढा हेवा वाटला असेल नाही ? आपल्या भाग्यात असे सुख कुठले ? पण का कोण जाणे पुंडलिकही त्या समुदायात सामील झाला आणि त्यालाही काशीला जावेसे वाटू लागले. मग तसे घरात बोलून दाखविताच त्याची बायकोही तयार झाली. त्याचे आईवडिलही त्याच्यामागे लागले. तेंव्हा धुर्त अन लंपट पुंडलिकाने लोकनिंदा टाळण्यासाठी त्यांनाही बरोबर घ्यायचे ठरविले. सर्वजण काशीला निघाले. त्याकाही प्रवासाच्या अन्य सुविधा गरिबां साठी नव्हत्या. पायीच प्रवास करावा लागे. वृध्द मातापिता चालू तरी किती शकणार ? त्याची तरुण बायकोही चालून चालून थकली. तेंव्हा पुंडलिकाने काय करावे ? आपल्या तरुण बायकोला घेतले स्वतःच्या खांद्यावर आणि आईवडिलांच्या गळयात बांधल्या दो-या अन् लागला त्यांना ओढत न्यायला ! सकल तीर्थे ज्यांच्या पायासी येवून मिळतात त्या आईवडिलांच्या गळयात दोरीचे फास अडकवून पुंडलिक पुण्यक्षेत्र काशीला निघाला 'पुण्य' मिळविण्यासाठी.
पुंडलिकाची वाट चुकली -
पण पुढे मात्र बरोबरच्या लोकांनी अन् त्याची चुकामुक झाली. पुंडलिकाची वाट चुकली आणि तो काशीच्या दक्षिणेकडे असलेल्या कुक्कुरस्वामींच्या आश्रमाजवळ पोहोचला. पोहोचला कुठला ? नियतीनेच त्याला तेथे खेचून आणले ! कुक्कुर स्वामी कधीही कुठल्याही तीर्थक्षेत्री गेले नव्हते. हे ऐकून पुंडलिकाला खूप आश्चर्य वाटते. पुंडलिकाने बायकोला खांद्यावर घेतलेले अन् वृध्द मातापित्यांच्या गळयात दोर बांधलेले स्वामींनी पाहीले होते. ते पुंढलिकाला म्हणाले, '' मी माझ्या आई-वडिलांमध्येच शिव-पार्वती पाहतो. आईवडिलांची सेवा हाच माझा धर्म आणि हेच माझे तीर्थक्षेत्र ! '' पुंडलिकाच्या वर्मी द्याव बसल्या सारखे झाले. तो खजिल झाला. अंतर्मुख झाला. बायकोला खांद्यावरुन खाली उतरवलं. थंड पाणी प्यायला दिलं. रात्री पुंडलिकाने शुध्द अंतःकरणाने आपल्या आईवडीलांची क्षमा मागितली. मुळातच सात्विक स्वभाव असलेल्या त्याच्या आईवडिलांनी त्याला प्रेमाने जवळ घेतलं. तिघांच्याही डोळयातून अश्रू वाहू लागले ! 'अश्रू' कसले. त्या तर होत्या पवित्रमच गंगा-यमुना ! बदलला, पुंडलिक पूर्णतः बदलला. अंतबार्ह्य बदलला 1 अखेर त्याच्यातील 'देवत्वा'ने राक्षसत्वावर मात केली ! स्त्रीलंपट पुंडलिक, भोगललोलूप पंडलिक निस्सीम निमित्त मातृपितृ भक्त बनला ! वाल्याचा जणू वाल्मिकी बनला !!
भगवंत प्रसन्न झाला-
पुढे पुंडलिकाने आपल्या वृध्द मातापित्यांना काशी तर घडवलीच पण पंढरपूरासही आणले.
'अन्य क्षेत्रं कृतं पापं तीर्थक्षेत्रे विनश्यति ' या उक्तीनुसार पुंडलिकाच्या पश्चातापामुळे त्याची पूर्वीची सर्व पापे काशी पंढरपूर या तीर्थक्षेत्रामध्ये नष्ट झाली. वाल्याचा जसा वाल्मिकी बनला होता तसा भोगी पुंडलिक आता योगी बनला होता !
एकदा काय झालं, रुक्मिणी श्रीकृष्णावर रुसून पंढरपूरच्या दिंडीरवनात येऊन बसली. रुसलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी देव बाहेर पडले. पुंडलिकाची मातृपितृभक्तीही श्रीकृष्णाला पहायची होती. आजमायची होती. भगवंत पंढरीत आले. पंडुलिकाच्या घराच्या दारात उभे राहिले. आत पहातात तो पुंडलिक खरोखरच आपल्या आईवडिलांची सेवा करणउयात गुंग झालेला होता. साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाच्या दारात तिष्ठत उभा होता.
'देव भावाचा भुकेला । सोडूनी आला वैकुंठाला ॥''
आणि तरीही त्याच्या स्वागताला उठला नाही नव्हे तर जागचा हाललाही नाही. आईवडिलांच्या सेवेत खंड कसा पडू द्यायचा ? त्याने बसल्या जागेवरुनच सुहास्य वदनाने भगवंताला विनम्र अभिवादन केले. सेवेचं व्रतही मोडता येईना अन् भगवंताच्या स्वागताचा गृहस्थधर्म ही पाळता येईना. पुंडलिकापुढे मोठेच धर्मसंकट उभे राहिले. तेव्हा त्याने जवळचं पडलेली एक विट दाराबाहेर फेकली आणि सेवा पूर्ण होईतोपर्यंत भगवंताला त्या विटेवर उभं रहायला सांगितले. आणि आश्चर्य असे की तो सावळा विठूराया कर कटावर ठेवून चक्क त्या विटेवर उभा राहिला. ख-या भक्तांसाठी प्रभू सर्व काही करतात ते संत जनाबाईला दळण दळू लागतात ! कबिराचे शेले विणू लागतात ! दामाजीसाठी तर झाला महार पंढरीनाथ ! पुंडलिकाची असीम मातृपितृभक्ती पाहून भगवंत प्रसन्न झाले आणि त्याला 'वर' माग म्हणाले. तर त्याने काय मागावे ? पैसा ,धनदौलत ? शेती वाडी ? भक्त पुंडलिकाने विचार केला. लौकिकाची प्राप्ती आपल्या पराक्रमाने करायची असते आपण अलौकिक असं काही तरी मागावं तो म्हणाला,' देवा ! मला माझ्या प्रपंचासाठी काहीही नको ! मला फक्त तू हवा आहेस ! आत्ता जसा उभा आहेस ना तसाच तुझ्या भक्तांसाठी तू इथचं सतत उभा रहा आणि त्यांना तुझं परमपवित्र दर्शन सतत घडू दे !'' देव म्हणाले 'तथास्तु' ! आणि तेव्हापासून हे विटेवरलं परब्रह्म कमरेवर हात ठेवून 'अठ्ठावीस युगे' म्हणा की सातशे वर्षे म्हणा- भक्तांचं कोड पुरवित आहे. पुंडलिकामुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागलेला आहे ! त्याचे पाय 'समचरण' आहेत. सर्वांकडे तो समत्वदृष्टीने पहातो. त्याच्या पायी जो लागतो तोही समत्वदृष्टी प्राप्त करुन घेतो. धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृपितृभक्ती!
-दै. पंढरी, पंढरपूर

श्री विष्णुसहस्त्रनाम विवरण: आध्यात्मिक दीपस्तंभ !

ईश्वर निष्ठांची मांदियाळी असलेल्या भागवत् सांप्रदायातील संत महंतांनी आचार, विचार, उच्चार,भक्ती, श्रध्दा, प्रेमभाव, नम्रता, शांती, समभाव, च्यारित्र्य सुचिर्रभुतता या संस्कृतिप्रीय मुलतत्वावर आधारलेले साहित्य साधकासाठी, भक्तासाठी, अभ्यासकासाठी, चिंतनकासाठी निर्माण केले. वेदापासून अगदी काल परवा पर्यंत आध्यात्म शास्त्रावर आधारीत साहित्य निर्मितीने एक वैचारिक परिवर्तनाची क्रांती घडवून आणली. हे परिवर्तन समाज सुजाण वैचारिक संपन्न व गुणसमुच्चयानी नटलेला ,थाटलेला इतकेच नव्हे तर चिंतनशील झालेले दिसते. भगवद्गीतेसारखा तत्वज्ञानाच्या हिमशिखरावर बसलेल्या ग्रंथाचे विवरण करणारे साहित्य विपूल प्रमाणात निर्माण झाले. पण अधिष्ठीत देवता असलेल्या श्री भगवंताला आनन्य भावाने शरण जावून जे विष्णुसहस्त्रनाम तत्वज्ञानाच्या रुपाने सांगितले गेले ते सश्रध्द भाविकापर्यंत पोहोचविण्याची साहित्य निर्मिती क्वचित आढळून येते. गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासात श्री विष्णुसहस्रनामावर अतिशय सखोल अभ्यासपूर्ण आणि अगम्य असे विवरण करण्याचा जो पहिला प्रयत्न केला तो नाशिकचे काव्यतीर्थ, आचार्य वेदान्तवाचस्पती श्री ह.भ.प. जगंन्नाथ महाराज पवार यांनी.
11 नोव्हेंबर 2006 रोजी श्री विष्णुसहस्त्रनाम विवरण अर्थात सहस्त्रनाम प्रवचने ग्रंथाचे पहिले पाच खंड माझ्या हाती पडले. हा ग्रंथ वाचत असताना श्री पवार महाराजांनी केलेला हा प्रयत्न भागवत् सांप्रदायाच्या अभ्यासकासाठी एक पर्वणीच नव्हे तर उपकारकारक ग्रंथ ठरावा असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. हा ग्रंथ वाचत असताना सगळयात महत्वाचे काय असेल तर शरानी शीर्ण जखमी झालेल्या भीष्माचार्यांच्या तोंडून श्री भगवंताच्या आदेशावरुन श्री विष्णुसहस्त्रनामाचे प्रगटीकरण धर्मराजाच्या समोर झाले नव्हे तर धर्मराजाकरीता झाले त्यावेळचे ते भावविश्व त्यावेळचे ते दृश्य हा ग्रंथ वाचत असताना वाचकाच्या समोर जसेच्या तसे उभा राहते. हे या ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ठय आहे. जी साहित्य निर्मिती वाचकाच्या भावविश्वाला भावनीक नाते जोडायला लावते ती साहित्य निर्मिती अजरामर तर होतेच शिवाय त्या साहित्य निर्मितीने सामाजिक जागरणाची प्रक्रियाही घडते. या जातीतलेच श्री पवार महाराजांची ही साहित्यकृती आहे असा माझा विश्वास झाल्यानंतर दै.'पंढरी संचार' च्या माध्यमातून ती वाचकाच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. तर उचित ठरले. या भावनेनी गेल्या वर्षभरापासून श्री विष्णुसहस्त्रनाम विवरण ग्रंथातील क्रमशः थोडासा उतारा प्रसिध्द होत आहे. याला वाचकानी जी दाद दिली ती मोठी विलक्षण वाटली. विष्णुसहस्त्रनामाच्या पहिल्याच नमन प्रकरणात ह.भ.प.पवार महाराज म्हणतात,' विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र हे कलियुगातील जीवासाठी आवश्यक असे साधन आहे. कारण कृत, त्रेत आणि व्दापार या तीन्ही युगात अनुक्रमे भगवंताचे ध्यान यज्ञ आणि पूजा या साधनांनी सफलता लाभत असे. दोष संपन्न अशा कलियुगात मात्र कामक्रोधादि विकाराने कलुषित असलेल्या जीवांना चित्ताची एकाग्रता व अन्य सामग्री यांच्या आभावामुळे वरील उपयांचे अनुष्ठान अशक्य प्राय आहे. सर्व साधनांचे सार सर्व दुःखनिवारक, साधे, सोपे , सरळ नी सुलभ असे भगवंत नामसंकिर्तनच त्यांना एैहिक पारलौकिक व निरतिशय अशा मोक्ष सुखाची प्राप्ती करुन देणारे आहे.'
ह.भ.प.पवार महाराजांनी आपल्या या प्रास्ताविकात व्यक्त केलेल्या विचारावरुन या ग्रंथाचे महात्म्य किती पराकोटीचे, उंचिचे आणि परमभाग्यनिर्मितीचे आहे याचे भान वाचकाला आल्याशिवाय रहात नाही.
बाणशय्येवर भगवंताचे नामस्मरण करीत असलेल्या भीष्माने धर्मराजासह भेटायला गेलेल्या श्रीकृष्ण भगवंतास नम्रपणे सांगितले, 'देवा माझे मन,बुध्दी इत्यादी सर्व तुला वाहिले आहे.शरीर हे शरांनी शीर्ण जखमी झाले आहे असंख्य वेदनांनी मला सदैव मर्ुच्छापन्न केले आहे आता केवळ तुझे स्मरण करीत मी उत्तरायणाची वाट पहात जीवंत आहे. या भीष्माच्या विनंतीवर आपण धर्मराजास सर्व धर्माचा उपदेश करा, आपले क्लेश ,कष्ट, वेदना, मोहादी सर्व नष्ट होतील. यावर धर्मराजाने भीष्मास धर्मविषयक काही प्रश्न विचारले व त्याची उत्तरे दिल्यानंतर सर्व धर्मश्रेष्ठ असा धर्म कोणता ? हे विचारल्यानंतर त्यास उत्तर म्हणून भीष्माने जे दिले तेच हे विष्णुसहस्त्रनाम होय. विष्णुसहस्त्रनामाचे बीज नेमके कुठे आहे याची उकलसुध्दा अत्यंत सुचक शब्दात ह.भ.प.पवार महाराजांनी केल्याने श्री विष्णुसहस्त्रनामा बाबत जी उकल होते ती नवीन साधकाच्या दृष्टीने महत्वाची वाटते.
ह.भ.प.जगंनाथ महाराज पवार हे वारकरी सांप्रदायातील एक अभ्यासू व्यक्तीमत्व आहेच शिवाय श्री संत ज्ञानेश्वर माऊली श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आदी संतांच्या विचाराचा धागा पकडून सर्व सामान्य भाविकावर मार्गदर्शनाचा अमृतकुंभ रिता करणारे उत्कृष्ट धार्मिक मार्गदर्शकही वाटतात. आजकाल वारकरी सांप्रदयात संतांनी घालून दिलेल्या शिस्तीचा विचार सांप्रदायाची मुलभुत तत्वे भल्याभल्याकडून बाजूला ठेवली जावू लागली आहेत. दाभिंकपणा ,शिष्टाचार आणि संत विचाराच्या तत्वज्ञानावर पोटार्थी होण्याची भावना संत लावून घेणा-या अनेकांच्या अंगी जी शिरलेली दिसते या विचारधारेला ह.भ.प.श्री.पवार महाराज यंानी पुर्णपणे छेद दिलेला दिसतो. संतांचे तत्वज्ञान हे साधकाचे ,भक्ताचे वारक-यांचे आत्मतत्वज्ञान झाले पाहिजे त्यासाठी समाजाला जे मार्गदर्शन केले पाहिजे ते मार्गदर्शन करणाराही तीतकाच तत्वज्ञानाचा परमभक्त असला पाहिजे.हे गृहीत सत्य आजकालचे सांप्रदयातील दंभाचारी विसरुन जावू लागलेले आहेत. हे सांप्रदायाचेच दुर्दैव म्हणावे लागेल. रस्त्याला कडेला लागलेले बोर्ड कीर्तन-प्रवचनासाठी उभारलेले पेंडॉल ,मिळत असलेला मान मरातब समाजाने प्रतिष्ठेची घातलेली झूल या सगळया प्रलोभनात आमचा सांप्रदायीक अभ्यासक आणि मार्गदर्शक हरवलेला दिसत आहे. अशा या यावातावरणात संतांच्या तत्वज्ञानावर पोट भरण्यापेक्षा समाजाची आध्यात्मिक भूक भागविण्याचा आपल्यापरिने प्रयत्न करणारे जे सुचिर्भुत संत-महंत आणि अभ्यासक आहेत. त्यात ह.भ.प.जगंन्नाथ महाराज पवार यांचा समावेश आहे असे विश्वासाने वाटते आणि हाच धागा पकडून श्री विष्णुसहस्त्रनाम विवरण अर्थात सहस्त्रनाम प्रवचने ही पाच खंडामध्ये त्यांनी प्रसिध्द केली. ग्रंथातल्या प्रत्येक पानावर आधात्मिक अनुभूती आणि ईश्वराविषयी असलेली श्रध्दा वृध्दींगत करणारी भावना वेगळी प्रचिती देवून जाते. हे या पाचही खंडाचे सर्वात मोठे वैशिष्ठय आहे.
श्री.ह.भ.प.जगंन्नाथ महाराज पवार यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विष्णुसहस्त्रनाम् मातृ-पितृसेवा मंदिर बांधण्याचा एक प्रकल्प हाती घेतला आहे. वीटेवर उभा असलेला श्री पांडुरंग भक्तीच्या तालावर खुळखूळू वाहणारी चंद्रभागा, अजूनही 28 युगं दर्शनासाठी आतूर झालेला पुंडलिकराय हे जसे या पंढरीचे वैभव आहे असेच एक वैभव चंद्रभागेच्या तीरावर मातृ-पितृ सेवा मंदीराच्या प्रकल्पाच्याव्दारे साकार होत आहे. सत्य संकल्पाचा दाता हा साक्षात नारायण असतो श्री पवार महाराजांनी अत्यंत कष्टातून असंख्य व्यावधानातून लोकांच्यापुढे दया याचना करुन उदार आश्रय दात्यांच्या आधारावर हा प्रकल्प राबविण्याचा जो प्रयास चालू केला आहे हे काम त्यांच्या बौध्दिक कतृत्वापेक्षा त्यांची अध्यात्मिक उंची सिध्द करणारा असा आहे.
श्री विष्णुसहस्त्रनाम ग्रंथाचे दहा खंड प्रसिध्द झाल्यानंतर महाराष्ट्राच्या आध्यत्मिक संस्कृतित त्याला एक वैभव निर्माण होईल असा विश्वास वाटतो.

- बाळासाहेब बडवे, (दै.पंढरी, पंढरपूर)

आषाढी यात्रेचा अन्वयार्थ...

आषाढी यात्रेचा अनुपम सोहळा काल गुरुवारी अतिशय उत्साही,आनंदी आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. श्री.संत ज्ञानेश्वर माऊली ,जगद्गुरु तुकाराम महाराज ,संतशिरोमणी नामदेवराय, प्राणिमात्रात भेदाभेद अमंगळ माननाने पैठणचे एकनाथ महाराज आदी संतांच्या प्रभावळीने साहित्य रुपाने त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाने भागवद् संप्रदयाची सांस्कृतिक परंपरा वैभवाच्या मेघडंबरीत जणूकाही बसली आहे. असा साक्षात्कार यात्रेला आलेल्या प्रत्येक वारकरी भाविकाला झाल्याशिवाय रहात नसेल. वेदविद्येचा व्यासंग त्यावर असणारे प्रभुत्व आणि संताच्या शिकवणीने लाखो भाविक,श्रोते प्रभावित करण्याची एक कीर्तनकार, प्रवचनकार , अभ्यासक यांची मांदीयाळी त्यांनी दिलेल्या विचारांच्या धनाने दिवसेंदिवस भागवत् सांप्रदायाची संस्कृती फुलत आणि खुलत चालल्याचे चित्र दिसत असून भारतीय घटनेत जे सर्वधर्म समभावाचे मुलभुत तत्वज्ञान सांगितले आहे त्या तत्वज्ञानाचे दर्शन प्रत्यक्ष कृती ,दिंडी सोहळा आणि यात्रेच्या निमित्ताने पहायला मिळते. कोणे एकेकाळी समाज सुशिक्षीत नव्हता धर्ममार्तंडांनी धर्माच्या नावावर समाजावर जणू काही एक प्रकारची ग्लानी निर्माण केली होती. कर्मकांडाचे स्त्रोत माजले गेले होते. अशा कालखंडात संतांच्या विचारांचा उदय झाला. त्यांची भक्तीप्रधान दृष्टी मार्गदर्शनाच्या रुपाने समाजभक्तीमय व्हावा यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन समाजकल्याणात आत्मकल्याण साधण्याचा दिलेला बोध ,समाज मानसावर एवढा बिंबला गेले की त्याचा आज सांप्रदायीक वटवृक्ष उभारलेला दिसेल. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत रोहीदासांपर्यंत अठरा पगड जातीच्या संतांना या भागवत् सांप्रदायाने कवटाळून धरले. इथे ब्राह्मण-मराठा ,शुद्र-वैश्य ही जातीपातीची बंधन या संतांच्या विचारांनी तुडवून टाकली आणि फक्त विठ्ठल भक्तीचे अधिष्ठान हा वैश्विक कल्याणाचा मार्ग आहे हे प्रत्यक्ष कृतीत उतरुन दाखविले. आज सातासमुद्रापलिकडे सुध्दा वारकरी सांप्रदयाचे अनुयायी ,अभ्यासक तत्वचिंतक, साधक प्रकर्षाने जाणवण्या एवढया संख्येने वृध्दींगत होत आहेत. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे. आत्मकल्याण, समाजकल्याण आणि शेवटी विश्वकल्याणाचा महामंत्राच्या रुपाने सांप्रदयातील सर्व संतांनी आग्रहाने प्रतिपादन केला. त्याचीच ही प्रचिती मानावी लागेल. पुण्याच्या विश्वशांती (माईर्स) संस्थेचे संस्थापक एक थोर भगवत्भक्त डॉ.विश्वनाथ कराड यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान हे विश्वगीत असा सिध्दांत प्रस्तापित करण्याचा सुरुवात केली. वयाच्या 13 व्या वर्षी संपुर्ण जगातील धर्मतत्वज्ञानापेक्षा विश्वकल्याणाचे तत्वज्ञान सांगणारे ज्ञानेश्वर महाराज यांनी पांडूरंगाला विश्वदेवाची उपमा दिली आणि त्या विश्वदेवाला अखेरचं मागणं मागताना पासायदानात सांगितले , 'जो जे वांच्छिल तो ते लाहो प्राणिजात ' विश्वाच्या कल्याणाची करुणा परमेश्वराजवळ भाकणारे संत ज्ञानेश्वर आणि ' जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले' असे सांगणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी विश्वकल्याणाचा मार्ग या सांप्रदयाला आणि जनतेला दाखविला. एवढया लहान वयात कोणत्याही प्राणिमात्रात भेदाभेद न करता ज्याला जे पाहिजे त्याला ते दे असे मागणे मागणारे संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे पसायदान विश्ववंद्य आहे. म्हणून ते विश्वगीत झाले पाहिजे. डॉ.कराड यांचे जीवनच संत माऊली आणि संत तुकोबामय झाल्याने त्यांनी पसायदानाला विश्वगीताची दिलेली उपमा ही अत्यंत समर्थनिय अशी आहे. जे आमच्या राज्यकर्त्यांना समजले नाही ते एका माऊली भक्ताला समजले आता त्याची तरी रि ओढून आमच्या राज्यकर्त्यांनी संत ज्ञानेश्वरांचे हे पसायदान चवथीपासून ते पदवीपर्यंतच्या सर्व पाठयपुस्तकाच्या प्रारंभी हे पसायदान जर छापण्याचा प्रयत्न केला तर आपल्या शैक्षणिक क्षेत्राच्या वातावरणात एक अमुलाग्र क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. क्रांती आणि परिवर्तन हे सहज उच्चारले जाणारे शब्द असले तरी ते प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी तितकाच तोलामोलाचा फुतकार असावा लागतो. हा फुतकार , हा हुंकार पसायदानात आणि संतांच्या मार्गदर्शनात ,विचारात आहे.म्हणून 700 वर्षाहून अधिक काळ वारकरी सांप्रदयाची चालत आलेली परंपरा फुललेली आणि बहरलेली दिसते. त्याचे मुळ पसायदानासारख्या संतांच्या मार्गदर्शक साहित्यात आहे. जात-पात -धर्म-लिंग-श्रीमंती-गरीबी या सगळया वेदांना छेद देवून फक्त विठेवरील विठ्ठल हाच खरा विश्वदेव आहे कारण भागवत् सांप्रदायाचा आत्मा हाच विठ्ठल आहे. आषाढी यात्रेच्या अपूर्व सोहळयाचा यापेक्षा दुसरा अन्वयार्थ कोणता असणार.
- अनिरुध्द बडवे, (दैनिक पंढरी, पंढरपूर)

Wednesday, July 25, 2007

'लोकमत' व 'महाराष्ट्र टाइम्स' चे आभार

'लोकमत' व 'महाराष्ट्र टाइम्स' चे आभार
आणि अर्चना राणे यांना धन्यवाद...
'लोकमत' ने आपल्या २६ जुलै 2007 च्या 'हॅलो मुंबई' या अंकात पान नं ४ वर अर्चना राणे यांचा 'पंढरपुरवारी आता इंटरनेटवर' हा लेख प्रसिद्ध करुन आपण ह्या ब्लाँगची आवर्जुन दखल घेतली. त्याबद्दल मी लोकमत चे मन:पूर्वक आभार मानतो. लेखाचे कर्तेत्या अर्चना राणे यांनाही धन्यवाद देतो.
'लोकमत' च्या दिनांक २६ जुलै 2007 च्या आँनलाईन आवृत्तीत इंटरनेटवर तुम्ही हा लेख केव्हाही वाचू शकता त्यासाठीच ही घ्या लिंक.
त्याच दिवशी म्हणजे दि. २६ जुलै 2007 रोजी 'महाराष्ट्र टाइम्स' ह्या ब्लाँग संदर्भात बातमी प्रसिद्ध केली आहे. ही बातमी पान नं ५ वर देण्यात आली आहे. ही बातमी प्रसिद्ध केल्या बद्दल त्यांचे आभार मानतो.
धन्यवाद
विश्वनाथ खांदारे

Thursday, July 12, 2007

महाराष्ट्र टाइम्सचा आषाढी विशेषांक प्रसिद्ध....

पंढरपूरची माहिती लोकांनापर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स या दैनिकांनी दि. 12 जुलै रोजी आषाढी विशेषांक प्रसिद्ध केला आहे. हा विशेषांक प्रसिद्ध करण्याचे संयोजक विश्वशांती केंद्र (आळंदी माईर्स एमआयटी, पुणे, भारत यांनी केले आहे. या अंकात भरतकुमार राऊत यांनी लिहिलेले 'नाचती वैष्णव भाई रे..' ! यामध्ये आषाढीसारखा जनतेचा उत्सव क्वचित आढळेल असे ते म्हणतात. ह्या विशेषांकात या वारीत... असे मुख्य भाग असून या विशेषांकसाठी मान्यवर डाँ. विश्वनाथ दा. कराड, रघुनाथ मेदगे, गंगाराम तळेकर यांचे लेखन आपणास वाचायला आवडेल. डाँ. जयंत नारळीकर, डाँ. रघुनाथ माशेलकर, डाँ विजय पा. भटकर असे विज्ञानवंतांची मुलाखतीही चांगल्या झाल्या आहेत. विशेषांक मांडणी व छपाई उत्तम आहे.
त्या अंकाची काही लेख http://maharashtratimes.com/ ह्या संकेतस्थाळवर उपलब्ध आहेत.

Friday, July 6, 2007

वारी पंढरीची...

दै. सकाळ यांच्या वेबसाईटवर वारी पंढरीची.. मुख्यपानावर लिंक दिलेली आहे. यांत वारी पंढरीची याविषयीची माहिती आहे.
यांत त्यांनी आँडिओ, वारीचे महात्म्य, वारकरी, दिंडी, असे विभाग केले आहे. ह्या साईटवर जाण्यासाठी ही लिंक खाली दिलेलीआहे. http://www.esakal.com/features/pandharichiwari/wari_main.html - दै सकाळ आभार

Thursday, July 5, 2007

पूररेषेच्या तडाख्यात विठ्ठल मंदिरे

पूररेषेतील नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे पंढरपूरवासीय धास्तावले असून, नव्याने आखण्यात आलेल्या 'रेड लाईन' पुररेषेत पंढरपूर शहराचा 90 टक्के परिसर पाण्याखाली येत असल्याचे दर्शविले आहे. भविष्यात शासन पुनर्वसनाच्या मुद्यावर अडून बसले तर श्री विठ्ठल मंदिरासह सुमारे 25 हजार कुटुंबाचे स्थलांतर करण्यासाठी एक नवे पंढरपूर शासनाला विकसित करावे लागणार आहे.
भीमेला सातत्याने येणारा पूर अन् या पुरामुळे पंढरीतील नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी शासनाने गांभीर्याने विचार केला आहे. पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत हा विषय मांडून पूररेषेतील लोकांचे कायम पुनर्वसन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला.
पंढरपूर शहर हे समुद्रसपाटीपासून साधारण 460 मीटरच्या उंचीवर आहे. यापूर्वी 452 मीटरपर्यंत पुराच्या पाण्याने पातळी गाठली होती. ही परिस्थिती लक्षात घेता नव्याने दाखवितात आलेली 'रेड लाईन' रेषा ही 458 मीटरपर्यंत दाखविण्यात आली आहे. म्हणजे या रेषेत शहर व उपनगरातील 90 टक्के परिसर येतो. ही गोष्ट धक्कादायक असून, यात पंढरपूर कॉलेज, शासकीय वसाहत, तालुका पोलीस ठाणे, परदेशी नगर, गुरुकृपा सोसायटीचा काही भाग, यमाई तलाव या खालचा संपूर्ण परिसर पुराच्या पाण्याखाली जाईल.
'ब्लू लाईन'साठी तीन लाख क्युसेक्सपर्यंत पाणी भीमेत सोडावे लागते, तर 'रेड लाईन'चा परिसर पाण्याखाली येण्यासाठी सुमारे दहा लाख क्युसेक्स पाणायाची आवश्यकता आहे. मुसळधार पाऊस आणि पाणी थोपविण्यासाठी असलेली अपुरी साधने लक्षात घेता शासनाच्या पूर नियंत्रण विभागाने ही 'रेड लाइन' तयार केली आहे. या 'रेड लाइन'वरुन जर शासनाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला, तर पंढरपूर शहरातील सुमारे 25 हजार कुटुंबाचे स्थलांतर करावे लागेल.
- सुनील उंबरे ( दै सामना)

Monday, June 25, 2007

पंढरपूर क्षेत्र - परिसरातील मंदिरे.... (भाग -2)

8) श्री. द्वारिकाधीश मंदिर (श्रीमंत शिंदे सरकार वाडा ) : महाद्वार घाटावरच भव्य, दगडी तटबंदी असलेले श्री द्वारिकाधीशाचे मंदिर आहे. हे मंदिर बाहेरुन किल्ल्यासारखे दिसते. मंदिराला चार भव्य दरवाजे आहेत. देवळात चारही बाजूला प्रशस्त ओवऱ्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर जय-विजयाच्या मूर्ती आहेत. मुख्य मंदिरातील श्रीद्वारिकाधीशा (मुरलीधर)ची शाळीग्रामची मूर्ती अतिशय देखणी आहे. मूर्ती चतुर्भुज आहे. मस्तकी चांदीचा मुकुट आहे. या मंदिरात गोकुळ अष्टमीस तीन दिवस मोठा उत्सव असतो. या मंदिराचे बांधकाम 1249 साली करण्यात आले. ग्वालियरचे महाराज दौलतराव शिंदे यांच्या पत्नी महाराणी बायजाबाई महाराज राणीसाहेब यांनी बांधले, याच मंदिरात श्रीराधिका, श्रीरुक्मिणी, श्रीगणपती व गरुड तसेच बाइजाबाईसाहेब महाराज यांच्या मूर्ती आहेत. या मंदिर व वाडयाच्या बांधकामाच्या भक्कमपणाची परीक्षा पाहण्यासाठी वाडयावरुन हत्ती फिरवले गेल्याची कथा सांगितली जाते.
9) ताकपिठे विठोबा मंदिर : श्रीविठ्ठल मंदिराचे पिछाडीस पश्चिमद्वार रस्त्याला, चौफाळयाकडून मंदिराकडे जाताना उजव्या हाताला, मंदिरापासून फक्त 250 ते 300 फूट अंतरावर हे प्राचीन ऐतिहासिक मंदिर आहे. पुढे सभामंडप आहे. मुख्य व्यासपीठावर श्रीविठ्ठलाची मूर्ती आहे. हे मंदिर सन 1618 साली रमाबाई नावाच्या एका ब्राम्हण महिलेने बांधले असा ऐतिहासिक पुरावा आहे. ती श्रीविठ्ठलभक्त होती. रोज 'श्री'ना ताक व पीठ एकत्र करुन नैवेद्य दाखवीत असे. स्वत: श्री विठ्ठलनाथ तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन ताकपीठ खाण्यासाठी येत असत, अशी एक कथा आहे. या मंदिरातील मूर्तीत व मुख्य मंदिरातील मूर्तीत साम्य आहे. यात्रा काळात गर्दीमुळे मुख्य मंदिरातील श्रीविठ्ठलाचे दर्शन झाले नाही तर भाविक वैष्णवभक्त इथे येऊन दर्शन घेतात. येथील व्यवस्था महाजन बडवे यांच्याकडे आहे.
9) गोपालकृष्ण मंदिर : एस् टी स्टँडकडून मंदिराकडे जाताना चौफाळा भाग लागतो. याच चौफाळयात दगडी बांधकामाचे इंद्रापूरच्या नारायण नाखरे नावाच्या व्यक्तीने 1770 साली बांधलेले गोपालकृष्ण मंदिर आहे. हे मंदिर श्रीविट्ठल मंदिराच्या पश्चिमेस आहे. यात्राकाळात नगर प्रदक्षिणेला जाणाऱ्या सर्व दिंडया, पालख्या इथे थांबवितात, अभंग म्हणतात. या ठिकाणाहून श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कळसाचे दर्शन होते. या मंदिरावर शिखर आहे. मंदिरातील श्रीगोपाळकृष्णाची मूर्ती अतिशय सुंदर, मनमोहक आहे. या मंदिरात गोकुळ अष्टमीस उत्सव होतो व दहीहंडीचा कार्यक्रम होतो. या मंदिराच्या मागील बाजूस श्रीविठ्ठल मंदिराकडे मुख करुन बसवलेली श्रीगजाननाची पितळी मूर्ती आहे. भाद्रपद महिन्यात या ठिकाणी दहा दिवस धार्मिक कार्यक्रम होतात.
9) काळा मारुती मंदिर : प्रदक्षिणा मार्गावर विठ्ठल मंदिराच्या दक्षिणेस काळामारुतीचे भक्कम दगडी बांधकाम असलेले मंदिर आहे. गर्भागार व 4 खांबांवर आधारलेला सभामंडप असे या मंदिराचे दोन भाग आहेत. सन. 1799 साली रामचंद्र नावाच्या एका गरीब ब्राह्मणाने हे मंदिर बांधले व 1960 साली मुंबईच्या एका गुजराती वैष्णवाने सभामंडप बांधला असा संदर्भ सापडतो. हनुमानजयंतीला येथे मोठा उत्सव होतो. या मंदिराचे संदर्भात असे सांगतात की संत भानुदासाने अनागोंदीहून भक्तिबळावर आणलेली विठ्ठलमूर्ती वारकऱ्यांनी वाजतगाजत मंदिरात नेली व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. या विजयाचे स्मारक म्हणून काळया मारुतीची स्थापना केली गेली. इथे थांबून विजयाचा अभंग गातात.
10) नामदेव मंदिर : प्रदक्षिणेच्या मार्गावर विणेगल्लीजवळ कासार घाटाशेजारी नामदेव मंदिर आहे. केशवराज संस्थेने या मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे. या मंदिराची जागा पूर्वी नामदेव टेकडी म्हणून प्रसिध्द होती. याच जागेत विठुरायाचे लाडके भक्त संत नामदेवांचे वास्तव्य होते. याच जागेवर भव्य व अतिशय सुंदर असे मंदिर बांधले असून मंदिरात संतश्रेष्ठ श्रीनामदेव व श्रीकेशीराज (श्रीविठ्ठल) यांच्या अत्यंत मनमोहक मूर्ती आहेत. संत जनाबाईचीही छोटी मूर्ती या मंदिरात आहे. या मंदिरात संत नामदेवाच्या 16 व्या पिढीतील वंशज राहतात. मंदिरात नामदेवरायांची हस्तलिखित गाथा आहे. मंदिरात संत नामदेवांची पुण्यतिथी हा मंदिरातील मुख्य उत्सव आहे
11) श्रीधर स्वामी समाधी मंदिर : कुंभार घाटावर हे समाधिमंदिर आहे. 250 वर्षांपूर्वी होऊन गेलेले श्रीधर स्वामी नाझरेकर महान भक्त व श्रेष्ठ कवी होते. त्यांनी शिवलीलामृत, रामविजय, हरिविजय, पांडवप्रताप, अंबिका उदय इ. प्रासादिक ग्रंथांची रचना केली. आजही या ग्रंथांचे घराघरांत वाचन, पारायण केले जाते. माघ महिन्यातील वद्य पंधरवडयात तृतीयेस श्रीधरस्वामींची पुण्यतिथी उत्सव, धार्मिक कार्यक्रम करुन साजरा करतात.
12) श्रीज्ञानेश्वर मंदिर व श्रीनाथ मंदिर : प्रदक्षिणेच्या मार्गावर नाथ चौकात ही दोन संतांची मंदिरे आहेत. आळंदीच्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने या मंदिराच जीर्णोध्दार करण्यात आला आहे. मंदिरावर मंदिरावर सुंदर शिखर बांधले आहे. या मंदिरात श्रीज्ञानेश्वर माऊलींच्या पितळी मुखवटा आहे. आषाढी यात्रेत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पालखी इथेच असते. इथून जवळ श्रीनाथ मंदिर आहे. एकनाथ षष्ठीला इथे उत्सव होतो.
याशिवाय पंढरपुरात अनेक मंदिरे आहेत. त्यांपैकी रामबागेत श्रीरामाचे मारवाडी समाजाचे मोठे मंदिर आहे. हे मंदिर अंबाबाई पटांगणाजवल, श्रीव्यास-नारायणाचे मंदिरासमोर आहे. येथे प्रतिवर्षी रामजन्मोत्सव मोठया थाटामाटाने संपन्न केला जातो.
सावरकर पथावर दाक्षिणात्य पध्दतीचे आकर्षक प्रवेशद्वार असणारे लक्ष्मणबाग नावाचे श्रीलक्ष्मी-व्यंकटेशाचे मंदिर आहे. याचे व्यवस्थापन मारवाडी समाजाकडे आहे.

Friday, June 22, 2007

पंढरपूर क्षेत्र - परिसरातील मंदिरे.... (भाग -1)

1) अंबाबाई मंदिर : लखुबाई मंदिरापासून जवळ नदीच्या काठावर उत्तरेकडे हे मंदिर आहे. 1854 साली या मंदिराचा जीर्णोध्दार लिंबा नावाच्या नर्तकीने केला. असा उल्लेख सापडतो. मूळ हे मंदिर सिदु कोळी यांनी बांधले. पुढे हे मंदिर बडवे समाजाच्या ताब्यात गेले. या मंदिरात महिषासुरमदिंनी देवी अंबामातेची अत्यंत सुंदर, रेखीव, आकर्षक अशी 2॥ ते 3 फूट उंचीची पाषाणमूर्ती आहे. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा व नवरात्रात देवीदर्शनासाठी इथे गर्दी होते. नवरात्रात रोज नवनवीन प्रकाराने पूजा बांधली जाते. आरास केली जाते. अष्टमीस होम केला जातो. मंदिरासमोर दीपमाला व विटेचे अग्निकुंड आहे.
2) व्यास मंदिर : अंबाबाईचे मंदिराशेजारी पटांगणाच्या उत्तरेस रामबागेच्या समोर हे मंदिर आहे. आतील मूर्ती खूपच सुंदर आहे. हे मंदिर ज्योतीपंतदादा महाभागवत यांनी बांधले, असा एका ठिकाणी संदर्भ सापडतो. पूर्वी इथे भागवताची पारायणे होत असत. गुरुपौर्णिमा व पौष मासातील प्रत्येक रविवारी असंख्य लोक इथे दर्शनास येतात.
3) त्र्यंबकेश्वर मंदिर : विठ्ठल मंदिराजवळ रोकडोबा वेस (हरिदास वेस) कडे जाताना हे मंदिर आहे. जवळच कुंडलतीर्थ आहे. पूर्वी या मंदिराजवळ संस्कृत पाळशाळा होती. या मंदिरात सभामंडप व व्यासपीठ (गर्भगार ) असे दोन भाग आहेत. इथे महादेवाची मोठी पिंड आहे. त्यावर पितळी मुखवटा बसवला जातो. रोज दोन वळा 'श्री'ची पूजा केली जाते. महाशिवरात्र व श्रावणातील सोमवारी इथे उत्सव असतो.
4) पंचमुखी मारुती मंदिर : थोरल्या दत्त घाटा - (विप्र घाटा) जवळच हे छोटे मंदिर आहे. मूर्ती 7 फूटांची आहे. मूर्तीस पाच मुखे आहेत. एक हात कामरेवर आहे. दुसरा आशीर्वाद स्वरुपाचा आहे. येथील पूजा-अर्चा बैरागी पाहतात. हनुमान जयंतीस असंख्य बैरागी एकत्र जमून उत्सव साजरा करतात.
5) काळभैरव मंदिर व शाकंबरी मंदिर : श्रीविठ्ठल मंदिराजवळ महाद्वारात खाजगी इमारतीमध्ये हे मंदिर आहे. काळभैरवाची मूर्ती सुंदर आहे. मूर्तीचे एक हातात डमरु, गळयात माळ, कानात कुंडले, मस्तकी मुकुट आहे. शेजारी सेवकांची चित्रे आहेत. एक बाजूस जोगेश्वरीची छोटी मूर्ती आहे. मूर्तीशेजारी शिवलिंग आहे. सुमारे 400 वर्षांपूर्वी या ठिकाणी भैरवतीर्थ होते, तलाव होता. तलावाचे चारी बाजूस काळभैरव, महादेव, गणपती व बनशंकरी (शाकंबरी) देवतांच्या मूर्ती होत्या. स्नानगृहे होती. विजापूरच्या आदिलशहाच्या काळात या मंदिरावर हल्ला झाला. इथले दगड निझामाच्या आधिपत्याखाली असलेल्या परांडा गावी नेण्यात आले. इ.स. 1770 साली कोंकणे या सावकाराने काळभैरव मंदिर बांधले. या मंदिराजवळ श्रीबनशंकरी (शाकंबरी) देवीचे सुंदर मंदिर आहे. इथे चैत्रात भैरव अष्टमीला काळभैरव जयंती उत्सव होतो, तर पौष पौर्णिमेला शाकंबरी देवीकडील उत्सव होतो. याच भागात आत सराफकट्टा आहे. इथे असलेल्या श्रीगणेशमूर्तीचे रस्तारुंदीकरणाच्या वेळी स्थलांतर झाले. शांकबरी देवीचे मंदिर प्राचीन आहे. या मंदिरात दोन मूर्ती आहेत. एक मूर्ती शाकंबरीची आहे 2॥ फूट उंचीच्या देवीच्या मूर्तीला 4 हात आहेत. एका हाती डमरु, दुसऱ्या हाती तलवार आहे. एक हात मांडीवर आहे व एक आशीर्वादात्मक आहे. गळयात अलंकार आहेत. 1775 साली अगनळ यांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला. या दोन्ही मंदिरांची व्यवस्था बडवे समाजाकडे आहे.
6) मल्लिकार्जुन मदिर : श्रीविठ्ठल मंदिराच्या पूर्वभागत महाद्वारात हे प्राचीन व भव्य मंदिर आहे. गर्भागार व सभामंडप असे मंदिराचे दोन भाग आहेत. बांधकाम दगडी आहे. मंदिराला दोन प्रवेशद्वारे आहेत. सभामंडपात एका बाजूस गणपतीची मूर्ती आहे. शेजारी 5 फडयांच्या नागाची दगडी प्रतिकृती आहे. मध्यभागी पितळेच्या नंदी आहे. गर्भागारात श्री मल्लिकार्जुनाची भव्य अशी शाळुंका आहे. मूळ मंदिर छोटे होते. संत नरहरी सोनार याच महादेवाची उपासना करीत असे. त्यानेच या मंदिराचा विकास केला.
7) होळकरांचे राममंदिर : महाद्वार घाटावर, चंद्रभागेच्या तीरावर हे रामंदिर आहे. मंदिर व इमारतीचे बांधकाम अत्यंत भक्कम आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. मंदिराचा सभामंडप 60X28 फूट आहे. गर्भागार थोडे उंचावर आहे. व्यासपीठावर राम, लक्ष्मण व सीता यांच्या संगमरवरी दगडाच्या मूर्ती आहेत. 'शेजारी आहिल्याबाई होळकरांची मूर्ती आहे. समोर हनुमंताची मूर्ती उभी आहे. अहिल्याबाई शिवभक्त होत्या म्हणून मंदिरात शिवलिंगसुध्दा आहे. चैत्र महिन्यात दहा दिवस इथे कीर्तन-प्रवचनादी कार्यक्रम होतात. रामनवमीस मोठा उत्सव होतो. येथील व्यवस्था होळकर संस्थानचे वतीने बडवे यांचे नातेवाईक पाहतात. या वाडयात लग्न-मुंजीचे व अन्य धार्मिक कार्यक्रमही होतात.

Monday, June 18, 2007

पंढरपूर क्षेत्रातील तीर्थस्थाने....

1. लोहदंड तीर्थ : हे तीर्थ चंद्रभागेच्या पात्रात, पुंडलिकाच्या मंदिरासमोर 20-25 फुटांवर आहे. इथे दगडी नाव तरंगते असे म्हणतात. यी तीर्थामागची कथा अशी आहे. इथे दगडी नाव तरंगते असे म्हणतात. या तीर्थामागची कथा अशी आहे. - गौतम ॠषींची पत्नी सती अहिल्या हिचे इंद्राने गौतम ॠषीचे रुप घेऊन सतित्व हरण केले. गौतम ॠषींनी पत्नीला शिळा होण्याचा व देवेंद्राला सहस्त्र छिद्राने (भगाने) पीडित होण्याचा शाप दिला अहिल्येला उ:शाप मिळून भगवान रामचंद्राच्या पदस्पर्शाने ती पावन झाली. इंद्र भगवान विष्णूला शरण गेला. विष्णूंनी त्याच्या हाती एक लोहवंड दिला व तीर्थयात्रा करण्यास सांगितले आणि ''ज्या तीर्थात हा लोहदंड तरेल त्या तीर्थाच्या स्नानाने तुझी भगे (छिद्रे) जातील'' असा वर दिला. अनेक तीथें हिंडत-हिंडत देवेंद्र या तीर्थाजवळ आला. इथे लोहदंड तरला. हर्षिंत इंद्राने या तीर्थात स्नान केले, तो शाषमुक्त झाला. व्याधिमुक्त झाला म्हणून या तीर्थास 'लोहदंड तीर्थ' हे नाव पडले. या तीर्थाच्या निर्मितीची अशी आख्यायिका आहे, की भगवान शंकर-पार्वती आकाशमार्गाने जात असता सती पार्वतीस तहान लागली. भगवान शंकराने आपल्या त्रिशूळाने भूमीस छिद्र पाडले. त्यातून भोगावतीचे जल काढले. पार्वतीची तृष्णा भागली. तेच हे लोहदंड तीर्थ.
2. पद्मतीर्थ : मंदिराच्या पश्चिमेस सुमारे 1 कि.मी अंतरावर आहे. या ठिकाणी पद्मावती देवीचे मंदिर आहे. मंदिराभोवती पूर्वी तळे होते. तळयाभोवती भक्कम दगडी भिंत व घाट आहेत. भगवान शंकरासह आलेली पार्वती याच ठिकाणी थांबली होती असे म्हणतात. कान्ह्या हरिदास या संतकवीने केलेल्या काकड आरतीत या तीर्थाचा उल्लेख आहे. या तलावाचे बांधकाम इ. 1778 मध्ये सरदार यशवंत पवार यांनी केले असा उल्लेख सापडतो. या मंदिरात नवरात्र महोत्सवात देवीदर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. याची व्यवस्था बडवे पाहतात.
हे मंदिर सावरकर पथावर आहे. जवळच रेल्वे स्टेशन, एस.टी.स्टँड आहे. मंदिरातील तांदळा भव्य व सुंदर आहे. नामदेवाला घेऊन ज्ञानेश्वराची भावंडे तीर्थयात्रेला निघाली तेव्हा भगवान श्रीविठ्ठल त्यांना सोडण्यासाठी या स्थानापर्यंत आले होते. इथेच पांडुरंगाने नामदेवाचा हात ज्ञानेशअवरांच्या हाती दिला, असा उल्लेख एका अभंगात सांपडतो. इथे सुंदर बागबगीचा केल्यास पंढरपूरच्या सौंदर्यात निश्चितच भर पडेल. इथे नगरपालिकेने बांधलेले पद्मावती शाँपिंग सेंटर आहे.
3. कुंडल तीर्थ : श्रीविठ्ठल मंदिराच्या उत्तर बाजूस हरिदास वेशीजवळ हे तीर्थस्थळ आहे. याची आख्यायिका अशी - भगवान विष्णूंनी दैत्यांशी युध्द करण्याच्या प्रसंगी आपल्या कानातील कुंडले इथे काढून ठेवली होती म्हणून यास कुंडलतीर्थ म्हणतात. या तीर्थाशेजारी नृसिंहाची मूर्ती आहे. सध्या कुंडलतीर्थाची जागा बुजवली गेली असून नूसिंहाच्या नावाने एक पिंपळ उभा आहे. शेजारीच महादेवाचे मंदिर असून मंदिरात आद्य शंकराचार्यांची सुंदर मूर्ती आहे.
4. संगमतीर्थ : गोपाळपूरजवळ हे संगमतीर्थ आहे. भीमा व पुष्पा नद्यांचा या ठिकाणी संगम होतो. भगवान श्रीकृष्ण जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा यमुना दु:खी झाली. भगवंतांनी तिला पुष्पा नदीच्या रुपाने जवळ आणले अशी आख्यायिका आहे.
5. वेणुतीर्थ : संगमतीर्थापासून जवळच वेणुतीर्थ आहे. जिथे राधेने भगवान श्रीकृष्णाची वेणू अर्थात बासरी पकडली, त्या तीर्थाला वेणुतीर्थ असे म्हणतात.
6. गुंजातीर्थ : वेणुतीर्थाजवळ असलेल्या वा स्थानी भगवंताच्या मुकुटांतून काही गुंजा इथे गळून पडल्या म्हणून यास गुंजातीर्थ म्हणतात.
7. वृध्दकालेश्वर तीर्थ : गोपाळपूरपासून सुमारे 1 कि.मी. अंतरावर हे तीर्थ आहे. स्वत: यमधर्माने हे तीर्थ स्थापन केले म्हणून यास यमतीर्थ असेही म्हणतात.
8. पंचगंगातीर्थ : श्रीविठ्ठल मंदिरापासून सुमारे 8 कि.मी. अंतरावर उत्तरेच्या बाजूला नदीच्या पात्राजवळ हे तीर्थस्थान आहे. इथे तुंगा, सती, सुनी, कीर्ती व भृंगारी व 5 छोटया नद्यांचा संगम आहे. इथे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी व महाशिवरात्रीस इथे यात्रा भरते.
9. विष्णुपद तीर्थ : चंद्रभागा नदीच्या पात्रात पुंडलिक मंदिराच्या दक्षिणेस सुमारे 1 कि.मी. अंतरावर हे तीर्थ आहे. नदीच्या पात्रात पाषाणस्तंभावर दगडाचे बांधलेले 31 फूट परिघाचे व 12 फूट उंचीचे हे मंदिर आहे. या सोळखांबी आकाराच्या मंदिरची मूळ बांधणी इ. 1640 मध्ये धामणकरबुवांनी केली. पुढे सन 1875 मध्ये चिंतोपंत नागेश बडवे यांनी या मंदिरास सुंदर रुप दिले. मंदिरात मध्यभागी चौकोनात श्रीगोपालकृष्णाची समचरण व देहुडाचरण अशी दोन प्रकारची पावले आहेत. शेजारी गाईंची पावले (खूर) आहेत. दहिकाल्याच्या वाटीची खूणही आहे. पुंडलिकासाठी भगवान श्रीकृष्ण इथे आले. गाई सोडल्यां व खेळविल्या. गोपगणांसह इथे वनभोजन केले. अशी कथा या तीर्थासंबंधात प्रल्हादमहाराज बडवे यांनी सांगितली आहे. भगवान श्रीविठ्ठलनाथ आळंदीहून परत आल्यावर मार्गशीर्ष महिन्यात इथेच राहतात म्हणून या महिन्यात या स्थानाला यात्रेचे स्वरुप येते. इथे लांबलांबून लोक दर्शनास व सहभोजनास येतात, मार्गशीर्ष अमावास्येला श्रीविठ्ठलाची पावले पालखीत ठेवून समारंभपूर्वक मिरवत आणून देवांना पुन्हा मंदिरात आणले जाते. या ठिकाणी जाण्यास घाट व पुल आहे, तसेच नदीच्या पात्रातून नावेतून जाता येते. येथील व्यवस्था बडवे पाहतात. या तीर्थाजवळच नदीच्या पात्रात नारदाचे सुंदर मंदिर आहे. मूर्ती अतिशय सुंदर व आकर्षक आहे. याची व्यवस्था कोळी लोक पाहतात. इथे जवळच मुक्तकेशी तीर्थ आहे.

पंढरपूर क्षेत्रातील तीर्थस्थाने....

1. लोहदंड तीर्थ : हे तीर्थ चंद्रभागेच्या पात्रात, पुंडलिकाच्या मंदिरासमोर 20-25 फुटांवर आहे. इथे दगडी नाव तरंगते असे म्हणतात. यी तीर्थामागची कथा अशी आहे. इथे दगडी नाव तरंगते असे म्हणतात. या तीर्थामागची कथा अशी आहे. - गौतम ॠषींची पत्नी सती अहिल्या हिचे इंद्राने गौतम ॠषीचे रुप घेऊन सतित्व हरण केले. गौतम ॠषींनी पत्नीला शिळा होण्याचा व देवेंद्राला सहस्त्र छिद्राने (भगाने) पीडित होण्याचा शाप दिला अहिल्येला उ:शाप मिळून भगवान रामचंद्राच्या पदस्पर्शाने ती पावन झाली. इंद्र भगवान विष्णूला शरण गेला. विष्णूंनी त्याच्या हाती एक लोहवंड दिला व तीर्थयात्रा करण्यास सांगितले आणि ''ज्या तीर्थात हा लोहदंड तरेल त्या तीर्थाच्या स्नानाने तुझी भगे (छिद्रे) जातील'' असा वर दिला. अनेक तीथें हिंडत-हिंडत देवेंद्र या तीर्थाजवळ आला. इथे लोहदंड तरला. हर्षिंत इंद्राने या तीर्थात स्नान केले, तो शाषमुक्त झाला. व्याधिमुक्त झाला म्हणून या तीर्थास 'लोहदंड तीर्थ' हे नाव पडले. या तीर्थाच्या निर्मितीची अशी आख्यायिका आहे, की भगवान शंकर-पार्वती आकाशमार्गाने जात असता सती पार्वतीस तहान लागली. भगवान शंकराने आपल्या त्रिशूळाने भूमीस छिद्र पाडले. त्यातून भोगावतीचे जल काढले. पार्वतीची तृष्णा भागली. तेच हे लोहदंड तीर्थ.
2. पद्मतीर्थ : मंदिराच्या पश्चिमेस सुमारे 1 कि.मी अंतरावर आहे. या ठिकाणी पद्मावती देवीचे मंदिर आहे. मंदिराभोवती पूर्वी तळे होते. तळयाभोवती भक्कम दगडी भिंत व घाट आहेत. भगवान शंकरासह आलेली पार्वती याच ठिकाणी थांबली होती असे म्हणतात. कान्ह्या हरिदास या संतकवीने केलेल्या काकड आरतीत या तीर्थाचा उल्लेख आहे. या तलावाचे बांधकाम इ. 1778 मध्ये सरदार यशवंत पवार यांनी केले असा उल्लेख सापडतो. या मंदिरात नवरात्र महोत्सवात देवीदर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. याची व्यवस्था बडवे पाहतात.
हे मंदिर सावरकर पथावर आहे. जवळच रेल्वे स्टेशन, एस.टी.स्टँड आहे. मंदिरातील तांदळा भव्य व सुंदर आहे. नामदेवाला घेऊन ज्ञानेश्वराची भावंडे तीर्थयात्रेला निघाली तेव्हा भगवान श्रीविठ्ठल त्यांना सोडण्यासाठी या स्थानापर्यंत आले होते. इथेच पांडुरंगाने नामदेवाचा हात ज्ञानेशअवरांच्या हाती दिला, असा उल्लेख एका अभंगात सांपडतो. इथे सुंदर बागबगीचा केल्यास पंढरपूरच्या सौंदर्यात निश्चितच भर पडेल. इथे नगरपालिकेने बांधलेले पद्मावती शाँपिंग सेंटर आहे.
3. कुंडल तीर्थ : श्रीविठ्ठल मंदिराच्या उत्तर बाजूस हरिदास वेशीजवळ हे तीर्थस्थळ आहे. याची आख्यायिका अशी - भगवान विष्णूंनी दैत्यांशी युध्द करण्याच्या प्रसंगी आपल्या कानातील कुंडले इथे काढून ठेवली होती म्हणून यास कुंडलतीर्थ म्हणतात. या तीर्थाशेजारी नृसिंहाची मूर्ती आहे. सध्या कुंडलतीर्थाची जागा बुजवली गेली असून नूसिंहाच्या नावाने एक पिंपळ उभा आहे. शेजारीच महादेवाचे मंदिर असून मंदिरात आद्य शंकराचार्यांची सुंदर मूर्ती आहे.
4. संगमतीर्थ : गोपाळपूरजवळ हे संगमतीर्थ आहे. भीमा व पुष्पा नद्यांचा या ठिकाणी संगम होतो. भगवान श्रीकृष्ण जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा यमुना दु:खी झाली. भगवंतांनी तिला पुष्पा नदीच्या रुपाने जवळ आणले अशी आख्यायिका आहे.
5. वेणुतीर्थ : संगमतीर्थापासून जवळच वेणुतीर्थ आहे. जिथे राधेने भगवान श्रीकृष्णाची वेणू अर्थात बासरी पकडली, त्या तीर्थाला वेणुतीर्थ असे म्हणतात.
6. गुंजातीर्थ : वेणुतीर्थाजवळ असलेल्या वा स्थानी भगवंताच्या मुकुटांतून काही गुंजा इथे गळून पडल्या म्हणून यास गुंजातीर्थ म्हणतात.
7. वृध्दकालेश्वर तीर्थ : गोपाळपूरपासून सुमारे 1 कि.मी. अंतरावर हे तीर्थ आहे. स्वत: यमधर्माने हे तीर्थ स्थापन केले म्हणून यास यमतीर्थ असेही म्हणतात.
8. पंचगंगातीर्थ : श्रीविठ्ठल मंदिरापासून सुमारे 8 कि.मी. अंतरावर उत्तरेच्या बाजूला नदीच्या पात्राजवळ हे तीर्थस्थान आहे. इथे तुंगा, सती, सुनी, कीर्ती व भृंगारी व 5 छोटया नद्यांचा संगम आहे. इथे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी व महाशिवरात्रीस इथे यात्रा भरते.
9. विष्णुपद तीर्थ : चंद्रभागा नदीच्या पात्रात पुंडलिक मंदिराच्या दक्षिणेस सुमारे 1 कि.मी. अंतरावर हे तीर्थ आहे. नदीच्या पात्रात पाषाणस्तंभावर दगडाचे बांधलेले 31 फूट परिघाचे व 12 फूट उंचीचे हे मंदिर आहे. या सोळखांबी आकाराच्या मंदिरची मूळ बांधणी इ. 1640 मध्ये धामणकरबुवांनी केली. पुढे सन 1875 मध्ये चिंतोपंत नागेश बडवे यांनी या मंदिरास सुंदर रुप दिले. मंदिरात मध्यभागी चौकोनात श्रीगोपालकृष्णाची समचरण व देहुडाचरण अशी दोन प्रकारची पावले आहेत. शेजारी गाईंची पावले (खूर) आहेत. दहिकाल्याच्या वाटीची खूणही आहे. पुंडलिकासाठी भगवान श्रीकृष्ण इथे आले. गाई सोडल्यां व खेळविल्या. गोपगणांसह इथे वनभोजन केले. अशी कथा या तीर्थासंबंधात प्रल्हादमहाराज बडवे यांनी सांगितली आहे. भगवान श्रीविठ्ठलनाथ आळंदीहून परत आल्यावर मार्गशीर्ष महिन्यात इथेच राहतात म्हणून या महिन्यात या स्थानाला यात्रेचे स्वरुप येते. इथे लांबलांबून लोक दर्शनास व सहभोजनास येतात, मार्गशीर्ष अमावास्येला श्रीविठ्ठलाची पावले पालखीत ठेवून समारंभपूर्वक मिरवत आणून देवांना पुन्हा मंदिरात आणले जाते. या ठिकाणी जाण्यास घाट व पुल आहे, तसेच नदीच्या पात्रातून नावेतून जाता येते. येथील व्यवस्था बडवे पाहतात. या तीर्थाजवळच नदीच्या पात्रात नारदाचे सुंदर मंदिर आहे. मूर्ती अतिशय सुंदर व आकर्षक आहे. याची व्यवस्था कोळी लोक पाहतात. इथे जवळच मुक्तकेशी तीर्थ आहे.

Saturday, June 16, 2007

यात्रा...

चैत्री-वारी : भारतीय सनातन हिंदू संस्कृतीप्रमाणे चैत्र महिना म्हणजे नववर्षारंभीचा महिना. चैत्र शुध्द एकादशीला पंढरपुरात श्रविठ्ठलदर्शनासाठी मोठी यात्रा भरते. चंद्रभागेत स्नान, श्रीविठ्ठल दर्शन, क्षेत्र-प्रदक्षिणा करुन भजनानंदी तल्लीन होऊन वारकरी कृतार्थ होतात. रामनवमी व गुढी पाडवा या सणाला पंढरपुरात भाविकांची गर्दी होते. मंदिरात, मठात, धर्मशाळेतच नव्हे तर घरोघरी गुढया उभ्या करुन नववर्षाचे स्वागत केले जाते. याच महिन्यात शिखर-शिंगणापूरची यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर हे प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर श्रीक्षेत्र शिखर-शिंगणापूर तीर्थस्थान आहे. इथे डोंगरावर श्रीशंभुमहादेवाचे अतिशय प्राचीन देवस्थान आहे. चेत्रवारीस आलेले भाविक श्रीविठ्ठलदर्शन घेऊन, खांद्यावर कावडी घेऊन वाजत-गाजत, नाचत श्रीमहादेवाच्या दर्शनाला जाऊन येतात. 'पुंडलिक वरदा हरि विठ्ठल' या नामघोषाबरोबरच 'हरहर महादेव' ही गर्जना आसमंतात घुमते आणि नकळत शैव-वैष्णव संप्रदाय मूलत: एकच आहे 'भेद नाही हरिहरा' ही अद्वैताची भावना भाविकांच्या मनात दृढमूल होते. श्रीक्षेत्र शिंगणापूर हे महादेवाचे तीर्थस्थान पंढरपूर-पुणे महामार्गावर सुमारे 65 ते 70 कि.मी. अंतरावर आहे.

कार्तिकी यात्रा. : कार्तिक शुध्द एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरत असते. या यात्रेनंतर संतमंडळी व चातुर्मासात भगवद्चिंतनासाठी राहिलेले वारकरी लोक आपापल्या गावी जातात. चातुर्मास संपतो, या यात्रेत नदीच्या वाळवंटात जागोजागी कीर्तनाचे फड असतात. गावातील मठ-मदिरांतून, धर्मशाळेतूनही कीर्तन, भजनाचे कार्यक्रम होत असतात. एकादशीचे दिवशी श्रीविठ्ठलाचा रथ नगरप्रदक्षिणेला निघत असतो. दिंडया निघतात. पैर्णिमेला गोपाळकाला (गोपाळपूर येथे) व त्याच्या दुसरे दिवशी मंदिरात आषाढी यात्रेप्रमाणे महाद्वार काला होतो. या यात्रेला कर्नाटकातून पालख्या व दिंडया येतात. विजापूर, हुबळी, धारवाड, बेळगाव इ. जिल्ह्यांतून लाखो लोक पंढरपूरला येतात. विजापूर जिल्ह्यात इंचगिरी संप्रदायाची शिष्यमंडळी आहेत. भाऊसाहेब महाराज उमदीकर, रामभाऊ रानडे इ. थोर सत्पुरुषांनी भागवत धर्माच्या प्रसाराचे महान कार्य या भागात केले आहे. या प्रांतातील विविध मंदिरांतून श्रीज्ञानेश्वरीच्या निरुपणाचे कार्य, कीर्तने, प्रवचन-पायारणे इ. कानडी भाषेतून चालते. यात्रेच्या निमित्ताने भागवत धर्माच्या प्रचारा-प्रसारामुळे प्रांतभेद संपून स्नेहसंबंध दृढमूल होत आहेत. ''कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । तेणे मज लावियेला वेधु ॥'' या अभंगातून 'श्रीविठ्ठल' कर्नाटक व महाराष्ट्रातील (भाषा भिन्न असूनही) वारकऱ्यांना भक्तिसूत्राने एकत्रित आणणारा महत्त्वाचा दुवा आहे.

माघी वारी ( माघ यात्रा) : पंढरपुरातील ही चौथी महत्त्वाची यात्रा. माघ शुध्द एकादशीला ही यात्रा भरत असते. कर्नाटक, महाराष्ट्राबरोबर आंध्र प्रदेशातील भाविकही या यात्रेसाठी दिंडयांसह येतात. तमिळी, तेलगू भाविकांमध्येही श्रीविठ्ठलभक्ती, भागवतधर्माविषयी दिंडयांसह येतात. तमिळी, तेलगू भाविकांमध्येही श्रीविठ्ठलभक्ती, भागवतधर्माविषयी जिव्हाळा दिसून येतो. आंध्रातील भट्टीपोल्लू गावातील प्राचीन विठ्ठलमंदिरातही अशी यात्रा भरते. या प्रदेशातील गावातून असलेल्या श्रीविठ्ठल मंदिरातून तेलगू भाषेत ज्ञानेश्वरीवर प्रवचने होतात.
मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या प्रांतांतूनसुध्दा पंढरीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. हिंदी, गुजराती, कन्नड, तेलगू भाषेतून प्रवचने होतात. म्हणूनच सांगावेसे वाटते की, पंढरपूर ते तीर्थक्षेत्र देशातील विविध प्रांतातील भाषिकांना भागवत धर्माच्या माध्यमातून एकत्रित आणणारे पवित्र तीर्थक्षेत्र, एवढेच नव्हे तर हिंदुधर्म संस्कृतीचे प्रतीक आहे.

यात्रा...

चैत्री-वारी : भारतीय सनातन हिंदू संस्कृतीप्रमाणे चैत्र महिना म्हणजे नववर्षारंभीचा महिना. चैत्र शुध्द एकादशीला पंढरपुरात श्रविठ्ठलदर्शनासाठी मोठी यात्रा भरते. चंद्रभागेत स्नान, श्रीविठ्ठल दर्शन, क्षेत्र-प्रदक्षिणा करुन भजनानंदी तल्लीन होऊन वारकरी कृतार्थ होतात. रामनवमी व गुढी पाडवा या सणाला पंढरपुरात भाविकांची गर्दी होते. मंदिरात, मठात, धर्मशाळेतच नव्हे तर घरोघरी गुढया उभ्या करुन नववर्षाचे स्वागत केले जाते. याच महिन्यात शिखर-शिंगणापूरची यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर हे प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर श्रीक्षेत्र शिखर-शिंगणापूर तीर्थस्थान आहे. इथे डोंगरावर श्रीशंभुमहादेवाचे अतिशय प्राचीन देवस्थान आहे. चेत्रवारीस आलेले भाविक श्रीविठ्ठलदर्शन घेऊन, खांद्यावर कावडी घेऊन वाजत-गाजत, नाचत श्रीमहादेवाच्या दर्शनाला जाऊन येतात. 'पुंडलिक वरदा हरि विठ्ठल' या नामघोषाबरोबरच 'हरहर महादेव' ही गर्जना आसमंतात घुमते आणि नकळत शैव-वैष्णव संप्रदाय मूलत: एकच आहे 'भेद नाही हरिहरा' ही अद्वैताची भावना भाविकांच्या मनात दृढमूल होते. श्रीक्षेत्र शिंगणापूर हे महादेवाचे तीर्थस्थान पंढरपूर-पुणे महामार्गावर सुमारे 65 ते 70 कि.मी. अंतरावर आहे.

कार्तिकी यात्रा. : कार्तिक शुध्द एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरत असते. या यात्रेनंतर संतमंडळी व चातुर्मासात भगवद्चिंतनासाठी राहिलेले वारकरी लोक आपापल्या गावी जातात. चातुर्मास संपतो, या यात्रेत नदीच्या वाळवंटात जागोजागी कीर्तनाचे फड असतात. गावातील मठ-मदिरांतून, धर्मशाळेतूनही कीर्तन, भजनाचे कार्यक्रम होत असतात. एकादशीचे दिवशी श्रीविठ्ठलाचा रथ नगरप्रदक्षिणेला निघत असतो. दिंडया निघतात. पैर्णिमेला गोपाळकाला (गोपाळपूर येथे) व त्याच्या दुसरे दिवशी मंदिरात आषाढी यात्रेप्रमाणे महाद्वार काला होतो. या यात्रेला कर्नाटकातून पालख्या व दिंडया येतात. विजापूर, हुबळी, धारवाड, बेळगाव इ. जिल्ह्यांतून लाखो लोक पंढरपूरला येतात. विजापूर जिल्ह्यात इंचगिरी संप्रदायाची शिष्यमंडळी आहेत. भाऊसाहेब महाराज उमदीकर, रामभाऊ रानडे इ. थोर सत्पुरुषांनी भागवत धर्माच्या प्रसाराचे महान कार्य या भागात केले आहे. या प्रांतातील विविध मंदिरांतून श्रीज्ञानेश्वरीच्या निरुपणाचे कार्य, कीर्तने, प्रवचन-पायारणे इ. कानडी भाषेतून चालते. यात्रेच्या निमित्ताने भागवत धर्माच्या प्रचारा-प्रसारामुळे प्रांतभेद संपून स्नेहसंबंध दृढमूल होत आहेत. ''कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । तेणे मज लावियेला वेधु ॥'' या अभंगातून 'श्रीविठ्ठल' कर्नाटक व महाराष्ट्रातील (भाषा भिन्न असूनही) वारकऱ्यांना भक्तिसूत्राने एकत्रित आणणारा महत्त्वाचा दुवा आहे.
माघी वारी ( माघ यात्रा) : पंढरपुरातील ही चौथी महत्त्वाची यात्रा. माघ शुध्द एकादशीला ही यात्रा भरत असते. कर्नाटक, महाराष्ट्राबरोबर आंध्र प्रदेशातील भाविकही या यात्रेसाठी दिंडयांसह येतात. तमिळी, तेलगू भाविकांमध्येही श्रीविठ्ठलभक्ती, भागवतधर्माविषयी दिंडयांसह येतात. तमिळी, तेलगू भाविकांमध्येही श्रीविठ्ठलभक्ती, भागवतधर्माविषयी जिव्हाळा दिसून येतो. आंध्रातील भट्टीपोल्लू गावातील प्राचीन विठ्ठलमंदिरातही अशी यात्रा भरते. या प्रदेशातील गावातून असलेल्या श्रीविठ्ठल मंदिरातून तेलगू भाषेत ज्ञानेश्वरीवर प्रवचने होतात.
मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या प्रांतांतूनसुध्दा पंढरीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. हिंदी, गुजराती, कन्नड, तेलगू भाषेतून प्रवचने होतात. म्हणूनच सांगावेसे वाटते की, पंढरपूर ते तीर्थक्षेत्र देशातील विविध प्रांतातील भाषिकांना भागवत धर्माच्या माध्यमातून एकत्रित आणणारे पवित्र तीर्थक्षेत्र, एवढेच नव्हे तर हिंदुधर्म संस्कृतीचे प्रतीक आहे.

Thursday, June 14, 2007

पंढरीची वारी (आषाढी यात्रा) .....

स्वत: पांडुरंगाने नामदेवरायांच्या जवळ आपले गुपित सांगताना म्हटले आहे, ''आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ॥'' वारकरी संप्रदायाची ही अत्यंत महत्त्वाची यात्रा मानली जाते. आषाढी यात्रेपासून ते कार्तिकी यात्रेपर्यंतचा चार महिन्यांचा काळ 'चातुर्मास' म्हणून संबोधिला जातो. या चातुर्मासात हजारो वारकरी पंढरपुरात मठ, मंदिर, धर्मशाळेत राहून भजन, कीर्तनादि कार्यक्रमात सहभागी होतात. भागवत धर्माचा अभ्यास करतात. या सर्वात मोठया यात्रेसाठी दरवर्षी संतांच्या पालख्यांसमवेत व अन्य मार्गाने सुमारे 5 ते 6 लाख लोक पंढरीत येत असतात. पंढरीचा आसमंत 'ग्यानबा (ज्ञानोबा) तुकाराम', 'पुडलिक वरदा हरि विठ्ठल' या नामघोषाने, टाळ-मृदुंगाच्या नादघोषाने दुमदुमत असतो. साधारणत: हा काळ वर्षाॠतूचा काळ. शेतकरी वर्ग शेतात पेरण्या करुन श्रीविठ्ठलदर्शनाची आस मनी घेऊन पंढरीत येतो. चंद्रभागा नदी यात्राकाळात दुथडी भरुन वहात असते. आल्हाददायक वातावरण झालेले असते. वारकऱ्यांप्रमाणेच अनेक व्यापारी आपल्या मालाची विक्री करण्यासाठी दुकाने थाटून बसतात. आषाढ शुध्द दशमीला अनेक संतांच्या पालख्यांचे पंढरपुरात आगमन होते. हजारो लोक पालखीला सामोरे जातात. साधु-संतांच्या आगमनाचा हा देवदुर्लभ सोहळा अनिर्वचनीय असतो. ''दिंडया पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥'' संत नामदेवाच्या या अभंगानुसार लाखो वारकरी 'माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥'' हा भाव अंतरी ठेवून खांद्यावर पताका, मुखाने हरिनाम आणि टाळ-मुदुंगाच्या गजरात पंढरीत दाखल होतात. यावेळी पंढरपुराला 'भूवैकुंठ' का म्हणतात याचा प्रत्यक्ष अनुभव येतो.
या यात्रेपूर्वी ठरलेल्या मुहूर्तावर आळंदी, देहू, पैठण, शेगाव इ. संत सत्पुरुषांच्या गावाहून त्या त्या संतांच्या पालख्या पंढरपुराकडे मार्गस्थ होतात. एवढेच नव्हे तर भारताच्या विविध प्रांतांतून भिन्न भिन्न भाषा बोलणारे, चालिरीतीचे श्रीविठ्ठलाच्या भक्तिप्रेमाने आपले भिन्नत्व विसरुन एकत्र येतात, उच्चनीचता, श्रीमंत-गरीब, जातिभेद, भाषाभेद, प्रांतभेद विसरुन आपण सर्व एक श्रीविठ्ठलाचे वारकरी, 'विष्णुदास' आहोत ही भावना मनीमानसी दृढ धरुन येतात. वारकरी संप्रदाय समता, एकता, अभेदता शिकविणारा आहे, कारण त्याला माहीत आहे, ''उच्च नीच काही नेणे भगवंत । तिष्ठे भावभक्ती देखुनिया ॥'' यामुळेच यात्रेत विषमता संपते, भेद-भाव नाहीसा होतो. परदेशी अभ्यासू पर्यटकही हा सोहळा पाहण्यासाठी पंढरपूरास येतात.
आषाढ शु. 9 ला भंडीशेगाव येथे रिंगण होऊन सर्वजण वाखरी येथील संतनगरात मुक्कामास येतात. दशमीच्या दिवशी सकल संतांच्या पालख्यांसमोर दिंडयांचे रिंगण होते. रिंगण-सोहळा अत्यंत प्रेक्षणीय असतो, संतांचा अश्व वर्तुळाकार नाचत असतो, धावत असतो व त्यामागे वारकरी धावत असतात. रिंगण-सोहळा संपल्यावर सर्व पालख्या पंढरपूराकडे निघतात.
वाखरी येथून सर्व पालख्यांच्या शेवटी निघणारी पालखी श्रीज्ञानेश्वर महाराजांची. या पालखीचा प्रथम क्रमांक असतो. दुसरा क्रमांक देहूच्या श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखीचा असतो. तिसरा क्रमांक पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालकीचा. चौथी पालखी निवृत्तिनाथ महाराजांची, पाचवी सोपानदेवाची, सहावी एदलाबादहून आलेली संत मुक्ताबाईची पालखी आणि सातवी पालखी पंढरपुराहून संतांच्या पालख्यांना सामोरे जाऊन पंढरीस आणणारी श्रीनामदेवरायांची पालखी. या प्रमुख संतांच्या पालख्यांचे मार्ग ठरलेले असतात. संतनगर (वाखरी येथील सर्व संतांच्या पालख्या एकत्रित येण्याच्या ठिकाणा) हून आषाढ शुध्द दशमीला सकाळी 10 च्या सुमारास एकेक पालखी हळूहळू पंढरपूरकडे मार्गक्रमणा करु लागते. पंढरपुरात सर्वात शेवटी येणारी पालखी असते. श्रीज्ञानेश्वर महाराजांची; ती रात्री 10-11 वाजण्याच्या सुमारास पंढरपुरातील प्रदक्षिणा रोडवरील श्रीज्ञानेश्वर मंदिरात येते. अन्य संतांच्या पालख्या आपापल्या मंदिरात जातात. आषाढ शुध्द एकादशीला यात्रेकरु चंद्रभागेच्या पवित्र प्रवाहात स्नान करुन शुचिर्भूत होतात. कपाळी गोपीचंदन व बुवक्याची नाममुद्रा लावतात. गळयात तुळशीची माळ व टाळ, खांद्यावर पताका घेऊन हे वारकरी संतांच्या पालख्यांसमवेत नामघोष करीत, क्षेत्र-प्रदक्षिणा करतात. श्रीविठ्ठल मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होते. दर्शन बारीत 8-10 तास उभे राहून लोक 'श्री'चे दर्शन घेऊन कुतार्थ होतात. वारी पूर्ण करतात. दुपारी 2 च्या दरम्यान श्रीविठ्ठलाचा रथ क्षेत्र-प्रदक्षिणेसाठी निघतो. माहेश्वरी धर्मशाळेत (पूर्वीचा खाजगीवाले वाडा) श्रीविठ्ठल-रुक्मिणी व राही यांच्या चांदीच्या मूर्ती आहेत. या मूताअना सोन्याचे पाणी दिले ाहे. सजवलेल्या रथातून प्रदक्षिणा मार्गावरुन रथारुढ श्रीविठ्ठल-रुक्मिणी-राहीच्या मूर्तीची मिरवणूक काढतात. ज्या भाविकांना एकादशीचे दिवशी मंदिरात जाऊन दर्शन घेता आले नाही, त्या भाविकांना रथारुढ श्रीविठ्ठलाचे दर्शन होते, समाधान मिळते. हा रथ भक्तभाविक ओढत असतात. रथापुढे श्रीगजानन महाराज संस्थानचा हत्ती झुलत असतो. 'श्री'च्या दर्शनासाठी प्रदक्षिणा मार्गावर लोकांची झुंबड उडते. लोक रथावर खारीक, बुक्का, लाह्या, पैसे उधळतात. ठिकठिकाणी रथ थांबवतात. परंपरेनुसार मानकरी लोक 'श्री'ची पूजा करतात रथाची नगरप्रदक्षिणा पूर्ण झाली की वारी परिपूर्ण झाल्याचा वारकऱ्यांना संकेत मिळतो. आनंद होतो. ही परंपरा (प्रथा) सुरु होऊन सुमारे 190 वर्षे झाली आहेत.
आषाढ शुध्द पौर्णिमेला गोपाळकाला होऊन यात्रेची सांगता होते. क्षेत्राच्या दक्षिणेस सुमारे 1 ते 1॥ कि.मी अंतरावर असलेल्या गोपाळपूर येथे गोपाळकाल्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून दिंडया, पालख्यांची गर्दी होते. दुपारी 10 ते 12 च्या सुमारास तिथे कीर्तनानंतर दहीहंडी फोडली जाते. गोपाळकाला एकमेकांना वाटता जातो. अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. एकमेकांच्या मुखात लाह्यांचा दहीकाला घालून नामस्मरणी दंग असलेले वारकरी 'गोपाळकाला गोड झाला, गोपाळांनी गोड केला' असे म्हणत उपाउरी भेट घेतात. ''पंढरीच्या लोक नाही अभिमान । पाया पडती जन एकमेका ॥'' या संतवाणीप्रमाणे एकमेकाला वंदन करतात. सान-थोर, उच्च-नीच भेद संपतो. सर्व भाविक, वैष्णव हा आनंद-सोहळा साजरा करुन, 'पंढरीची वारी' परिपूर्ण झाल्याच्या आनंदात आपापल्या गावाकडे मार्गस्थ होतात. पंढरीत यात्रेसाठी येताना आणि यात्रा पूर्ण झाल्यावर गावी परत जाताना जागोजागी मुक्काम करुन नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन, भारुडाचे कार्यक्रम करुन हरिजागर करीत असतात. पालखी सोहळयातील विणेकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, घोडेस्वार इत्यादि बाबतींतली संपूर्ण व्यवस्था संस्थानच्या मार्गदर्शनाखाली पाहिली जाते. या व्यवस्थेत आवश्यकतेनुसार होणारे बदल आळंदी देवस्थान पंचकमिटी, वारकरी महामंडळ व जिल्हा न्यायाधीश, पुणे यांच्या आदेश व मार्गदर्शनानुसार केले जातात. दिंडया व पालखी परती मार्ग, याचे नियम याच पध्दतीने ठरविले जातात. अलीकडे पालखीसमवेत येणा-या यात्रेकरुंच्या दिंडयांच्या संख्येत वाढ होत आहे.
आषाढ शुध्द पौर्णिमेच्या दुसरे दिवशी 'महाद्वार काला' होतो. प्राचीन काळी पंढरपुरात कान्ह्या हरिदास नावाचे श्रीविठ्ठलाचे अनन्यभक्त होऊन गेले. रोज पहाटे काकड आरतीला. मंदिरात भजने, पदे, आरत्या म्हणून ते सेवा करीत असत. ( आजही त्यांचे वशंज ही प्रथा पाळून रोज श्रीविठ्ठलांचे पुढे गायनसेवा करीत असतात) श्रीविठ्ठलाचे प्रसन्न होऊन त्यांना स्वत:च्या पादुका दिल्या अशी आख्यायिका आहे. श्रविठ्ठलमंदिराजवळ हरिदास वेशीकडे जाताना श्री. हरिदास यांचा स्वत:च्या मालकीचा वाडा आहे. त्याला ' काल्याचा वाडा' म्हणतात. या वाडयात श्रीविठ्ठलाच्या याच चांदीच्या पादुका आहेत. आषाढ व कार्तिक यात्रेच्या पौर्णिमेच्या दुसरे दिवशी या पादुका वै.कान्ह्या हरिदासाचे वंशजांच्या मस्तकावर बांधल्या जातात. या पादुका त्यांच्या मस्तकी ठेवण्याचा मान संत नामदेवरायांच्या वंशजाकडे आहे. पादुका मस्तकी ठेवताच श्री. हरिदासांची शुध्द हरपते. ते समाधी अवस्थेत जातात. नंतर टाळमृदुंगाच्या नादघोषात व नामघोषात मिरवणुकीने श्री. हरिदासांना खांद्यावर घेऊन श्रीविठ्ठल मंदिरात जातात. मंदिरातील सभामंडपात काला खांद्यावर घेऊन 5 प्रदक्षिणा केल्या जातात. दहीहंडी फोडली जाते. ही मिरवणूक (काला) महाद्वारातून निघतो. जाताना पादुकींवर गुलाल, बुक्का, हळद, कुंकू व लाह्यांचा वर्षाव होतो. महाद्वार घाटाने ही मिरवणूक खाली चंद्रभागेच्या भेटीसाठी जाते. पवित्र जल उडवले जाते. तेथून कुंभार घाटाने मिरवणूक माहेश्वरी धर्मशाळेत जाते. तेथून रामायणे गेटवरुन मुक्ताबाईच्या मठावरुन हरिदासवेशीतून पुन्हा वाडयात येते. मार्गात हरिनामाचा गजर व अबीर-गुलालाची उधळण होते. दहीहंडया फोडल्या जातात. भाविक लोक श्रीविठ्ठलाच्या पादुकांचे दर्शन घेतात. काला वाडयात आल्यावर महाआरती होते. सर्वांना काला वाटला जातो. महाप्रसाद होतो आणि यात्रेची या सोहळयाने परिपूर्णता-सांगता होते.
आषाढी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळाला 'चातुर्मास' म्हणतात. या चातुर्मासात मठातून, मंदिरांतून फड, वाडयातून श्रीविठ्ठलोपासना ( भजने, प्रवचने, कीर्तने, पारायणे, भारुडे इ. च्या माध्यमातून) केली जाते.
प्रमुख संतांच्या पालख्यांशिवाय अन्य अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरात आषाढी यात्रेसाठी येत असतात.
श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी ( जि. पुणे) यांनी श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळयामध्ये पालखीबरोबर असणा-या दिंडया व त्यांची नावे 1948 साली निश्चित केली आहेत. त्याप्रमाणेच पालखीसमवेत पुढे व मागे दिंडया चालत असतात.


- डाँ. अरुण शं वाडेकर

Tuesday, June 12, 2007

पंढरपुरात साकारणार भव्य आध्यात्मिक प्रकल्प...

चंद्रभागा नदीच्या पैलतीरापासून नामदेव पायरीपर्यंत सुंदर कायमस्वरूपी ७० ते ८० फूट मंडप...या मंडपात दोन्ही बाजूंना उंच ओव-या...नदीच्या दोन्ही तीरावर नऊ-नऊ असे अठरा घाट...त्यांना गीतेतील अठरा अध्यायांची नावे...असा भव्यदिव्य प्रकल्प पंढरपुरात साकारण्यासाठी श्रीक्षेत्र आळंदी - देहू परिसर विकास समितीचे मुख्य प्रवर्तक वि. दा. कराड, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर आदी मान्यवर प्रयत्नशील आहेत. .........हा प्रकल्प स्थानिक पालिका प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सहकार्यातून लवकरच पंढरपुरात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे तीर्थक्षेत्र पंढरपूरची वाटचाल आता ज्ञान तीर्थक्षेत्राकडे सुरू झाली. विकास समितीच्या संकल्पनेनुसार आळंदी, देहूनंतर पंढरपूरचा असा विकास करण्याचे नियोजन १९८६ मध्ये झाले होते. त्यानुसार आता लवकरच हा प्रकल्प पंढरपुरात साकारण्यासाठी गतिशील प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या प्रकल्पानुसार चंद्रभागा नदीच्या पैलतिरापासून नामदेव पायरीपर्यंत कोणाचेही घर, मठ अथवा दुकान न पाडता सुंदर व कायमस्वरूपी ७० ते ८० फूट मंडप उभारण्यात येणार आहे. मंडपात पहाटेपासून रात्रीपर्यंत सुंदर अभंग व नादमधुर संगीत ऐकविण्यात येतील. नदीच्या दोन्ही तीरावर सर्व घाटांना विविध संतांची नावे देण्यात येतील. घाटाच्या दोन्ही बाजूला १२० फूट रुंदीचे रस्ते कुणाचेही घर, मठ न पाडता तयार करण्यात येतील. त्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना २०-२० फुटांचे फुटपाथ व मधोमध ८० फुटांचा रस्ता असेल. या रस्त्याच्या भूयारात भाविकांसाठी स्वच्छतागृहे आणि मुताऱ्या बांधण्यात येतील. यामुळे पवित्र चंद्रभागा नदी आणि वाळवंटातील घाणीची समस्या थोडीफार कमी होण्यास मदत होईल. तसेच या रस्त्यावर गोमुखाद्वारे चंद्रभागा नदीचे तीर्थ देण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाबाबत बोलताना श्री. कराड म्हणाले, ""जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर आणि डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी या प्रकल्पासाठी बौद्धिक योगदान दिले आहे. आता स्थानिक केंद्र व राज्य सरकारकडून यासाठी मंजुरीची आवश्‍यकता आहे. हे धार्मिक नव्हे तर सामाजिक काम आहे. यातून अनेकांचे आरोग्य चांगले राहून कल्याण होणार आहे. त्यामुळे प्रकल्पाला लवकरच मंजुरी मिळेल अशी आशा आहे.''

- संजय पाठक (सकाळ वृत्तसेवा )

Monday, June 11, 2007

मंदिरातील सेवाधारी...

'श्री'च्या मंदिरात नित्योपचार करणारे सेवेकरी आहेत. अनेक वर्षांपासून हे सर्व सेवाधारी भक्तीयुक्त अंत:करणाने 'श्री'च्या चरणाची सेवा करीत असतात.
1) पुजारी : काकडआरती ते शेजारती व नित्योपचारातील 'श्री'ची पुजा करणारे ते पुजारी.
2) बेणारे : नित्योपचारातील मंत्र सांगणारे ते बेणारे. यांनी सांगितलेल्या मंत्रांप्रमाणे सर्व पुजाविधी केले जातात.
3) परिचारक : पूजेच्या वेळी चांदीच्या घागरीत गरम पाणी आणून देणे, धूप-दीप चांदीच्या घुपटण्यातून पुजाऱ्याकडे देण्याचे काम परिचारक करतात.
4) डिंगरे : 'श्री'ना आरसा दाखविण्याचे काम डिंगरे करतात.
5) डांगे : देवाचे चोपदार आहेत. हातात चांदीची काठी घेऊन पूजेच्या वेळी बंदोबस्ताचे काम डांगे यांच्याकडे असते.
6) हरिदास : 'श्री'च्या पुढे काकडआरती व महापूजेच्या वेळी गायन करणे व 'श्री'च्या रथापुढे पंचपदी म्हणण्याचे काम हरिदास करतात. हे कान्ह्या हरिदासाचे वंशज आहेत.
7) दिवटे : हे 'श्री'ची पूजा सुरु असताना हाती दिवा घेऊन सर्वांना 'श्री'चे दर्शन सुलभ व्हावे यासाठी उभे असतात.
8) बडवे : हे विश्वस्त आहेत. परिवार देवतांची पूजा-अर्चा इ. कार्य हेच करीत असतात.
9) उत्पात : श्रीरुक्मिणीमातेची सर्व सेवा उत्पात मंडळीच करीत असतात.

श्रीविठ्ठल मंदिराच्या परिसरात....

श्रीविठ्ठलाचे दर्शन घेऊन सोळखांबीत येऊन दक्षिणेकडील दरवाजाने बाहरे पडताच अनुक्रमे अंबाबाई (नारदमुनी, परशुराम, आता या मूर्ती मुक्ती मंडपात बसवल्या आहेत. ) उजव्या सोंडेच्या गणपती यांचे दर्शन घडते. पुढे तरटी दरवाजाच्या आत पायऱ्यांजवळ संत कान्होपात्रा समाधिस्थान आहे. कान्होपात्रा नायकीण होती. तिने विठ्ठलभक्ती केली आणि विठ्ठलाने तिला आपलेसे केले, अशी आख्यायिका आहे. समाधीवर तरटीचे झाड आहे. तसेच पढे गेल्यावर भगवान व्यंकटेशाचे छोटे मंदिर आहे. ही अतिशय सुंदर, चतुर्भुज मूर्ती गंडकी शिळेची आहे. ''व्यंकटरमणा गोविंदा'' अशी आरोळी ठोकून भक्तजन व्यंकटेशाच्या चरणी माथा टेकवतात. त्याला उजवे घालून जाताना डाव्या बाजूच्या भिंतीत श्रीगणेशाची मूर्ती दिसते. व्यंकटेशाला प्रदक्षिणा घालून खाली उतरताना बाजीराव पडसाळी (ओवरी) लागते. या सभामंडपात विविध कार्यक्रम सदैव होत असतात. तसेच याच मंडपात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे रोज सकाळी मोफत खिचडी, ताक व बुंदीच्या लाडूच्याा प्रसादाचे वाटप केले जाते. त्याला लागूनच श्रीमहालक्ष्मीचे सुंदर मंदिर आहे. या मंदिरात अन्नपूर्णेची मूर्ती आहे व एक खांबावर नृसिंहाची मूर्ती आहे.
बाजीरावाच्या ओवरीत रामेश्वर, खंडोबा, गणपती, नागोबा व श्रीकृष्ण यांच्या छोटया सुरेख मूर्ती आहेत. तिथून पुढे जाताना डाव्या हाताला पश्चिमद्वार आहे. पुढे नवग्रहाचे मंदिर आहे. हा भाग श्रीविठ्ठलाच्या गर्भगारामागे येतो. इथेच एक बाजूस श्रीदत्त, सूर्य व चिंतामणी यांच्या मूर्ती आहेत. याच्या पुढे गेल्यावर श्रीरुक्मिणीमातेचे मंदिर लागते.

Saturday, June 9, 2007

श्रीविठ्ठल मंदिरात होणारे वर्षातील उत्सव....

परब्रह्म पांडुरंगाचे बडवे परंपरेने चालत आलेले नित्योपचार, पूजा-अर्चा, उत्सव-महोत्सव, कुलधर्म, कुलाचाराप्रमाणे सेवाभावी वृत्तीने करीत असताना. नित्य पंचक्वान्नाचा महानैवेद्य, खिचडी, दहीभात, लोणी-साखर इ. नित्यप्रती भक्तिभावाने दाखविला जातो. आरती-धूपारतीनंतर 'श्री'ची दृष्ट काढली जाते. या श्रीविठ्ठलाचे वर्षभरात अनेक उत्सव-महोत्सव होत असतात.
1) चैत्र मासात नववर्षारंभी शु. प्रतिपदेला (गुढी पाडव्याचे दिवशी) 'श्री'च्या शिखरावरील सुवर्ण कळसावर ध्वज-उभारणी होते. भागवत धर्माची ध्वजा डौलाने फडकू लागते. 'श्री'स अलंकार घातले जातात. चैत्र शु. प्रतिपदा ते मृग नक्षत्र निघेपर्यत ( अंदाजे 7 जूनपर्यंत) 'श्री'स नित्य चंदनाची सुंगधी उटी लावण्यात येते. शिरा व वाटलेली डाळ असा प्रसाद असतो. चैत्र वारीचा महोत्सव चैत्र शु. प्रतिपदेपासून पौणिमेपर्यंत असतो. चैत्र शु. एकादशीला फराळाबरोबरच पुरणाचा महानैवेद्य असतो. श्रीरामनवमीचा उत्सव मंदिरात होतो. हरिदासी कीर्तन असते. पौर्णिमेस हनुमानजयंती उत्सव असतो.
(2) वैशाख महिन्यात 'श्री'स चंदनाची सुंगधी उटी लावतात. कित्येकदा उटीचेच विविध पोषाख केलेले असतात. रुक्मिणी माता व श्रीव्यंकटेशालादेखील उटी केली जाते. अक्षय तृतीयेस अलंकार घालतात. महानैवेद्यात आमरस असतो. वैशाख शु. 14 स नृसिंह जयंती उत्सव मंदिरात होतो. चैत्रगौरीनिमित्त श्रीलक्ष्मीमाता व रुक्मिणीमातेस अलंकार पूजा केली जाते. हळदीकुंकवाचा व ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो.
(3) ज्येष्ठ मासात मृगनक्षत्र मृगनक्षत्र निघेपर्यंत चंदनाची उची असते. थंड पाणी व फराळाचे पदार्थ 'श्री'स दाखवतात.
(4) आषाढ महिन्यात महायात्रा असते. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून सकलसंतांच्या पालख्या पंढरीस येतात. आषाढ शु. 5 च्या सुमारास दोन्हीकडील पलंग काढले जातात. नित्योपचार बंद होतात. 'श्री'चे दर्शन अहोरात्र चालू असते. आषाढ शु. एकादशीस 'श्री'चा रथ प्रदक्षिणेसाठी निघतो. पौर्णिमेला गोपाळपूर येथे गोपाळकाला होतो. रात्री पांडुरंगाची पालखी निघते. दुसऱ्या दिवशी महाद्वार काला होतो. यात्रेनंतर शुभमुहूर्तावर प्रक्षाळपूजा होते. रुद्र व पवयान सूक्ताचा अभिषेक होतो. साखरेने देवास चोळतात. उष्णोदकाने स्नान घालतात. समस्त बडवे व उत्पात पाणी उधळतात. देवास अलंकार व भरजरी पोषाख घालतात. पुन्हा नित्योपचार सुरु होतात. प्रक्षाळपूजेदिवशी शेजारतीनंतर 'श्री'स सुंठ, दालचिनी, पिंपळी, तुळस, गवती चहा अशा औषधी वनस्पतींचा काढा शिणवटा घालवण्यासाठी अर्पण करतात. याच महिन्यात चातुर्मास सुरु होतो. मंदिरात व पंढरपुरातील मठ. मंदिर व धर्मशाळेतून परंपरेप्रमाणे भजन, कीर्तन, प्रवचनादि कार्यक्रम अखंडपणे चालू होतात. आषाढ वद्य 13 ला नामदेव पुण्यतिथीचे दिवशी नामदेव समाधी (पायरी) ची महापूजा व सुंदर आरास केली जाते. भजन-कीर्तनादि कार्यक्रम होतात. काल्याने याची सांगता होते.
(5) श्रावण मासात शुध्द पंचमीला रुक्मिणी व पांडुरंगाकडे गौरीची स्थापना होते. गौरीपूजनासाठी नगरी व पंचक्रोशीतील असंख्य स्त्रिया येतात. मदिरात लोकगीते म्हणतात. अनेक प्रकारचे खेळ खेळतात. सायंकाळी मिरवणुकीने वाजत-गाजत भीमानंदीमध्ये गौरी विसर्जन केले जाते. हा उत्सव पाहण्यासारखा असतो. श्रावणी पौर्णिमेस विठ्ठल-रुक्मिणी व परिवार देवतांना अलंकार घालतात. वद्यात बाजीराव पडसाळीत गोकुळ अष्टमी ( कृष्णाजन्म सोहळा) उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. या वेळी संतांची कीर्तने, भजने व प्रवचने होतात. शेवटी काल्याचा प्रसाद होऊन दिंडी निघते.
6) भाद्रपद महिन्यात गौरी-गणपतीचा उत्सव होतो. दोन्हीकडे श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. कार्यक्रम होतात व मिरवणुकीने 'श्री'चे विसर्जन केले जाते. याच महिन्यात शुध्द 10 ते 15 पर्यंत मंदिरात भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते.
7) आश्विन शुध्द प्रतिपदेपासून श्रीरुक्मिणी मंदिरात नवरात्र महोत्सव सुरु होतो. रात्री 'श्री'चा रथ सीमोल्लंघनाला जातो. तिथून परत आल्यावर 'श्री'ची पालखी निघते. आश्विन शु. पौर्णिमेस या महोत्सवाची सांगता होते. आश्विन वद्य प्रतिपदेला बांधलेबुवांच्या ओवरीत गीता अभ्यास मंडळाचा वर्धापन दिवस उत्साहाने व भक्तिभावाने संपन्न होतो.
8) कार्तिक मासात 'श्री'ची मोठी दुसरी यात्रा भरते. लाखो. भक्तगण येतात, पलंग निघतो. एकादशीला रथ निघतो. पालखी निघते. योग्य दिवस पाहून प्रक्षाळ पूजा होते. कार्तिक वद्यात श्रीपांडुरंग आळंदीला ज्ञानोबा माऊलीच्या भेटीसाठी जातात.
9) मार्गशीर्ष मासात भक्तगण हाती दिवटया घेऊन, मुखाने ''येळकोट-येळकोट'' घे, असे म्हणत श्रीखंडोबाच्या मंदिरात येतात. भंडारा उधळतात. दर्शन घेतात. शुध्द एकादशीला गीताजयंती गीता-पारायणाने साजरी केली जाते. पौर्णिमेस दत्तजयंती होते. मार्गशीर्ष महिन्यात श्रीविठ्ठल संपूर्ण महिनाभर चंद्रभागानदीच्या पात्रात, गोपाळपुराजवळ असलेल्या विष्णुपदावर निवास करतात. विष्णुपदावरील दगडी शिळेवर आजही गोपद्म व 'श्री'चे उमटलेले चरण, वाजवलेल्या मुरलीचे दर्शन होते. आळंदीतून आल्यावर भगवंत इथेच एक महिना राहतात. म्हणून भक्तगण विष्णुपदावर 'श्री' च्या दर्शनासाठी येतात. स्नान करतात, सहभोजन करतात. मार्गशीर्ष अमावास्येला इथे रुद्राभिषेक होतो व पुन्हा देव रथात बसून मंदिरात येतात.
10) पौष मासातील अमावास्येला गरुड खांबाचा उत्सव होतो. कर्नाटकातून भक्त पुरंदरदासांचे अनुयायी वैष्णव भक्तजन इथे येतात, गरुड खांबाची महापूजा करतात. गरुड खांबाला पीतांबर नेसवून, सुंदर सुवासिक फुलांनी सजवतात. ''पांडुरंग, पांडुरंग'' असा जयघोष करीत हे वैष्णवजन नामस्मरणी दंग होऊन जातात. मार्गशीर्ष व पौष या दोन महिन्यांत धनुर्मास येतो. या धनुर्मासात 'श्री'ना खिचडीचा नैवेध असतो. संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून असंख्य महिला वाणवसा करण्यासाठी व देवदर्शनासाठी मंदिरात गर्दी करतात.
11) माघ महिन्यातील शुध्द पंचमीला वसंतोत्सव सुरु होतो. वसंतपंचमीला मंदिरात तिळगुळाचे भजन होत असते. देवास पांढरा शुभ्र पोषाख केला जातो. पागोटे बांधले जाते व 'श्री'वर गुलालाची उधळण केली जाते. चांदीच्या गुलाबदाणीतून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणांवर केशरी सुवासिक रंगाची उधळण केली जाते. वसंतोत्सव सुरु झाला हे दर्शवणारी पणती महाद्वार घाटावर वाजत-गाजत जाऊन लावली जाते. याच महिन्यात माघी यात्रा भरते. माध शु. 13 औसा संस्थानच्या पीठाधिपतींचे मंदिराच्या सभामंडपात चक्रीभजन होते. हा सोहळा पाडण्यासारखा असतो. मंदिर भक्तांनी तुडुंब भरले. महाशिवरात्रीला श्रीमंत होळकर संस्थानच्या वतीने रात्री 'श्री' सं गंगास्नान घालून महापूजा केली जाते. याच महिन्यात श्रीविठ्ठलाचे परमभक्त वै. प्रल्हादबुवा बडवे महाराजांची पुण्यतिथी सभामंडपात समाधिस्थळावर मोठया भक्तिभावाने साजरी केली जाते. भजन, प्रवचन, कीर्तन व संगीताचे व्याख्यानांचे कार्यक्रम बडवे समाजाच्या वतीने केले जातात.
12) फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेस महाद्वार घाटावर व रुक्मिणी मातेच्या मंदिराजवळ उत्तरद्वारी होळी केली जाते. याला देवाची होळी म्हणतात, रंगपंचमीच्या दिवशी देवाचा डफ निघतो. रंगांची उधळण होते. 'श्री'स पांढरा शुभ्र पोषाख व पांढरे पागोटे बांधतात. देवावर उधळण होते. 'श्री'स पांढरा शुभ्र पोषाख व पांढरे पागोटे बांधतात. देवावर केशरी सुगंध टाकतात. होळीचा दिवस ते रंगपंचमीपर्यंत 5 दिवस रुक्मिणी मातेचे पुजारी उत्पात मंडळी उत्तरद्वारी छोटया मंडपात भक्तिरसाने ओथंबणाऱ्या व इतर लावण्या गावून श्रोत्यांना मुग्ध करतात. हा कार्यक्रम ऐकण्यासाठी लांबून लांबून लोक येतात.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणानिमित्त श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेस अलंकार घातले जातात.
असे आहेत श्रीविठ्ठलांच्या मंदिरी प्रतिवर्षी मोठया भक्तिभावाने संपन्न होणारे महोत्सव..

श्रीविठ्ठल मंदिरात होणारे वर्षातील उत्सव....

परब्रह्म पांडुरंगाचे बडवे परंपरेने चालत आलेले नित्योपचार, पूजा-अर्चा, उत्सव-महोत्सव, कुलधर्म, कुलाचाराप्रमाणे सेवाभावी वृत्तीने करीत असताना. नित्य पंचक्वान्नाचा महानैवेद्य, खिचडी, दहीभात, लोणी-साखर इ. नित्यप्रती भक्तिभावाने दाखविला जातो. आरती-धूपारतीनंतर 'श्री'ची दृष्ट काढली जाते. या श्रीविठ्ठलाचे वर्षभरात अनेक उत्सव-महोत्सव होत असतात.
1) चैत्र मासात नववर्षारंभी शु. प्रतिपदेला (गुढी पाडव्याचे दिवशी) 'श्री'च्या शिखरावरील सुवर्ण कळसावर ध्वज-उभारणी होते. भागवत धर्माची ध्वजा डौलाने फडकू लागते. 'श्री'स अलंकार घातले जातात. चैत्र शु. प्रतिपदा ते मृग नक्षत्र निघेपर्यत ( अंदाजे 7 जूनपर्यंत) 'श्री'स नित्य चंदनाची सुंगधी उटी लावण्यात येते. शिरा व वाटलेली डाळ असा प्रसाद असतो. चैत्र वारीचा महोत्सव चैत्र शु. प्रतिपदेपासून पौणिमेपर्यंत असतो. चैत्र शु. एकादशीला फराळाबरोबरच पुरणाचा महानैवेद्य असतो. श्रीरामनवमीचा उत्सव मंदिरात होतो. हरिदासी कीर्तन असते. पौर्णिमेस हनुमानजयंती उत्सव असतो.
(2) वैशाख महिन्यात 'श्री'स चंदनाची सुंगधी उटी लावतात. कित्येकदा उटीचेच विविध पोषाख केलेले असतात. रुक्मिणी माता व श्रीव्यंकटेशालादेखील उटी केली जाते. अक्षय तृतीयेस अलंकार घालतात. महानैवेद्यात आमरस असतो. वैशाख शु. 14 स नृसिंह जयंती उत्सव मंदिरात होतो. चैत्रगौरीनिमित्त श्रीलक्ष्मीमाता व रुक्मिणीमातेस अलंकार पूजा केली जाते. हळदीकुंकवाचा व ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो.
(3) ज्येष्ठ मासात मृगनक्षत्र मृगनक्षत्र निघेपर्यंत चंदनाची उची असते. थंड पाणी व फराळाचे पदार्थ 'श्री'स दाखवतात.
(4) आषाढ महिन्यात महायात्रा असते. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून सकलसंतांच्या पालख्या पंढरीस येतात. आषाढ शु. 5 च्या सुमारास दोन्हीकडील पलंग काढले जातात. नित्योपचार बंद होतात. 'श्री'चे दर्शन अहोरात्र चालू असते. आषाढ शु. एकादशीस 'श्री'चा रथ प्रदक्षिणेसाठी निघतो. पौर्णिमेला गोपाळपूर येथे गोपाळकाला होतो. रात्री पांडुरंगाची पालखी निघते. दुसऱ्या दिवशी महाद्वार काला होतो. यात्रेनंतर शुभमुहूर्तावर प्रक्षाळपूजा होते. रुद्र व पवयान सूक्ताचा अभिषेक होतो. साखरेने देवास चोळतात. उष्णोदकाने स्नान घालतात. समस्त बडवे व उत्पात पाणी उधळतात. देवास अलंकार व भरजरी पोषाख घालतात. पुन्हा नित्योपचार सुरु होतात. प्रक्षाळपूजेदिवशी शेजारतीनंतर 'श्री'स सुंठ, दालचिनी, पिंपळी, तुळस, गवती चहा अशा औषधी वनस्पतींचा काढा शिणवटा घालवण्यासाठी अर्पण करतात. याच महिन्यात चातुर्मास सुरु होतो. मंदिरात व पंढरपुरातील मठ. मंदिर व धर्मशाळेतून परंपरेप्रमाणे भजन, कीर्तन, प्रवचनादि कार्यक्रम अखंडपणे चालू होतात. आषाढ वद्य 13 ला नामदेव पुण्यतिथीचे दिवशी नामदेव समाधी (पायरी) ची महापूजा व सुंदर आरास केली जाते. भजन-कीर्तनादि कार्यक्रम होतात. काल्याने याची सांगता होते.
(5) श्रावण मासात शुध्द पंचमीला रुक्मिणी व पांडुरंगाकडे गौरीची स्थापना होते. गौरीपूजनासाठी नगरी व पंचक्रोशीतील असंख्य स्त्रिया येतात. मदिरात लोकगीते म्हणतात. अनेक प्रकारचे खेळ खेळतात. सायंकाळी मिरवणुकीने वाजत-गाजत भीमानंदीमध्ये गौरी विसर्जन केले जाते. हा उत्सव पाहण्यासारखा असतो. श्रावणी पौर्णिमेस विठ्ठल-रुक्मिणी व परिवार देवतांना अलंकार घालतात. वद्यात बाजीराव पडसाळीत गोकुळ अष्टमी ( कृष्णाजन्म सोहळा) उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. या वेळी संतांची कीर्तने, भजने व प्रवचने होतात. शेवटी काल्याचा प्रसाद होऊन दिंडी निघते.
6) भाद्रपद महिन्यात गौरी-गणपतीचा उत्सव होतो. दोन्हीकडे श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. कार्यक्रम होतात व मिरवणुकीने 'श्री'चे विसर्जन केले जाते. याच महिन्यात शुध्द 10 ते 15 पर्यंत मंदिरात भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते.
7) आश्विन शुध्द प्रतिपदेपासून श्रीरुक्मिणी मंदिरात नवरात्र महोत्सव सुरु होतो. रात्री 'श्री'चा रथ सीमोल्लंघनाला जातो. तिथून परत आल्यावर 'श्री'ची पालखी निघते. आश्विन शु. पौर्णिमेस या महोत्सवाची सांगता होते. आश्विन वद्य प्रतिपदेला बांधलेबुवांच्या ओवरीत गीता अभ्यास मंडळाचा वर्धापन दिवस उत्साहाने व भक्तिभावाने संपन्न होतो.
8) कार्तिक मासात 'श्री'ची मोठी दुसरी यात्रा भरते. लाखो. भक्तगण येतात, पलंग निघतो. एकादशीला रथ निघतो. पालखी निघते. योग्य दिवस पाहून प्रक्षाळ पूजा होते. कार्तिक वद्यात श्रीपांडुरंग आळंदीला ज्ञानोबा माऊलीच्या भेटीसाठी जातात.
9) मार्गशीर्ष मासात भक्तगण हाती दिवटया घेऊन, मुखाने ''येळकोट-येळकोट'' घे, असे म्हणत श्रीखंडोबाच्या मंदिरात येतात. भंडारा उधळतात. दर्शन घेतात. शुध्द एकादशीला गीताजयंती गीता-पारायणाने साजरी केली जाते. पौर्णिमेस दत्तजयंती होते. मार्गशीर्ष महिन्यात श्रीविठ्ठल संपूर्ण महिनाभर चंद्रभागानदीच्या पात्रात, गोपाळपुराजवळ असलेल्या विष्णुपदावर निवास करतात. विष्णुपदावरील दगडी शिळेवर आजही गोपद्म व 'श्री'चे उमटलेले चरण, वाजवलेल्या मुरलीचे दर्शन होते. आळंदीतून आल्यावर भगवंत इथेच एक महिना राहतात. म्हणून भक्तगण विष्णुपदावर 'श्री' च्या दर्शनासाठी येतात. स्नान करतात, सहभोजन करतात. मार्गशीर्ष अमावास्येला इथे रुद्राभिषेक होतो व पुन्हा देव रथात बसून मंदिरात येतात.
10) पौष मासातील अमावास्येला गरुड खांबाचा उत्सव होतो. कर्नाटकातून भक्त पुरंदरदासांचे अनुयायी वैष्णव भक्तजन इथे येतात, गरुड खांबाची महापूजा करतात. गरुड खांबाला पीतांबर नेसवून, सुंदर सुवासिक फुलांनी सजवतात. ''पांडुरंग, पांडुरंग'' असा जयघोष करीत हे वैष्णवजन नामस्मरणी दंग होऊन जातात. मार्गशीर्ष व पौष या दोन महिन्यांत धनुर्मास येतो. या धनुर्मासात 'श्री'ना खिचडीचा नैवेध असतो. संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून असंख्य महिला वाणवसा करण्यासाठी व देवदर्शनासाठी मंदिरात गर्दी करतात.
11) माघ महिन्यातील शुध्द पंचमीला वसंतोत्सव सुरु होतो. वसंतपंचमीला मंदिरात तिळगुळाचे भजन होत असते. देवास पांढरा शुभ्र पोषाख केला जातो. पागोटे बांधले जाते व 'श्री'वर गुलालाची उधळण केली जाते. चांदीच्या गुलाबदाणीतून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणांवर केशरी सुवासिक रंगाची उधळण केली जाते. वसंतोत्सव सुरु झाला हे दर्शवणारी पणती महाद्वार घाटावर वाजत-गाजत जाऊन लावली जाते. याच महिन्यात माघी यात्रा भरते. माध शु. 13 औसा संस्थानच्या पीठाधिपतींचे मंदिराच्या सभामंडपात चक्रीभजन होते. हा सोहळा पाडण्यासारखा असतो. मंदिर भक्तांनी तुडुंब भरले. महाशिवरात्रीला श्रीमंत होळकर संस्थानच्या वतीने रात्री 'श्री' सं गंगास्नान घालून महापूजा केली जाते. याच महिन्यात श्रीविठ्ठलाचे परमभक्त वै. प्रल्हादबुवा बडवे महाराजांची पुण्यतिथी सभामंडपात समाधिस्थळावर मोठया भक्तिभावाने साजरी केली जाते. भजन, प्रवचन, कीर्तन व संगीताचे व्याख्यानांचे कार्यक्रम बडवे समाजाच्या वतीने केले जातात.
12) फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेस महाद्वार घाटावर व रुक्मिणी मातेच्या मंदिराजवळ उत्तरद्वारी होळी केली जाते. याला देवाची होळी म्हणतात, रंगपंचमीच्या दिवशी देवाचा डफ निघतो. रंगांची उधळण होते. 'श्री'स पांढरा शुभ्र पोषाख व पांढरे पागोटे बांधतात. देवावर उधळण होते. 'श्री'स पांढरा शुभ्र पोषाख व पांढरे पागोटे बांधतात. देवावर केशरी सुगंध टाकतात. होळीचा दिवस ते रंगपंचमीपर्यंत 5 दिवस रुक्मिणी मातेचे पुजारी उत्पात मंडळी उत्तरद्वारी छोटया मंडपात भक्तिरसाने ओथंबणाऱ्या व इतर लावण्या गावून श्रोत्यांना मुग्ध करतात. हा कार्यक्रम ऐकण्यासाठी लांबून लांबून लोक येतात.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणानिमित्त श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेस अलंकार घातले जातात.
असे आहेत श्रीविठ्ठलांच्या मंदिरी प्रतिवर्षी मोठया भक्तिभावाने संपन्न होणारे महोत्सव..

Wednesday, June 6, 2007

भक्त पुंडलिक मंदिर...

भक्तराज पुंडलिकाचे मंदिर चंद्रभागेच्या पात्रात, महाद्वार घाटासमोर आहे. मंदिरासमोरच 20-25 फुटांवर लोहदंड तीर्थ आहे. या तीर्थात दगडी नाव तरते असे म्हणतात. पुंडलिक मंदिराची उंची 65 फूट आहे. व रुंदी 63 फूट आहे. मंदिराचे शिखर अत्यंत कलात्मक व आकर्षक आहे. हे प्राचीन मंदिर चांगदेवाने बांधले अशी आख्यायिका आहे. पेशव्यांचे सरदार भाटे यांनी या मंदिराचा जीर्णाद्वार केला. मंदिरामध्ये छोटा सभामंडप असून आतील बाजूस गर्भगार आहे. गाभा-यात शिवलिंग आहे. शिंवलिंगावर पुंडलिकाच्या पितळी चल मुखवटा आहे. या देवस्थानचे पुजारी कोळी आहेत. ते पुंडलिकाच्या मुखवट्यावर टोप घालून, नामम्रुदा लावून पुजा करतात. या ठिकाणी पहाटेपासून रात्रीपर्यंत पुंडलिकाचे नित्योपचार - कडकडआरती, महापूजा, महानैवेद्य, धूपारती, शेजारती इ. करतात. महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव होतो. येथील सर्व उपचार समस्त कोळी समाजाच्या वतीने केले जातात. नदीस पूर आल्यावर पुंडलिकाचा चल मुखवटा उद्धव घाटावरील महादेव मंदिरात ठेवून तिथे नित्योपचार केले जातात.
असेही म्हणतात, भक्तराज पुंडलिक कर्नाटकी ब्राह्मण होता. म्हैसूरजवळ 45 कि.मी. अंतरावर असलेल्या 'मेलकोटे' गावात कल्याण तीर्थाजवळ पुंडलिकाचे घर होते. कर्नाटकात पुंडलिकास पुंडलिक म्हणतात. तो कृष्णभक्त होता. मेलकोटे गावातील रंगशिळेवर कोरलेल्या चित्रातून पुंडलिकांचे दर्शन घडते. उंच भक्कम शरीरयष्टी, डोक्यावर कानटोपी, गळ्यात जानवे, कंबरेला धोतर, गळ्यात वीणा, हाती चिपळ्या अशी ही भजनरंगी तल्लीन झालेली पुंडलिकाची मूर्ती आहे. त्याच्या आईचे नाव मुक्ताबाई व वडिलांचे नाव जानूदेव अथवा जन्हूदेव होते. कुक्कुटस्वामींच्या आश्रमात घडलेल्या प्रसंगावर पुंडलिकाने मातृ-पितृसेवा केली आणि तुकाराम महाराज म्हणतात - " पुंडलिकाच्या भावार्था । गोकुळीहूनि जाला येता ।"
काही संशोधकांच्या मते, पुंडलिक मंदिर पुंडलिकेश्वर (शिवाचे मंदिर आहे. तर बहुसंख्य विद्वानांचे मत आहे की हे भक्त पुंडलिकाचेच मंदिर आहे.

श्रीरुक्मिणी मंदिर...

श्रीरुक्मिणी मंदिरात जाताना पाय-या चढून वर गेल्यावर राही व सत्यभामा यांची छोटी मंदिरे आहेत. या मूर्ती सुंदर, सुबक आहेत. शेजारीच रुक्मिणी मंदिराचा गाभारा लागतो. या मंदिराचे मुख्य गाभारा, मध्य गृह, मुख्य मंडप व सभामंडप असे चार भाग आहेत. मध्यगृहाच्या उत्तरेकडील बाजूस एक खोली आहे. हे रुक्मिणीमातेचे शेजघर आहे. शेजघराचे दरवाजे चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहेत. यात चांदीचा पलंग गाद्या, गिरद्या व मखमली बिछाना आहे.
गाभा-यात उंच चौथरा आहे. त्यावर अत्यंत रेखीव श्रीरुक्मिणीमातेची पूर्वाभिमुख मूर्ती आहे. देवीचे हाक कटीवर आहेत. नित्येपचारानंतर देवीला सौभाग्यालंकार घालून, वस्त्रे नेसवून सजवितात, ठसठशीत कुंकवाचा मळवट भरतात. अत्यंत प्रसन्न मुद्रा असलेली श्रीरुक्मिणी मातेची काळ्या गुळगुळीत दगडाची मूर्ती पाहताच भाविकभक्त 'आईसाहेब' 'मातोश्री' असे म्हणून भक्तियुक्त अंत:करणाने तिचे दर्शन घेतात. कंठ दाटून येतो. मातोश्रींची कृपा अखंडपणे लाभावी यासाठी भक्तजन तिची करुणा भाकतात व धन्य होतात.
मातोश्रींचे दर्शन घेऊन बाहेर येताच तीर्थप्राशन करुन उजवीकडून मंदिराच्या मागे जाता येते. तिथून लोक कळसाचे दर्शन घेतात आणि गोपुर दरवाजाच्या आत असलेल्या रुक्मिणी मदिराचा सभामंडपात अलीकडेच लाल पत्थरापासून अत्यंत कलात्मक पद्धतीने बनविलेला आहे. या मंडपामध्ये श्री रुक्मिणी स्वयंवरातील प्रमुख प्रसंगांची सुंदर, भव्य चित्रे पहावयास मिळतात. श्रीरुक्मिणी मातेचे सुंदर भव्य चित्र मन आकर्षून घेते. इथे एक दीपमाळ आहे.
या मंडपात नवरात्रौत्सवात 15 दिवस अऩेकानेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. चातुर्मासात श्रीमद् भागवतपुराण, प्रवचने, कीर्तने होत असतात. नवरात्रौत्सव हा श्रीरुक्मिणीमातेचा प्रमुख उत्सव, या काळात रोज मातेला विविध प्रकारजी पूजा बांधली जाते. सुवर्णालंकार घातले जातात. वसंत पंचमीला 'श्री' सह मंडपात सर्वत्र सुगंधी फुलांच्या माळांची आकर्षक अशी सजावट केली जाते.
श्रीरुक्मिणीमातेचे दर्शन घेऊन वर येताच एक ओवरी लागते. या ओवरीतील खोल्यांतून अनुक्रमे काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण-सीता, काळभैरव, रामेश्वर लिंग, दत्त व नृसिंह या लहान पण सुंदर मूर्तीचे दर्शन घडते. ओवरी संपताच सोळखांबीत प्रवेश करण्याचा एक दरवाजा आहे. त्यालगतच लक्षचौ-यांशी देवीची छोटी मूर्ती आहे. मूर्तीखाली भिंतीत एक प्राचीन शिलालेख आहे. हा शके 1995 मधील शिलालेख असून यात मंदिराच्या जीर्णीद्धारासाठी देणगी देणारांची नावे आहेत. भक्तमंडळी इथे पाठ घासतात. इथे पाठ घासली की चौ-यांशी लक्ष जन्मांचा फेरा चुकतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. खरेतर हा शिलालेख इतिहास-संशोधनाचे एक साधन आहे. पण श्रद्धाळू लोकांशी पाळ घासून घासून शिलालेख पुसट केला आहे. आता त्या शिलालेखावर लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे.
दर्शनार्थी भक्त लोक सर्व देवतांचे दर्शन घेऊन पुनश्च श्रीविठ्ठालाच्या दर्शनासाठी इथे सोळखांबीत येतात. या सोळखांबी मंडपाला पूर्वाभिमूख 3, दक्षिणेकडे 2 व उत्तरेकडील बाजूस 2 असे 6 दरवाजे आहेत. सावळ्या विठ्ठलाचे मुखदर्शन घेऊन त्याचे राजस सुकुमार रुप मनी-मानसी साठवून ठेवतात. पुन्हा विठ्ठलभेटची आस मनी बाळगून बाहेर निघतात. उजव्या बाजूस आणखी एक महत्त्वाचा शिलालेख पहावयास मिळतो.
श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन भक्तजन महाद्वारी येतात. महाद्वारातून नदीकडे जाताना डाव्या बाजूस श्रीकाळभैरवनाथ, श्रीशनैश्वर, श्रीशाकंबरी देवी व पुढे श्रीखंडोबाची छोटी मंदिरे लागतात. या मंदिरासमोरच नव्याने बांधलेले श्रीसंत नरहरी सोनाराचे मंदिर आहे. तेथील व्यवस्था समस्त सोनार समाज पाहतो. या मंदिराच्या मागे फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. जवळच श्रीमल्लिकार्जुनाचे सुंदर हेमाडंपती मंदिर आहे. प्रसिद्ध संत नरहरी सोनार याच शिवलिंगाची पूजा करीत असत. इथे जवळच त्यांचे घर व दुकान होते. नरहरी सोनार कट्टर शिवभक्त होते. पुढे त्यांना श्रीविठ्ठलाच्या कृपेने श्रीविठ्ठलाच्या मूर्तीत भगवान शंकराचे दर्शन झाल. नरहरी अद्वैतावस्थी झाले. शैव व वैष्णव संप्रदाय एक झाले. या भेटीची खूण म्हणूनच श्रीविठ्ठलाचे मस्तकी शिवलिंग आहे असे म्हणतात. या महाद्वाराच पूर्वी फार मोठी वेस होती. रस्तारुंदीकरणात ती पाडली गेली. वेशीशेजारी असलेले अकरा रुद मारुती मंदिर रस्त्यालगत पुनश्च जसेच्या तसे वसवले आहे. मारुतीपुढे नंदी आहे.

Tuesday, June 5, 2007

भागवत धर्म व वारकरी संप्रदाय...

वारकरी संप्रदाय आणि वारकरी पंथ हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. वारकरी लोक ज्या आचरणप्रणालीचे पालन करतात, ज्यामध्ये श्रीविठ्ठलभक्ती प्रमुख आहे त्या धर्माला भागवत धर्म म्हणतात. या भागवत धर्माचा पाया श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी घातला आणि श्री संत तुकाराम महाराजांनी या धर्ममंदिरावर कळस चढवला म्हणूनच वारकरी पंथाचा नित्यस्मरणी महामंत्र आहे - 'ज्ञानोबा तुकाराम'.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद्भगवद्नीतेवर सर्वजनसुलभ असे प्राकृत भाषेत भाष्य लिहिले. ही ज्ञानेश्वरी हे मराठी वाड्मयातील अनुपम लेणे आहे. भागवतधर्माचा प्रमाणभूत ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. भारतातील भीष्मपर्वात असलेली गीता संस्कृतमध्ये आहे. कुरुक्षेत्रावर महाभारतीय युद्धाच्या प्रारंभी मोहग्रस्त अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोगाचा सदुपदेश केला. त्याच गीतेतील 18 अध्यायांवर ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीतून भाष्य लिहिले. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे अनन्यसाधारण असे स्थान आहे. ज्ञानेश्वरीनंतर भागवत धर्मांचे विवेचन करणारे अनेक ग्रंथ संतसत्पुरुषांनी रचले. त्यापैकी नाथ भागवत, रामायण, नामदेवगाथा, तुकाराम गाथा इ. प्रमुख आहेत.
श्री ज्ञानेश्वर व नामदेव महाराजांच्या पूर्वकाळातही विठ्ठल संप्रदाय अस्तित्वात होता यास काही विद्वानांनी शैव संप्रदाय मानले आहे. ज्ञानेश्वर माऊलीनी भागवत धर्म किंवा विठ्ठल संप्रदायाला साधेसोपे स्वरुप देण्याचे महान कार्य केले. त्यांनी समाजातील सर्व वर्णांच्या लोकांना भक्तीची द्वारे खुली केली, सर्व जातीच्या, भाषेच्या, वर्णांच्या लोकांना 'भागवत धर्म' सहजसुलभ केला आहे. या संप्रदायाची आचारसंहिता बनविली. म्हणूनच " ज्ञानदेवे रचला पाया। उभारिले देवालया" असे म्हणतात.
संत तुकाराम महाराजांनी अभंग-संकीर्तनातून संसारातील कर्मे करीत विठ्ठलाचे नाम घेण्याचा उपदेश केला. संत जनाबाईने कर्मपूजा करता करता ईश भजावा हे सूत्र कष्टकरी जनतेला सांगितले. कोणतेही तीर्थव्रत न करता पंढरीची वारी करावी, हा संतानी जनतेला संदेश दिला आणि भक्तभाविकांनी तो आत्मसात केला. भागवत धर्मांचे बहुसंख्य अनुयायी ग्रामीण भागात राहतात. त्यांची श्रीविठ्ठल ही एकमेव देवता आहे. वारकरी पंथ, विठ्ठल पंथ, वैष्णवधर्म किंवा भागवत धर्म या सर्वांच्या शब्दांच्या मागे ही एकच कल्पना साकार आहे. ज्ञानेश्वर महाराज, त्यांचे गुरु व बंधु श्री निवृतिनाथ महाराज यांच्यापासून हा संप्रदाय सुरु झाला. तुकाराम एकनाथ, नामदेव, जनाबाई इ. अनेकानेक संतांनी या संप्रदायाचा प्रसार केला. या परंपरेतील अखेरचे संत निळोबाराय मानले जातात.
महाराष्ट्रातील सर्व संत स्वत:ला विष्णुभक्त किंवा वैष्णव म्हणवितात. शिव आणि विष्णु एकच प्रतिमा आहे असा अनुभव संत नरहरि सोनारांना आला. तोच अनुभव निळोबारायांनाही 'ऐक्यरुपे हरिहर । उभा कटीवर विटेवरी' या शब्दातून व्यक्त केला. समर्थ रामदासांना सावळ्या विठ्ठलाच्या ठिकाणी भगवान शंकर आणि प्रभु रामचंद्राचे दर्शन झाले. श्रीविठ्ठलाच्या मस्तकावर शिवलिंग आहे, म्हणून शैव आणि वैष्णव संप्रदायाचे लोक श्रीविठ्ठलोपासना करतात. निवृत्तिनाथ, सोपानदेव, विसोबा खेचर इ. संत नाथपंथातील अनुग्रहित शैव होते. श्री. ज्ञानदेवांच्या पूर्वजांनीही नाथपंथाचा अनुग्रह घेतला होता. काही इतिहासकारांच्या मते पंढरपूर हे शैवक्षेत्र होते. जेव्हा ज्ञानदेवादि चार भावंडे पंढरीस आली तेव्हा वारकरी संप्रदायाची लोकप्रियता पाहून त्यांनी या पंथाचा स्वीकार केला असेही मानले जाते. अशा प्रकारे पंढरपूर क्षेत्र समन्वयाचे तीर्थक्षेत्र आहे, तर भागवत धर्म हे वैदिक धर्मांचे सार आहे. वेद, उपनिदे, गीता, भागवत यांची थोरवी सकल संतांनी अभंगातून गायिली आहे.
वारकरी संप्रदाय हा ज्ञानोत्तर भक्तीचा संप्रदाय आहे, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी श्रवण करणे, विठ्ठलाचे अखंड चिंतन करणे हे या संप्रदायाचे मुख्य कर्तव्यकर्म, आचरण, पण हे सर्व संत वेदांती अथवा निष्कि्य नव्हते तर त्यांनी समाजाला सकि्य भक्तीचा मार्ग दाखविला. महाराष्ट्राचा हा भागवत धर्म विश्वव्यापी आहे. महाराष्ट्रातील नामदेवाही संतांनी तीर्थयात्रा करीत असताना भारतातील अन्य प्रदेशातून विठ्ठभक्तीचा प्रचार व प्रसार केला. गुरुग्रंथसाहेबमध्ये नामदेवांच्या प्राप्त होणा-या रचना याची साक्ष देतात.

भजन...

विठ्ठल विसावा सुखाची साऊल...
विठ्ठल विसावा सुखाची साऊली, प्रेम पान्हा घाली भक्तावती ॥धृ॥
दाखवी चरण दाखवी चरण, दाखवी चरण नारायणा ।
विठ्ठल आचार विठ्ठल विचार दावी निरंतर पाय आता ।
नामा म्हणे नित्य बुडालो संसारी, धावोनीया धरी हाती मज ।

जनी नामयाची रंगली कीर्तनी...
जनी नामयाची रंगली कीर्तनी, तेथे चक्रपाणी धाव घेई ॥धृ॥
मुखी हरीनाम नैत्र पैलतीरी देवाची पंढरी मोक्षवाटे-मोक्षवाटे ॥१॥
दळीता कांडीता वाहता कावडी कीर्तनात गोडी विठ्ठलाच्या विठ्ठलाच्या ॥२॥
चक्र टाकोनीया दळावे हरीने, भक्ताचे देवानी दास व्हावे दास व्हावे ॥३॥
जळो तुझे नाते जळो गर्व हेवा, तुझी आस देवा पांडुरंगा पांडुरंगा ॥ जनी ॥४॥

विठू माझा लेकुरवाळा , सं...
विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळाचा मेळा ।
निवृत्ती हा खांद्या वरी सोपाना हात धरी ।
पुढे चाले ज्ञानेश्‍वर, मागे मुक्ताबाई ही सुंदर गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी ।
बंका कडीयेवरी, नामा करांगुळी धरी ।
जनी म्हणे रे गोपाळा, करी भक्तांचा सोहाळा ॥

Monday, June 4, 2007

विठोबाच्या अन्य काही मूर्ती...

अहोबलम् (आंध्र प्रदेश) येथे असलेली विठ्ठलमूर्ती कमळ काढलेल्या एका बैठकीवर कमरेवर हात ठेवून उभी आहे. हिच्या हातात शंख आणि कमलनाल आहेत. मस्तकावर उंच, टोपीवजा नक्षीदार मुकुट आहे. ही मूर्ती पंढरपूर येथे सध्या आसलेल्या विठ्ठलमूर्तीपेक्षा खूपच जुनी असावी असे मत आहे. मुंबईतील जोगेश्वरी गुहेत आढळणारी एक भग्न मूर्ती विठ्ठलाची असावी, असा ग.ह.खरे ह्यांचा तर्क आहे. ह्या मूर्तीचे मस्तक, हात आणि गुडघ्यापासूनचा खालचा भाग नाहीसा झाला आहे, परंतु गळ्यात मोत्यांचा कंठा आणि कमरेस मेखला दिसते. मूर्तीचे धोतर गुडघ्यापर्यंत आलेले आहे. डाव्या मांडीवर धोतराच्या सुरकुत्या दिसतात., तसेच मेखलेचा लोबंता परदही दिसतो. पोकळीत बोटे घातलेला शंखही आहे. मेखलेचे एक टोक उजव्या मांडीवर आहे. गळ्यातल्या कंठ्याच्या फिती पाठीवर दिसतात. छातीच्या उजव्या भागावर लांब व कुरळ्या केसांची एक बट दिसते. ही मूर्ती आठव्या शतकाच्या उत्तरार्धातली असावी, असा ग.ह.खरे ह्यांचा तर्क आहे.
मुंबइर्च्या पिन्स आँफ वेल्स म्यूझियममध्ये घारापुरीच्या लेण्यांतून आणलेली एक उभी मूर्तीही विठ्ठलाची असण्याची शक्यता वाटते. ही मूर्तीही भग्नावस्थेत आहे. हिच्या कमरेच्या वरचा भाग पूर्णपणे नष्ट झालेला आहे. कमरेस वस्त्र, वर मेखला, डाव्या मांडीवर टेकलेला व पोकळीत डाव्या हाताची बोटे असलेला शंख हे सर्व स्पष्ट दिसते; पण ह्या मूर्तीच्या उजव्या बाजूस एक उभी स्त्री व डाव्या बाजूस उभा, बुटका आणि लठ्ठ असा गण आहे. ही मूर्ती आठव्या शतकाच्या दुस-या पावक्यातील असावी, असा ग.ह.खरे ह्यांचा तर्क आहे.
कर्नाटकात मंड्या जिल्ह्यातील गोविंदहळ्ळी येथे, तसेच हसन जिल्ह्यातील हरणहळ्ळी येथे चेन्न केशवाच्या मंदिरात, बसरुल (जि. मंड्या) येथील मल्लिकार्जूनमंदिरात आणि नागलापूर (जि. तुमकूर) येथे विठ्ठलमूर्ती आहेत. बेल्लारी जिल्ह्यातील हंपी येथील विरुपाक्षमंदिरातही विठ्ठलमूर्ती आहे.
तामिळनाडूत श्रीरंगम् (जि.तिरुचिरापल्ली) येथील रंगनाथमंदिरात तंजावर येथील विष्णुमंदिरात विठ्ठलमूर्ती असून ती श्रीदेवीभूदेवीसह आहे. हैदराबाद येथे एका खाजगी संग्रहात विठ्ठलाची एक सुबक मूर्ती आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आणि नेवाशाजवळ टाकळीमान म्हणून असलेल्या एका गावी एका मंदिरात चतुर्भुज विठ्ठल आढळतो. हे मंदिर यादवकालीन आहे, असे मत सुरेश जोशी ह्या अभ्यासकांनी मांडलेले आहे. टाकळीभान येथील विठ्ठलमूर्तीचे वैशिष्टय म्हणजे ह्या मूर्तीला मिशा कोरलेल्या आहेत. चांदीचे डोळे बसविले आहेत. मस्तकावर शाळुंकेसह शिवलिंग स्पष्टपणे कोरलेले आहे. येथे विठ्ठलाला चार हात आहेत. ह्या मूर्तीची शैली लोकशिल्पाची आहे. आज उपलब्ध असलेल्या विठ्ठलाच्या मूर्ती पाहिल्या, तर त्या कधी दोन हात, तर कधी चार हात असलेल्या आहेत. काही विष्णूच्या रुपात आहेत, तर काही गोपाळकृष्णाच्या रुपात आहेत. मूर्तीच्या हाती कधी शंख-चक्र, तर कधी शंख-पद्म आहे. कधी शंख-वरदमुद्रा, तर कधी शंख अभयमुद्रा आहे. चौकोनी पादपीठावर वा विटेवर उभ्या असलेल्या मूर्ती आहेत; पण कमलफुलात पाय घोट्यांच्या वरपर्यंत झाकलेली मूर्तीही आढळते. कमरेवर हात असणे हे मात्र सर्व मूर्तींना समान असे लक्षण आहे. कोणत्याही मूर्तिलक्षणग्रंथाचा विठ्ठल हा विषय झालेला नाही, मात्र दक्षिणेतील अनेक प्राचीन विठ्ठलमूर्ती ह्या स्कांद पांडुरंगमाहात्म्यात वर्णन केलेल्या विठ्ठलमूर्तीशी ब-याच संवादी आहेत, असे डाँ.ढेरे ह्यांनी नमूद केले आहे.

Friday, June 1, 2007

गोपाळपूर...

विष्णुपदाच्या पश्चिमेस सुमारे अर्धा कि. मी. अंतरावर पुष्पावती नदीच्या काठी एका टेकडीवर श्रीगोपालकृष्ण मंदिर आहे, मंदिर भव्य व विशाल आहे. मंदिरातील गोपाळकृष्णाची मूर्ती अतिशय सुंदर, सुबक व प्रसन्न आहे. मूर्तीचा चेहरा हुबेहुब श्रीविठ्ठलाच्या चेह-यासारखा आहे. नामदेवरायांनी अभंगात वर्णन केल्याप्रमाणे "देहुडाचरणी वाजवितो वेणू। गोपिका रमणु स्वामी माझा।।" मंदिरात देहुडाचरणी उभे राहून वेणु वाजवीत असलेली भगवान गोपाळकृष्णाची मूर्ती आहे. मागे गायी आहेत. या मंदिराच्या आवारातच भगवान श्रीकृष्णाचे सासरे भीमकराजाचे मंदिर आहे. या मंदिरात जनाबाईची गुहा आहे. जनाबाईचा संसार आहे. जनीचे जाते आहे. जात्यावर बसून श्रीविठ्ठलाने जनीसंगे दळण दळले होते अशी आख्यायिका आहे. यशोदेच्या दधिमंथनाची जागा आहे. लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे.
मंदिराचे आवार मोठे, प्रशस्त असून भोवती दगडी तटबंदी आहे. सभोवार ओव-या आहेत. येथील पाषाण 500 वर्षापूर्वीचे असावेत असा मूर्तिशास्त्र संशोधकांचा, तज्ञांचा अंदाज आहे. येथील व्यवस्था गुरव समाजाचे लोक पाहतात. इथे सर्व प्रकारचे नित्योपचार केले जातात. इथे गोकुळ अष्टमीस महापूजा केली जाते. अलंकार घातले जातात. आषाढी व कार्तिकी यात्रेला पौर्णिमेस इथे गोपाळकाल्याचा उत्सव होतो. आषाढी पौर्णिमेस सर्व संतांच्या पालख्या इथे जमा होतात. कीर्तने होतात, दहीहंडी फोडली जाते. येथील काल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय यात्रेची सांगता होत नाही, वारी पूर्ण होत नाही असे भाविक लोक मानतात.
या मंदिराला तीन दरवाजे आहेत. मंदिरात ४२ खोल्या आहेत. मुख्य दरवाजा उंच, भव्य आकर्षक आहे. काही संशोधकांच्या मते अफझलखानाची बेगमपूर (ब्रह्मपुरी) इथे छावणी असताना त्याने या मंदिरावर हल्ला केला. गुरव मंडळींनी त्या वेळी मूर्तीचे रक्षण केले व पुनस्थापना केली. मंदिरातील शिलालेखाचे आधारे इ. च्या १७४४ साली हे कृष्ण मंदिर तळेगावचे अनंत श्यामजी दाभाडे यांनी बांधले, तर महादेवाचे मंदिर सातारा येथील परशुराम अनगळ यांनी बांधले.

विष्णुपद तीर्थ...

चंद्रभागा नदीच्या पात्रात पुंडलिक मंदिराच्या दक्षिणेस सुमारे १ कि.मी. अंतरावर हे तीर्थ आहे. नदीच्या पात्रात पाषाणस्तंभावर दगडाने बांधलेले ३१ फूट परिघाचे व १२ फूट उंचीचे हे मंदिर आहे. या सोळखांबी आकाराच्या मंदिराची मूळ बांधणी इ. 1640 मध्ये धामणकरबुवांनी केली. पुढे सन. 1875 मध्ये चिंतोपंत नागेश बडवे यांनी या मंदिरास सुंदर रुप दिले. मंदिरात मध्यभागी चौकोनात श्रीगोपालकृष्णाची समचरण व देहुडाचरण अशी दोन प्रकारची पावले आहेत. शेजारी गाईंची पावले (खूर) आहेत. दहिकाल्याच्या वाटीची खूणही आहे. पुंडलिकासाठी भगवान श्रीकृष्ण इथे आले, गाई सोडल्या व खेळविल्या. गोपगणांसह इथे वनभोजन केले. अशी कथा या तीर्थासंबंधात प्रल्हादमहाराज बडवे यांनी सांगितली आहे. भगवान श्रीविठ्ठलनाथ आळंदीहून परत आल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात इथेच राहतात म्हणून या महिन्यात या स्थानाला यात्रेचे स्वरुप येते. इथे लांबलांबून लोक दर्शनास व सहभोजनास येतात, मार्गशीर्ष अमावास्येला श्रीविठ्ठलांची पावले पालखीत ठेवून समारंभपूर्वक मिरवत आणून देवांना पुन्हा मंदिरात आणले जाते. या ठिकाणी जाण्यास घाट व पूल आहे, तसेच नदीच्या पात्रातून नावेतून जाता येते. येथील व्यवस्था बडवे पाहतात. या तीर्थाजवळच नदीच्या पात्रात 'नारदा'चे सुंदर मंदिर आहे. मूर्ती अतिशय सुंदर व आकर्षक आहे. याची व्यवस्था कोळी बांधव पाहतात-.