Sunday, June 26, 2011

पंढरीच्या वाटेवरी, वारी पर्यावरणाची


'ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ' चा अखंड जयघोष आणि साथीला पर्यावरण जागृती विषयक फलक हाती घेतलेले वारकरी...! हे चित्र होते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या आळंदी ते पंढरपूर या ' पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी ' या वारीमधले.

पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी ते पंढरपूर अशा पर्यावरण वारीचे आयोजन करण्यात आले आहे. आज कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सकाळी १०.०० वाजता पुणे महानगरपालिकेचे आयुक्त महेश पाठक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राधेशाम मोपलवार, मंडळाचे पुणे विभागीय अधिकारी पी.के.मिराशी यांच्या उपस्थितीत या वारीचा शुभारंभ करण्यात आला.

आळंदी ते पंढरपूर या पायी वारीत किर्तन प्रवचन, भारूड, पोवाडे अशा लोककलांच्या माध्यमातून प्लास्टीक हटाव, वसुंधरा बचाव, झाडे लावा झाडे जगवा, उर्जा बचत, पाणी बचत, सेंद्रिय खतांद्वारे हरित क्रांती करा असे विविध संदेशाचे फलक हाती घेऊन वारीला प्रारंभ झाला. सलग 15 दिवस हा संदेश वारीच्या माध्यमातून प्रसारित केला जाणार आहे. या वारीत दोनशे वारकरी सहभागी झाले आहेत. सुप्रसिध्द शाहीर देवानंद माळी, भारूड रत्न चंद्राबाई तिवाडी, ... ज्ञानेश्वर वाबळे आदि वारकरी लोककलावंतांचा या वारीत समावेश आहे.

प्रारंभी आयुक्त महेश पाठक यांनी नारळ अर्पूण वारीचा प्रारंभ केला. यावेळी वारक-यांनी उस्त्फूर्तपणे केलेल्या किर्तन, भजन साथीला मृदूंग-टाळांच्या गजराने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.