Monday, July 13, 2015

श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर

श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर
श्री. विठ्ठलांच्या दैनंदिन नित्यपुजेच्या योजने बाबतची माहिती.
दिनांक 12/08/2014 रोजी समितीच्या बैठकीतील निर्णयप्रमाणे दिनांक 19/02/2015 पासून इच्छुक भाविकांकडून रु. 51,000/- देणगी घेवून श्री. विठ्ठलाची दैनंदिन नित्यपूजा ( पहाटे 4 ते 6 यावेळेतील ) त्यांचे हस्ते करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. तसेच त्या पुजेच्या वेळी पदस्पर्श रांगेत उभ्या असलेल्या एका भाविक पती पत्नीला त्या पूजेमध्ये विनामूल्य सहभागी करुन घेण्याचे ठरलेले आहे. सदरच्या नित्यपुजा आषाढी यात्रा ( शुद्ध प्रतिपदा ते वद्य पंचमी), कार्तिकी यात्रा (शुद्ध प्रतिपदा ते वद्य पंचमी), माघ यात्रा (शुद्ध पंचमी ते शुद्ध पौर्णिमा) व चैत्र यात्रा ( शुद्ध पंचमी व शुद्ध पौर्णिमा ) हा कालावधी सोडून इच्छुक भाविकांना उपलब्ध असणार आहेत. सदर योजने प्रमाणे दिनांक 19/02/2015 ते 31/12/2015 या कालावधीतील नित्यपूजेचे बुकींग इच्छुक भाविकांसाठी उपलब्ध करण्यात येत आहे. संबधित एका दिवसाच्या पुजेसाठी ज्या भाविकांचा अर्ज समितीकडे प्रथम प्राप्त होईल त्या भाविकांला सदर पुजेचा मान दिला जाईल.
दुस-या अर्जाचा विचार केला जाणार नाही. इच्छूक भाविकांनी त्यासाठीचा विहीत नमून्यातील अर्ज संपूर्ण भरून, देणगी रक्कम रु. 51,000/- च्या कार्यकारी अधिकारी श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांचे नावाचे डिमांड ड्राफ्ट सह रोख रक्कम भरली असल्यास पावतीच्या झेरॉक्स प्रतीसह मंदिर समितीकडे रजिस्टर पोस्टाने किंवा समक्ष दाखल करणे आवश्यक आहे पुजेसाठी उपलब्ध तारखेची माहिती आधी घेऊन अर्ज करणे आवश्यक राहील. पुजेच्या अधिक चौकशीसाठी 02186-224466 व 223550 क्रमांकावर नित्योपचार विभागाकडे संपर्क साधावा.
नित्यपुजेबाबतच्या अटी, शर्ती व नियम :
1. नित्यपूजेच्या वेळी समितीच्या उपस्थित पुजा-यांमार्फत ज्या सूचना देण्यात येतील, त्या सुचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक राहील.
2. नित्यपूजेसाठी इच्छुक भाविक व त्यासोबतच्या 9 व्यक्तींना पुजेच्या दिवशी पहाटे 3.45 वाजता व्ही.आय.पी गेट मधून प्रवेश देण्यात येईल. प्रवेशाचे वेळी नित्यपूजा मंजुरीचे मूळ पत्र व सर्वांची मूळ ओळखपत्र तपासून प्रवेश देण्यात येईल. पुजेला मंदिरात येताना पादत्राणे, मोबाईल, कॅमेरा, पर्स इत्यादी वस्तु सोबत आणता येणार नाहीत.
3. नित्यपूजेच्या वेळी इच्छूक भाविकांच्या कुटुंबातील 5 व्यक्तींना ( पती व पत्नी, त्यांचे आई वडील आणि मुले या पैकी 5 व्यक्ती ) पुजेसाठी श्री. विठ्ठलाच्या गाभा-यात प्रवेश दिला जाईल. अशा व्यक्तींची नांवे अर्जात नमूद करणे आवश्यक राहील. तसेच त्यांच्या फोटो ओळखपत्रांच्या झेरॉक्स प्रती अर्जा सोबत जोडणे आवश्यक राहील. तसेच पुजेच्या वेळी मूळ ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
4. श्री. विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन रांगेतील एका भाविक पती-पत्नीस नित्यपूजेसाठी सहभाग करुन घेणे आवश्यक राहील. सदरच्या भाविक पती-पत्नीची निवड मंदिर समितीच्या नित्योपचार विभागकडून करण्यात येईल.
5. इच्छूक भाविकांच्या कुटुंबातील पूजेसाठी गाभा-यात प्रवेश करणा-या पुरुषांनी सोवळे व उपरणे आणि महिलांनी व लहान मुलांनी स्वच्छ धुतलेली वस्त्र नेसणे आवश्यक राहील.
6.सदर नित्य पूजेच्या वेळी पुजारी श्री.वि़ठ्ठलाला केशर पाणी घालत असताना आपणास हलक्या हाताने श्रीच्या मुर्तीस स्पर्श करुन स्नान घालता येईल. त्यावेळी मूर्तीची झीज होणार नाही या दृष्टीने हातामध्ये अंगठी सारखी कोणतीही वस्तु घालता येणार नाही.
7. श्री. विठ्ठलाचे स्नान झालेनंतर पुजा-या मार्फत पोषाख, नैवैद्य व आरती करण्यात येईल. त्यावेळी आपणासं गाभा-या बाहेर बसविण्यात येईल. त्यानंतर आपल्या 5 व्यक्तींना श्री. विठ्ठलास तुळशी व फुले अर्पण करुन पदस्पर्श दर्शन करुन मंदिर समितीकडून देण्यात येणारा, पेढ्याचा नैवेद्य दाखविता येईल. त्यानंतर आपल्या उर्वरीत 5 नातेवाईकांना श्री. विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शनाला लाभ घेता येईल.
8. नित्यपूजेच्या वेळी इच्छुक भाविकाच्या कुटुंबातील वर नमूद 5 व्यक्ती शिवाय, नात्यातील अन्य 5 व्यक्तींना मंदिरातील चांदीच्या कमानी जवळ बसून पुजा पाहता येईल. त्यांना गाभा-यात प्रवेश दिला जाणार नाही. अशा 5 व्यक्तींची नांवे अर्जात नमूद करणे आवश्यक राहील. तसेच त्यांच्या फोटो ओळखपत्राच्या झेरॉक्स प्रती अर्जा सोबत जोडणे आवश्यक राहील. तसेच पुजेच्या वेळी मुळ ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
9. पुजेसाठी येत असले बाबातचा खात्रीशीर निरोप पुजेच्या आदल्या दिवशी सांयकाळी 6 वाजेपर्यंत नित्योपचार विभागास देणे आवश्यक आहे.
10. एकदा पुजेचे बुकींग केले नंतर कोणत्याही कारणास्तव रद्द करता येणार नाही व देणगीची रक्कम परत मागता येणार नाही.
11. अति महत्त्वाच्या कारणांसाठी आपली पुजा रद्द करण्याचा अधिकार या कार्यालयास राहील. त्याबाबत कोणतीही तक्रार करता येणार नाही. त्यावेळी पुजेची पुढील उपलब्ध तारीख आपणास देण्यात येईल. किंवा भाविकाची इच्छा असल्यास देणगीची रक्कम परत करण्यात येईल.
12. अपूर्ण माहिती भरलेले आणि अर्जात नमूद केलेली कागदपत्र न जोडलेले अर्ज नामंजूर करण्यात येतील.
13. आपला अर्ज इकडे प्राप्त होण्यास पोस्टा मार्फत विलंब झालेस. हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. 

No comments: