Thursday, July 12, 2007

महाराष्ट्र टाइम्सचा आषाढी विशेषांक प्रसिद्ध....

पंढरपूरची माहिती लोकांनापर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स या दैनिकांनी दि. 12 जुलै रोजी आषाढी विशेषांक प्रसिद्ध केला आहे. हा विशेषांक प्रसिद्ध करण्याचे संयोजक विश्वशांती केंद्र (आळंदी माईर्स एमआयटी, पुणे, भारत यांनी केले आहे. या अंकात भरतकुमार राऊत यांनी लिहिलेले 'नाचती वैष्णव भाई रे..' ! यामध्ये आषाढीसारखा जनतेचा उत्सव क्वचित आढळेल असे ते म्हणतात. ह्या विशेषांकात या वारीत... असे मुख्य भाग असून या विशेषांकसाठी मान्यवर डाँ. विश्वनाथ दा. कराड, रघुनाथ मेदगे, गंगाराम तळेकर यांचे लेखन आपणास वाचायला आवडेल. डाँ. जयंत नारळीकर, डाँ. रघुनाथ माशेलकर, डाँ विजय पा. भटकर असे विज्ञानवंतांची मुलाखतीही चांगल्या झाल्या आहेत. विशेषांक मांडणी व छपाई उत्तम आहे.
त्या अंकाची काही लेख http://maharashtratimes.com/ ह्या संकेतस्थाळवर उपलब्ध आहेत.

Friday, July 6, 2007

वारी पंढरीची...

दै. सकाळ यांच्या वेबसाईटवर वारी पंढरीची.. मुख्यपानावर लिंक दिलेली आहे. यांत वारी पंढरीची याविषयीची माहिती आहे.
यांत त्यांनी आँडिओ, वारीचे महात्म्य, वारकरी, दिंडी, असे विभाग केले आहे. ह्या साईटवर जाण्यासाठी ही लिंक खाली दिलेलीआहे. http://www.esakal.com/features/pandharichiwari/wari_main.html - दै सकाळ आभार

Thursday, July 5, 2007

पूररेषेच्या तडाख्यात विठ्ठल मंदिरे

पूररेषेतील नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे पंढरपूरवासीय धास्तावले असून, नव्याने आखण्यात आलेल्या 'रेड लाईन' पुररेषेत पंढरपूर शहराचा 90 टक्के परिसर पाण्याखाली येत असल्याचे दर्शविले आहे. भविष्यात शासन पुनर्वसनाच्या मुद्यावर अडून बसले तर श्री विठ्ठल मंदिरासह सुमारे 25 हजार कुटुंबाचे स्थलांतर करण्यासाठी एक नवे पंढरपूर शासनाला विकसित करावे लागणार आहे.
भीमेला सातत्याने येणारा पूर अन् या पुरामुळे पंढरीतील नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी शासनाने गांभीर्याने विचार केला आहे. पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत हा विषय मांडून पूररेषेतील लोकांचे कायम पुनर्वसन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला.
पंढरपूर शहर हे समुद्रसपाटीपासून साधारण 460 मीटरच्या उंचीवर आहे. यापूर्वी 452 मीटरपर्यंत पुराच्या पाण्याने पातळी गाठली होती. ही परिस्थिती लक्षात घेता नव्याने दाखवितात आलेली 'रेड लाईन' रेषा ही 458 मीटरपर्यंत दाखविण्यात आली आहे. म्हणजे या रेषेत शहर व उपनगरातील 90 टक्के परिसर येतो. ही गोष्ट धक्कादायक असून, यात पंढरपूर कॉलेज, शासकीय वसाहत, तालुका पोलीस ठाणे, परदेशी नगर, गुरुकृपा सोसायटीचा काही भाग, यमाई तलाव या खालचा संपूर्ण परिसर पुराच्या पाण्याखाली जाईल.
'ब्लू लाईन'साठी तीन लाख क्युसेक्सपर्यंत पाणी भीमेत सोडावे लागते, तर 'रेड लाईन'चा परिसर पाण्याखाली येण्यासाठी सुमारे दहा लाख क्युसेक्स पाणायाची आवश्यकता आहे. मुसळधार पाऊस आणि पाणी थोपविण्यासाठी असलेली अपुरी साधने लक्षात घेता शासनाच्या पूर नियंत्रण विभागाने ही 'रेड लाइन' तयार केली आहे. या 'रेड लाइन'वरुन जर शासनाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला, तर पंढरपूर शहरातील सुमारे 25 हजार कुटुंबाचे स्थलांतर करावे लागेल.
- सुनील उंबरे ( दै सामना)

Monday, June 25, 2007

पंढरपूर क्षेत्र - परिसरातील मंदिरे.... (भाग -2)

8) श्री. द्वारिकाधीश मंदिर (श्रीमंत शिंदे सरकार वाडा ) : महाद्वार घाटावरच भव्य, दगडी तटबंदी असलेले श्री द्वारिकाधीशाचे मंदिर आहे. हे मंदिर बाहेरुन किल्ल्यासारखे दिसते. मंदिराला चार भव्य दरवाजे आहेत. देवळात चारही बाजूला प्रशस्त ओवऱ्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर जय-विजयाच्या मूर्ती आहेत. मुख्य मंदिरातील श्रीद्वारिकाधीशा (मुरलीधर)ची शाळीग्रामची मूर्ती अतिशय देखणी आहे. मूर्ती चतुर्भुज आहे. मस्तकी चांदीचा मुकुट आहे. या मंदिरात गोकुळ अष्टमीस तीन दिवस मोठा उत्सव असतो. या मंदिराचे बांधकाम 1249 साली करण्यात आले. ग्वालियरचे महाराज दौलतराव शिंदे यांच्या पत्नी महाराणी बायजाबाई महाराज राणीसाहेब यांनी बांधले, याच मंदिरात श्रीराधिका, श्रीरुक्मिणी, श्रीगणपती व गरुड तसेच बाइजाबाईसाहेब महाराज यांच्या मूर्ती आहेत. या मंदिर व वाडयाच्या बांधकामाच्या भक्कमपणाची परीक्षा पाहण्यासाठी वाडयावरुन हत्ती फिरवले गेल्याची कथा सांगितली जाते.
9) ताकपिठे विठोबा मंदिर : श्रीविठ्ठल मंदिराचे पिछाडीस पश्चिमद्वार रस्त्याला, चौफाळयाकडून मंदिराकडे जाताना उजव्या हाताला, मंदिरापासून फक्त 250 ते 300 फूट अंतरावर हे प्राचीन ऐतिहासिक मंदिर आहे. पुढे सभामंडप आहे. मुख्य व्यासपीठावर श्रीविठ्ठलाची मूर्ती आहे. हे मंदिर सन 1618 साली रमाबाई नावाच्या एका ब्राम्हण महिलेने बांधले असा ऐतिहासिक पुरावा आहे. ती श्रीविठ्ठलभक्त होती. रोज 'श्री'ना ताक व पीठ एकत्र करुन नैवेद्य दाखवीत असे. स्वत: श्री विठ्ठलनाथ तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन ताकपीठ खाण्यासाठी येत असत, अशी एक कथा आहे. या मंदिरातील मूर्तीत व मुख्य मंदिरातील मूर्तीत साम्य आहे. यात्रा काळात गर्दीमुळे मुख्य मंदिरातील श्रीविठ्ठलाचे दर्शन झाले नाही तर भाविक वैष्णवभक्त इथे येऊन दर्शन घेतात. येथील व्यवस्था महाजन बडवे यांच्याकडे आहे.
9) गोपालकृष्ण मंदिर : एस् टी स्टँडकडून मंदिराकडे जाताना चौफाळा भाग लागतो. याच चौफाळयात दगडी बांधकामाचे इंद्रापूरच्या नारायण नाखरे नावाच्या व्यक्तीने 1770 साली बांधलेले गोपालकृष्ण मंदिर आहे. हे मंदिर श्रीविट्ठल मंदिराच्या पश्चिमेस आहे. यात्राकाळात नगर प्रदक्षिणेला जाणाऱ्या सर्व दिंडया, पालख्या इथे थांबवितात, अभंग म्हणतात. या ठिकाणाहून श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कळसाचे दर्शन होते. या मंदिरावर शिखर आहे. मंदिरातील श्रीगोपाळकृष्णाची मूर्ती अतिशय सुंदर, मनमोहक आहे. या मंदिरात गोकुळ अष्टमीस उत्सव होतो व दहीहंडीचा कार्यक्रम होतो. या मंदिराच्या मागील बाजूस श्रीविठ्ठल मंदिराकडे मुख करुन बसवलेली श्रीगजाननाची पितळी मूर्ती आहे. भाद्रपद महिन्यात या ठिकाणी दहा दिवस धार्मिक कार्यक्रम होतात.
9) काळा मारुती मंदिर : प्रदक्षिणा मार्गावर विठ्ठल मंदिराच्या दक्षिणेस काळामारुतीचे भक्कम दगडी बांधकाम असलेले मंदिर आहे. गर्भागार व 4 खांबांवर आधारलेला सभामंडप असे या मंदिराचे दोन भाग आहेत. सन. 1799 साली रामचंद्र नावाच्या एका गरीब ब्राह्मणाने हे मंदिर बांधले व 1960 साली मुंबईच्या एका गुजराती वैष्णवाने सभामंडप बांधला असा संदर्भ सापडतो. हनुमानजयंतीला येथे मोठा उत्सव होतो. या मंदिराचे संदर्भात असे सांगतात की संत भानुदासाने अनागोंदीहून भक्तिबळावर आणलेली विठ्ठलमूर्ती वारकऱ्यांनी वाजतगाजत मंदिरात नेली व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. या विजयाचे स्मारक म्हणून काळया मारुतीची स्थापना केली गेली. इथे थांबून विजयाचा अभंग गातात.
10) नामदेव मंदिर : प्रदक्षिणेच्या मार्गावर विणेगल्लीजवळ कासार घाटाशेजारी नामदेव मंदिर आहे. केशवराज संस्थेने या मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे. या मंदिराची जागा पूर्वी नामदेव टेकडी म्हणून प्रसिध्द होती. याच जागेत विठुरायाचे लाडके भक्त संत नामदेवांचे वास्तव्य होते. याच जागेवर भव्य व अतिशय सुंदर असे मंदिर बांधले असून मंदिरात संतश्रेष्ठ श्रीनामदेव व श्रीकेशीराज (श्रीविठ्ठल) यांच्या अत्यंत मनमोहक मूर्ती आहेत. संत जनाबाईचीही छोटी मूर्ती या मंदिरात आहे. या मंदिरात संत नामदेवाच्या 16 व्या पिढीतील वंशज राहतात. मंदिरात नामदेवरायांची हस्तलिखित गाथा आहे. मंदिरात संत नामदेवांची पुण्यतिथी हा मंदिरातील मुख्य उत्सव आहे
11) श्रीधर स्वामी समाधी मंदिर : कुंभार घाटावर हे समाधिमंदिर आहे. 250 वर्षांपूर्वी होऊन गेलेले श्रीधर स्वामी नाझरेकर महान भक्त व श्रेष्ठ कवी होते. त्यांनी शिवलीलामृत, रामविजय, हरिविजय, पांडवप्रताप, अंबिका उदय इ. प्रासादिक ग्रंथांची रचना केली. आजही या ग्रंथांचे घराघरांत वाचन, पारायण केले जाते. माघ महिन्यातील वद्य पंधरवडयात तृतीयेस श्रीधरस्वामींची पुण्यतिथी उत्सव, धार्मिक कार्यक्रम करुन साजरा करतात.
12) श्रीज्ञानेश्वर मंदिर व श्रीनाथ मंदिर : प्रदक्षिणेच्या मार्गावर नाथ चौकात ही दोन संतांची मंदिरे आहेत. आळंदीच्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने या मंदिराच जीर्णोध्दार करण्यात आला आहे. मंदिरावर मंदिरावर सुंदर शिखर बांधले आहे. या मंदिरात श्रीज्ञानेश्वर माऊलींच्या पितळी मुखवटा आहे. आषाढी यात्रेत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पालखी इथेच असते. इथून जवळ श्रीनाथ मंदिर आहे. एकनाथ षष्ठीला इथे उत्सव होतो.
याशिवाय पंढरपुरात अनेक मंदिरे आहेत. त्यांपैकी रामबागेत श्रीरामाचे मारवाडी समाजाचे मोठे मंदिर आहे. हे मंदिर अंबाबाई पटांगणाजवल, श्रीव्यास-नारायणाचे मंदिरासमोर आहे. येथे प्रतिवर्षी रामजन्मोत्सव मोठया थाटामाटाने संपन्न केला जातो.
सावरकर पथावर दाक्षिणात्य पध्दतीचे आकर्षक प्रवेशद्वार असणारे लक्ष्मणबाग नावाचे श्रीलक्ष्मी-व्यंकटेशाचे मंदिर आहे. याचे व्यवस्थापन मारवाडी समाजाकडे आहे.

Friday, June 22, 2007

पंढरपूर क्षेत्र - परिसरातील मंदिरे.... (भाग -1)

1) अंबाबाई मंदिर : लखुबाई मंदिरापासून जवळ नदीच्या काठावर उत्तरेकडे हे मंदिर आहे. 1854 साली या मंदिराचा जीर्णोध्दार लिंबा नावाच्या नर्तकीने केला. असा उल्लेख सापडतो. मूळ हे मंदिर सिदु कोळी यांनी बांधले. पुढे हे मंदिर बडवे समाजाच्या ताब्यात गेले. या मंदिरात महिषासुरमदिंनी देवी अंबामातेची अत्यंत सुंदर, रेखीव, आकर्षक अशी 2॥ ते 3 फूट उंचीची पाषाणमूर्ती आहे. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा व नवरात्रात देवीदर्शनासाठी इथे गर्दी होते. नवरात्रात रोज नवनवीन प्रकाराने पूजा बांधली जाते. आरास केली जाते. अष्टमीस होम केला जातो. मंदिरासमोर दीपमाला व विटेचे अग्निकुंड आहे.
2) व्यास मंदिर : अंबाबाईचे मंदिराशेजारी पटांगणाच्या उत्तरेस रामबागेच्या समोर हे मंदिर आहे. आतील मूर्ती खूपच सुंदर आहे. हे मंदिर ज्योतीपंतदादा महाभागवत यांनी बांधले, असा एका ठिकाणी संदर्भ सापडतो. पूर्वी इथे भागवताची पारायणे होत असत. गुरुपौर्णिमा व पौष मासातील प्रत्येक रविवारी असंख्य लोक इथे दर्शनास येतात.
3) त्र्यंबकेश्वर मंदिर : विठ्ठल मंदिराजवळ रोकडोबा वेस (हरिदास वेस) कडे जाताना हे मंदिर आहे. जवळच कुंडलतीर्थ आहे. पूर्वी या मंदिराजवळ संस्कृत पाळशाळा होती. या मंदिरात सभामंडप व व्यासपीठ (गर्भगार ) असे दोन भाग आहेत. इथे महादेवाची मोठी पिंड आहे. त्यावर पितळी मुखवटा बसवला जातो. रोज दोन वळा 'श्री'ची पूजा केली जाते. महाशिवरात्र व श्रावणातील सोमवारी इथे उत्सव असतो.
4) पंचमुखी मारुती मंदिर : थोरल्या दत्त घाटा - (विप्र घाटा) जवळच हे छोटे मंदिर आहे. मूर्ती 7 फूटांची आहे. मूर्तीस पाच मुखे आहेत. एक हात कामरेवर आहे. दुसरा आशीर्वाद स्वरुपाचा आहे. येथील पूजा-अर्चा बैरागी पाहतात. हनुमान जयंतीस असंख्य बैरागी एकत्र जमून उत्सव साजरा करतात.
5) काळभैरव मंदिर व शाकंबरी मंदिर : श्रीविठ्ठल मंदिराजवळ महाद्वारात खाजगी इमारतीमध्ये हे मंदिर आहे. काळभैरवाची मूर्ती सुंदर आहे. मूर्तीचे एक हातात डमरु, गळयात माळ, कानात कुंडले, मस्तकी मुकुट आहे. शेजारी सेवकांची चित्रे आहेत. एक बाजूस जोगेश्वरीची छोटी मूर्ती आहे. मूर्तीशेजारी शिवलिंग आहे. सुमारे 400 वर्षांपूर्वी या ठिकाणी भैरवतीर्थ होते, तलाव होता. तलावाचे चारी बाजूस काळभैरव, महादेव, गणपती व बनशंकरी (शाकंबरी) देवतांच्या मूर्ती होत्या. स्नानगृहे होती. विजापूरच्या आदिलशहाच्या काळात या मंदिरावर हल्ला झाला. इथले दगड निझामाच्या आधिपत्याखाली असलेल्या परांडा गावी नेण्यात आले. इ.स. 1770 साली कोंकणे या सावकाराने काळभैरव मंदिर बांधले. या मंदिराजवळ श्रीबनशंकरी (शाकंबरी) देवीचे सुंदर मंदिर आहे. इथे चैत्रात भैरव अष्टमीला काळभैरव जयंती उत्सव होतो, तर पौष पौर्णिमेला शाकंबरी देवीकडील उत्सव होतो. याच भागात आत सराफकट्टा आहे. इथे असलेल्या श्रीगणेशमूर्तीचे रस्तारुंदीकरणाच्या वेळी स्थलांतर झाले. शांकबरी देवीचे मंदिर प्राचीन आहे. या मंदिरात दोन मूर्ती आहेत. एक मूर्ती शाकंबरीची आहे 2॥ फूट उंचीच्या देवीच्या मूर्तीला 4 हात आहेत. एका हाती डमरु, दुसऱ्या हाती तलवार आहे. एक हात मांडीवर आहे व एक आशीर्वादात्मक आहे. गळयात अलंकार आहेत. 1775 साली अगनळ यांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला. या दोन्ही मंदिरांची व्यवस्था बडवे समाजाकडे आहे.
6) मल्लिकार्जुन मदिर : श्रीविठ्ठल मंदिराच्या पूर्वभागत महाद्वारात हे प्राचीन व भव्य मंदिर आहे. गर्भागार व सभामंडप असे मंदिराचे दोन भाग आहेत. बांधकाम दगडी आहे. मंदिराला दोन प्रवेशद्वारे आहेत. सभामंडपात एका बाजूस गणपतीची मूर्ती आहे. शेजारी 5 फडयांच्या नागाची दगडी प्रतिकृती आहे. मध्यभागी पितळेच्या नंदी आहे. गर्भागारात श्री मल्लिकार्जुनाची भव्य अशी शाळुंका आहे. मूळ मंदिर छोटे होते. संत नरहरी सोनार याच महादेवाची उपासना करीत असे. त्यानेच या मंदिराचा विकास केला.
7) होळकरांचे राममंदिर : महाद्वार घाटावर, चंद्रभागेच्या तीरावर हे रामंदिर आहे. मंदिर व इमारतीचे बांधकाम अत्यंत भक्कम आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. मंदिराचा सभामंडप 60X28 फूट आहे. गर्भागार थोडे उंचावर आहे. व्यासपीठावर राम, लक्ष्मण व सीता यांच्या संगमरवरी दगडाच्या मूर्ती आहेत. 'शेजारी आहिल्याबाई होळकरांची मूर्ती आहे. समोर हनुमंताची मूर्ती उभी आहे. अहिल्याबाई शिवभक्त होत्या म्हणून मंदिरात शिवलिंगसुध्दा आहे. चैत्र महिन्यात दहा दिवस इथे कीर्तन-प्रवचनादी कार्यक्रम होतात. रामनवमीस मोठा उत्सव होतो. येथील व्यवस्था होळकर संस्थानचे वतीने बडवे यांचे नातेवाईक पाहतात. या वाडयात लग्न-मुंजीचे व अन्य धार्मिक कार्यक्रमही होतात.

Monday, June 18, 2007

पंढरपूर क्षेत्रातील तीर्थस्थाने....

1. लोहदंड तीर्थ : हे तीर्थ चंद्रभागेच्या पात्रात, पुंडलिकाच्या मंदिरासमोर 20-25 फुटांवर आहे. इथे दगडी नाव तरंगते असे म्हणतात. यी तीर्थामागची कथा अशी आहे. इथे दगडी नाव तरंगते असे म्हणतात. या तीर्थामागची कथा अशी आहे. - गौतम ॠषींची पत्नी सती अहिल्या हिचे इंद्राने गौतम ॠषीचे रुप घेऊन सतित्व हरण केले. गौतम ॠषींनी पत्नीला शिळा होण्याचा व देवेंद्राला सहस्त्र छिद्राने (भगाने) पीडित होण्याचा शाप दिला अहिल्येला उ:शाप मिळून भगवान रामचंद्राच्या पदस्पर्शाने ती पावन झाली. इंद्र भगवान विष्णूला शरण गेला. विष्णूंनी त्याच्या हाती एक लोहवंड दिला व तीर्थयात्रा करण्यास सांगितले आणि ''ज्या तीर्थात हा लोहदंड तरेल त्या तीर्थाच्या स्नानाने तुझी भगे (छिद्रे) जातील'' असा वर दिला. अनेक तीथें हिंडत-हिंडत देवेंद्र या तीर्थाजवळ आला. इथे लोहदंड तरला. हर्षिंत इंद्राने या तीर्थात स्नान केले, तो शाषमुक्त झाला. व्याधिमुक्त झाला म्हणून या तीर्थास 'लोहदंड तीर्थ' हे नाव पडले. या तीर्थाच्या निर्मितीची अशी आख्यायिका आहे, की भगवान शंकर-पार्वती आकाशमार्गाने जात असता सती पार्वतीस तहान लागली. भगवान शंकराने आपल्या त्रिशूळाने भूमीस छिद्र पाडले. त्यातून भोगावतीचे जल काढले. पार्वतीची तृष्णा भागली. तेच हे लोहदंड तीर्थ.
2. पद्मतीर्थ : मंदिराच्या पश्चिमेस सुमारे 1 कि.मी अंतरावर आहे. या ठिकाणी पद्मावती देवीचे मंदिर आहे. मंदिराभोवती पूर्वी तळे होते. तळयाभोवती भक्कम दगडी भिंत व घाट आहेत. भगवान शंकरासह आलेली पार्वती याच ठिकाणी थांबली होती असे म्हणतात. कान्ह्या हरिदास या संतकवीने केलेल्या काकड आरतीत या तीर्थाचा उल्लेख आहे. या तलावाचे बांधकाम इ. 1778 मध्ये सरदार यशवंत पवार यांनी केले असा उल्लेख सापडतो. या मंदिरात नवरात्र महोत्सवात देवीदर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. याची व्यवस्था बडवे पाहतात.
हे मंदिर सावरकर पथावर आहे. जवळच रेल्वे स्टेशन, एस.टी.स्टँड आहे. मंदिरातील तांदळा भव्य व सुंदर आहे. नामदेवाला घेऊन ज्ञानेश्वराची भावंडे तीर्थयात्रेला निघाली तेव्हा भगवान श्रीविठ्ठल त्यांना सोडण्यासाठी या स्थानापर्यंत आले होते. इथेच पांडुरंगाने नामदेवाचा हात ज्ञानेशअवरांच्या हाती दिला, असा उल्लेख एका अभंगात सांपडतो. इथे सुंदर बागबगीचा केल्यास पंढरपूरच्या सौंदर्यात निश्चितच भर पडेल. इथे नगरपालिकेने बांधलेले पद्मावती शाँपिंग सेंटर आहे.
3. कुंडल तीर्थ : श्रीविठ्ठल मंदिराच्या उत्तर बाजूस हरिदास वेशीजवळ हे तीर्थस्थळ आहे. याची आख्यायिका अशी - भगवान विष्णूंनी दैत्यांशी युध्द करण्याच्या प्रसंगी आपल्या कानातील कुंडले इथे काढून ठेवली होती म्हणून यास कुंडलतीर्थ म्हणतात. या तीर्थाशेजारी नृसिंहाची मूर्ती आहे. सध्या कुंडलतीर्थाची जागा बुजवली गेली असून नूसिंहाच्या नावाने एक पिंपळ उभा आहे. शेजारीच महादेवाचे मंदिर असून मंदिरात आद्य शंकराचार्यांची सुंदर मूर्ती आहे.
4. संगमतीर्थ : गोपाळपूरजवळ हे संगमतीर्थ आहे. भीमा व पुष्पा नद्यांचा या ठिकाणी संगम होतो. भगवान श्रीकृष्ण जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा यमुना दु:खी झाली. भगवंतांनी तिला पुष्पा नदीच्या रुपाने जवळ आणले अशी आख्यायिका आहे.
5. वेणुतीर्थ : संगमतीर्थापासून जवळच वेणुतीर्थ आहे. जिथे राधेने भगवान श्रीकृष्णाची वेणू अर्थात बासरी पकडली, त्या तीर्थाला वेणुतीर्थ असे म्हणतात.
6. गुंजातीर्थ : वेणुतीर्थाजवळ असलेल्या वा स्थानी भगवंताच्या मुकुटांतून काही गुंजा इथे गळून पडल्या म्हणून यास गुंजातीर्थ म्हणतात.
7. वृध्दकालेश्वर तीर्थ : गोपाळपूरपासून सुमारे 1 कि.मी. अंतरावर हे तीर्थ आहे. स्वत: यमधर्माने हे तीर्थ स्थापन केले म्हणून यास यमतीर्थ असेही म्हणतात.
8. पंचगंगातीर्थ : श्रीविठ्ठल मंदिरापासून सुमारे 8 कि.मी. अंतरावर उत्तरेच्या बाजूला नदीच्या पात्राजवळ हे तीर्थस्थान आहे. इथे तुंगा, सती, सुनी, कीर्ती व भृंगारी व 5 छोटया नद्यांचा संगम आहे. इथे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी व महाशिवरात्रीस इथे यात्रा भरते.
9. विष्णुपद तीर्थ : चंद्रभागा नदीच्या पात्रात पुंडलिक मंदिराच्या दक्षिणेस सुमारे 1 कि.मी. अंतरावर हे तीर्थ आहे. नदीच्या पात्रात पाषाणस्तंभावर दगडाचे बांधलेले 31 फूट परिघाचे व 12 फूट उंचीचे हे मंदिर आहे. या सोळखांबी आकाराच्या मंदिरची मूळ बांधणी इ. 1640 मध्ये धामणकरबुवांनी केली. पुढे सन 1875 मध्ये चिंतोपंत नागेश बडवे यांनी या मंदिरास सुंदर रुप दिले. मंदिरात मध्यभागी चौकोनात श्रीगोपालकृष्णाची समचरण व देहुडाचरण अशी दोन प्रकारची पावले आहेत. शेजारी गाईंची पावले (खूर) आहेत. दहिकाल्याच्या वाटीची खूणही आहे. पुंडलिकासाठी भगवान श्रीकृष्ण इथे आले. गाई सोडल्यां व खेळविल्या. गोपगणांसह इथे वनभोजन केले. अशी कथा या तीर्थासंबंधात प्रल्हादमहाराज बडवे यांनी सांगितली आहे. भगवान श्रीविठ्ठलनाथ आळंदीहून परत आल्यावर मार्गशीर्ष महिन्यात इथेच राहतात म्हणून या महिन्यात या स्थानाला यात्रेचे स्वरुप येते. इथे लांबलांबून लोक दर्शनास व सहभोजनास येतात, मार्गशीर्ष अमावास्येला श्रीविठ्ठलाची पावले पालखीत ठेवून समारंभपूर्वक मिरवत आणून देवांना पुन्हा मंदिरात आणले जाते. या ठिकाणी जाण्यास घाट व पुल आहे, तसेच नदीच्या पात्रातून नावेतून जाता येते. येथील व्यवस्था बडवे पाहतात. या तीर्थाजवळच नदीच्या पात्रात नारदाचे सुंदर मंदिर आहे. मूर्ती अतिशय सुंदर व आकर्षक आहे. याची व्यवस्था कोळी लोक पाहतात. इथे जवळच मुक्तकेशी तीर्थ आहे.

पंढरपूर क्षेत्रातील तीर्थस्थाने....

1. लोहदंड तीर्थ : हे तीर्थ चंद्रभागेच्या पात्रात, पुंडलिकाच्या मंदिरासमोर 20-25 फुटांवर आहे. इथे दगडी नाव तरंगते असे म्हणतात. यी तीर्थामागची कथा अशी आहे. इथे दगडी नाव तरंगते असे म्हणतात. या तीर्थामागची कथा अशी आहे. - गौतम ॠषींची पत्नी सती अहिल्या हिचे इंद्राने गौतम ॠषीचे रुप घेऊन सतित्व हरण केले. गौतम ॠषींनी पत्नीला शिळा होण्याचा व देवेंद्राला सहस्त्र छिद्राने (भगाने) पीडित होण्याचा शाप दिला अहिल्येला उ:शाप मिळून भगवान रामचंद्राच्या पदस्पर्शाने ती पावन झाली. इंद्र भगवान विष्णूला शरण गेला. विष्णूंनी त्याच्या हाती एक लोहवंड दिला व तीर्थयात्रा करण्यास सांगितले आणि ''ज्या तीर्थात हा लोहदंड तरेल त्या तीर्थाच्या स्नानाने तुझी भगे (छिद्रे) जातील'' असा वर दिला. अनेक तीथें हिंडत-हिंडत देवेंद्र या तीर्थाजवळ आला. इथे लोहदंड तरला. हर्षिंत इंद्राने या तीर्थात स्नान केले, तो शाषमुक्त झाला. व्याधिमुक्त झाला म्हणून या तीर्थास 'लोहदंड तीर्थ' हे नाव पडले. या तीर्थाच्या निर्मितीची अशी आख्यायिका आहे, की भगवान शंकर-पार्वती आकाशमार्गाने जात असता सती पार्वतीस तहान लागली. भगवान शंकराने आपल्या त्रिशूळाने भूमीस छिद्र पाडले. त्यातून भोगावतीचे जल काढले. पार्वतीची तृष्णा भागली. तेच हे लोहदंड तीर्थ.
2. पद्मतीर्थ : मंदिराच्या पश्चिमेस सुमारे 1 कि.मी अंतरावर आहे. या ठिकाणी पद्मावती देवीचे मंदिर आहे. मंदिराभोवती पूर्वी तळे होते. तळयाभोवती भक्कम दगडी भिंत व घाट आहेत. भगवान शंकरासह आलेली पार्वती याच ठिकाणी थांबली होती असे म्हणतात. कान्ह्या हरिदास या संतकवीने केलेल्या काकड आरतीत या तीर्थाचा उल्लेख आहे. या तलावाचे बांधकाम इ. 1778 मध्ये सरदार यशवंत पवार यांनी केले असा उल्लेख सापडतो. या मंदिरात नवरात्र महोत्सवात देवीदर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. याची व्यवस्था बडवे पाहतात.
हे मंदिर सावरकर पथावर आहे. जवळच रेल्वे स्टेशन, एस.टी.स्टँड आहे. मंदिरातील तांदळा भव्य व सुंदर आहे. नामदेवाला घेऊन ज्ञानेश्वराची भावंडे तीर्थयात्रेला निघाली तेव्हा भगवान श्रीविठ्ठल त्यांना सोडण्यासाठी या स्थानापर्यंत आले होते. इथेच पांडुरंगाने नामदेवाचा हात ज्ञानेशअवरांच्या हाती दिला, असा उल्लेख एका अभंगात सांपडतो. इथे सुंदर बागबगीचा केल्यास पंढरपूरच्या सौंदर्यात निश्चितच भर पडेल. इथे नगरपालिकेने बांधलेले पद्मावती शाँपिंग सेंटर आहे.
3. कुंडल तीर्थ : श्रीविठ्ठल मंदिराच्या उत्तर बाजूस हरिदास वेशीजवळ हे तीर्थस्थळ आहे. याची आख्यायिका अशी - भगवान विष्णूंनी दैत्यांशी युध्द करण्याच्या प्रसंगी आपल्या कानातील कुंडले इथे काढून ठेवली होती म्हणून यास कुंडलतीर्थ म्हणतात. या तीर्थाशेजारी नृसिंहाची मूर्ती आहे. सध्या कुंडलतीर्थाची जागा बुजवली गेली असून नूसिंहाच्या नावाने एक पिंपळ उभा आहे. शेजारीच महादेवाचे मंदिर असून मंदिरात आद्य शंकराचार्यांची सुंदर मूर्ती आहे.
4. संगमतीर्थ : गोपाळपूरजवळ हे संगमतीर्थ आहे. भीमा व पुष्पा नद्यांचा या ठिकाणी संगम होतो. भगवान श्रीकृष्ण जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा यमुना दु:खी झाली. भगवंतांनी तिला पुष्पा नदीच्या रुपाने जवळ आणले अशी आख्यायिका आहे.
5. वेणुतीर्थ : संगमतीर्थापासून जवळच वेणुतीर्थ आहे. जिथे राधेने भगवान श्रीकृष्णाची वेणू अर्थात बासरी पकडली, त्या तीर्थाला वेणुतीर्थ असे म्हणतात.
6. गुंजातीर्थ : वेणुतीर्थाजवळ असलेल्या वा स्थानी भगवंताच्या मुकुटांतून काही गुंजा इथे गळून पडल्या म्हणून यास गुंजातीर्थ म्हणतात.
7. वृध्दकालेश्वर तीर्थ : गोपाळपूरपासून सुमारे 1 कि.मी. अंतरावर हे तीर्थ आहे. स्वत: यमधर्माने हे तीर्थ स्थापन केले म्हणून यास यमतीर्थ असेही म्हणतात.
8. पंचगंगातीर्थ : श्रीविठ्ठल मंदिरापासून सुमारे 8 कि.मी. अंतरावर उत्तरेच्या बाजूला नदीच्या पात्राजवळ हे तीर्थस्थान आहे. इथे तुंगा, सती, सुनी, कीर्ती व भृंगारी व 5 छोटया नद्यांचा संगम आहे. इथे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी व महाशिवरात्रीस इथे यात्रा भरते.
9. विष्णुपद तीर्थ : चंद्रभागा नदीच्या पात्रात पुंडलिक मंदिराच्या दक्षिणेस सुमारे 1 कि.मी. अंतरावर हे तीर्थ आहे. नदीच्या पात्रात पाषाणस्तंभावर दगडाचे बांधलेले 31 फूट परिघाचे व 12 फूट उंचीचे हे मंदिर आहे. या सोळखांबी आकाराच्या मंदिरची मूळ बांधणी इ. 1640 मध्ये धामणकरबुवांनी केली. पुढे सन 1875 मध्ये चिंतोपंत नागेश बडवे यांनी या मंदिरास सुंदर रुप दिले. मंदिरात मध्यभागी चौकोनात श्रीगोपालकृष्णाची समचरण व देहुडाचरण अशी दोन प्रकारची पावले आहेत. शेजारी गाईंची पावले (खूर) आहेत. दहिकाल्याच्या वाटीची खूणही आहे. पुंडलिकासाठी भगवान श्रीकृष्ण इथे आले. गाई सोडल्यां व खेळविल्या. गोपगणांसह इथे वनभोजन केले. अशी कथा या तीर्थासंबंधात प्रल्हादमहाराज बडवे यांनी सांगितली आहे. भगवान श्रीविठ्ठलनाथ आळंदीहून परत आल्यावर मार्गशीर्ष महिन्यात इथेच राहतात म्हणून या महिन्यात या स्थानाला यात्रेचे स्वरुप येते. इथे लांबलांबून लोक दर्शनास व सहभोजनास येतात, मार्गशीर्ष अमावास्येला श्रीविठ्ठलाची पावले पालखीत ठेवून समारंभपूर्वक मिरवत आणून देवांना पुन्हा मंदिरात आणले जाते. या ठिकाणी जाण्यास घाट व पुल आहे, तसेच नदीच्या पात्रातून नावेतून जाता येते. येथील व्यवस्था बडवे पाहतात. या तीर्थाजवळच नदीच्या पात्रात नारदाचे सुंदर मंदिर आहे. मूर्ती अतिशय सुंदर व आकर्षक आहे. याची व्यवस्था कोळी लोक पाहतात. इथे जवळच मुक्तकेशी तीर्थ आहे.